Monday, February 14, 2011

इथल्या पिंपळपानावरती

आमच्या वाड्यात पिंपळाचं मोठ्ठं झाड होतं किंवा आहे किंवा असेलही अजून. मी तिथे गेलेले नाही गेल्या वीस-पंचवीस वर्षात!
आपण तीन फुटांवरून जग न्याहाळत असतो नां? तेव्हा सगळंच असतं मोठ्ठं, उंच! कुणीतरी आपल्याला उचलून घेतलं नां, की तेच जग पाच फुटांवरून पाहता येतं. आता जग असं वेगवेगळ्या पातळ्यांवरून पाहता येत नाही. (तेव्हा स्वप्नात उडता यायचं ते वेगळंच!)

तर आमच्या वाड्यात पिंपळाचं मोठ्ठं झाड होतं किंवा आहे किंवा असेलही अजून. असं आपल्या काळजात रूतून बसलेलं काही काढून दाखवायचं म्हणजे मोठं कठीण काम. जसं आत आहे तशीच त्याची प्रतिकृती शब्दातून उभी करता येईल याची खात्री नाही. त्या दिवसांत शिरायचं म्हणजे ती कोवळीक आत उरलीये की नाही याची खात्री नाही. हल्ली तर त्या दिवसांतली तीच का मी? याचीही खात्री नाही.

पण आमच्या वाड्यात पिंपळाचं मोठ्ठं झाड होतं किंवा आहे किंवा असेलही अजून. ते माझ्या लहानपणावर पाखर घालून उभं होतं. आपण कुणा आप्ताची ओळख करून देतो, तेच जुने घीसेपिटे शब्द वापरून.. फारतर आपला असा एक ’च’ लावतो, माझा’च’ आहे, असं म्हणत... म्हणून समोरच्याला कळतंच असं नाही. तर असं आहे... लिहिलं तरी रूखरूख न लिहिलं तरी रूखरूख.

***

आमच्या वाड्यात साधारण मध्यभागी एक पिंपळाचं झाड होतं. त्याला एक चौरस पार बांधलेला होता, चांगला तीन-साडेतीन फूट उंच, त्यावर कुणी बसत नसे. याचं एक कारण त्याची उंची, दुसरं पिंपळाच्या झाडाला आणि पारावर मोठे काळे मुंगळे असत, तिसरं म्हणजे तिथे एका कोनाड्यात देवघरात असावा तसा मारुती होता. आईने तिथे एक छोटी घंटा बांधली होती, जी वाजवायला मला खूप आवडे. आई मारूतीला रोज सकाळ-संध्याकाळ दिवा लावत असे. मारूतीसमोर बसून घंटा वाजवायची घाईघाईने (मुंगळ्यांना जवळ येऊ न देता) ’मनोजवम मारुततुल्यवेगम’ म्हणायचं आणि शेजारी उभ्या असणार्‍या आईच्या कडेवरच उतरायचं.
वरच्या मजल्यावर गेलं की तिथून वर पिंपळाला फांद्या फुटलेल्या होत्या. आकाशभर त्याची पानं पसरलेली होती. कदाचित त्या मुंगळ्यांमुळेच आम्ही कधी झाडावर चढत नसू. कठड्यावर बसून वर पाहिलं की ती पाने दिसत, मधे मधे कोरलेलं आकाश दिसे, आणखी बघत बसलो तर वर कावळ्यांची दोन- तीन घरटी दिसत. काही चिमण्यांची घरटी दिसत. संध्याकाळी हे पक्षी घरी परतत तेंव्हा नुसता कलकलाट करीत. सकाळी उजाडताच किलबिल ऎकू येई. पानांची सळसळ, समुद्राची गाज असावी तशी कायम सोबतीला असे.
पावसाळ्यात झाडच पाऊस पाडत आहे असं दिसे. मे महिन्यात वारं सुटलं की ते गदागदा हलत असे, अंगात आल्यासारखं.
कधीकधी कुठेतरी जाणारा पोपटांचा थवा विश्रांतीसाठी थोडावेळ झाडावर उतरत असे. पिंपळ झोकदार दिसे. कधी पांढर्‍या बगळ्यांचा थवा उतरे, आम्ही दोन्ही हातांची बोटे हलवत ’ बगळ्या बगळ्या कवडी दे, माळावरचा घोडा घे’ चं गाणं म्हणत असू. गाणं झालं की झटकन आपापल्या बोटांची नखे पाहात असू, बगळ्यांच्या मनात आलं तर ते एखाद दोन कवड्या देऊन जात. त्या सवंगड्यांना दाखवायच्या. मला एकटीला जर कवडी मिळाली तर मला आपण आकाशातल्या त्या बगळ्यांची खास मैत्रिण आहोत असे वाटे. ती एक कवडीदेखील दिवस आनंदी करून जात असे.
कधी माकडांची, वानरांची टोळी येई, वाडाभर धुडगूस घालून जाई. त्यांना म्हणायचेही गाणे होतेच. आम्ही भीतभीत किती माकडे आहेत हे मोजायचा प्रयत्न करत असू. पिंपळाला कुठे कुठे शेपट्या फुटलेल्या दिसत. उड्या मारताना माकडांची लहानगी पोरे आयांच्या पोटाला चिकटलेली असत.
कबुतरे येत, कधी एखादी घार कधी कोकीळ.... आम्ही काही वरंच पाहात नसू, पिंपळाखालच्या जगात आम्हांला अधिक रस असे.
बहुदा संक्रांतीच्या आधी पिंपळाची फळे पिकत नंतर ती टपाटप खाली पडत. अंगणभर ती फुटलेली फळे! त्यावर पाय़ ठेववत नसे, जपूनच चालावं लागे. कधी ही फळं संपणार असं होऊन जाई.
दाट सावली देणारा पिंपळ होळीच्या सुमारास आपली पानं गाळायला लागे. सुरूवातीस एक दोन चार पानं गाळणारा पिंपळ नंतर खूप पानं गाळून आठ-दहा दिवसांत रिकामा होत असे. हे पानगळीचे दिवस मला खूप आवडत. वाडाभर पानांचा खच. त्यावरून चालताना पानांचा कडमकुडूम आवाज येई. वाळली पाने म्हणजे खजिना असल्यासारखी त्यात मी काय काय शोधत बसे. क्वचित एखादं अख्खं जाळीदार पान सापडे. काही पानांना जाळं लागलेलं असे, काही पाने चित्रविचित्र प्रकारे वळलेली असत. काही पानांवर गाठी असत. त्या पानांमधे बसलं ना की गोष्टीत गेल्यासारखं वाटे. म्हणजे आईने, आजीने गोष्ट वाचली असेल त्यातही मी होतेच आणि पुढेही कोणी कोणी वाचली तर असेनच. गोष्ट म्हणजेच माझं घर. ..... असल्या कल्पना करत मला फार वेळ बसता येत नसे. आत्याबाईंना वाडा झाडून लख्ख करायचा असे. त्यांना वाडा झाडू नका, राहू देत की पानं तशीच, असं म्हणायची माझी हिंमत नव्हती. आठ दहा दिवस पाने तशीच साचू दिली तर! त्या पानांमधे बसायला, चालायला कसली मजा येईल!...
ही हौस मी स्वप्नात पुरवून घेत असे. स्वप्नांचं बरं असतं ना? आत्याबाईंना बाहेरच ठेवता येतं.
हे परीक्षांचे दिवस असत. आता शाळा संपेल, वर्ग बदलेल, आत्याबाईंनी एका कोपर्‍यात पानांचा ढीग गोळा केला की गळ्यात आवंढा दाटून येई. स्वच्छ झालेलं अंगण परकं होऊन जाई.
पानं नसल्यामुळे झाड शिडशिडीत दिसे. फांद्यांची जाळी मजेदार दिसे. त्यातून इतकं ऊन / प्रकाश अंगणात येई, डोळे चमकत असत. नेहमीचा वाडा वेगळाच दिसे. पंधरा दिवस हे असं. नंतर एके दिवशी फांद्यांकडे पाहिलं तर इवली इवली लाल, पोपटी पाने फुटलेली दिसत. अशी पानं फुटली की आम्ही अंगणात झोपायला सुरूवात करत असू. रोज वाढणारी ती पाने बघत असू. सुट्या लागल्या की निवांत गादीवर पडल्या पडल्या पिंपळाच्या पालवीकडे पाहण्यात कितीतरी वेळ जात असे. गावाला जाण्याचे वेध लागलेले, शाळेतला निकाल आणि ही नवी पाने, त्या पिपाण्या कसं एकात एक मिसळून गेलं आहे. कोवळी पाने अगदी पातळ असतात, त्यांचा स्पर्श आश्वासक असतो. पानांवरची जाळी किती आकर्षक असते! हळू हळू ती मोठी व्हायला लागतात. अवघं झाड पोपटी हिरवं होत जातं. जुन्या झाडातून एक नवं झाड उमलून आलं की आम्ही गावाला निघत असू.
गावाहून आल्यावर आम्हांला नेहमीचा पिंपळ दिसत असे.

आम्ही वाड्याच्या मागच्या बाजूला कधीच जात नसू. तिकडे एक नाला होता, म्हणत नाला असले तरी पाणी बरं असावं, धोबी तिथे कपडे धूत. वाड्याच्या मागच्या बाजूच्या खिडकीत बसून हे दिसे. मी आणि दीपू, माझा सवंगडी , आमची बसायची आवडती जागा म्हणजे ही खिडकी होती. बरेचदा दीपू माझ्यासाठी या खिडकीत जागा धरून ठेवी. कधीतरी एकदा आईबरोबर मी मागे गेले होते. आई कुणाशीतरी बोलत होती. तिथे कपडे धुणारी एक मावशी मला म्हणाली, ”हे बघ, तुमच्या पिंपळाची मुळं, पाणी प्यायला इथं आलीत.” खरंच मुळ्या होत्या. तिथून आमचा वाडा तर किती दूर दिसत होता. पाणी प्यायला पिंपळ इतक्या दूरवर येतो??
हा पिंपळ काय खात असेल? कुठलं पाणी पित असेल? असा विचार मी कधीच केला नव्हता. ते कळलं आणि मोठं झाल्यासारखं वाटलं. न बोलताच मी घरी आले.
पिंपळ कायम इथं उभा असला तरी काम करतच असतो, कुठून पाणी मिळव, अन्न मिळव, घरटी धर, सावली दे.

****