Tuesday, January 11, 2011

ऊन खात बसू

सुहृदला गोष्ट वाचून दाखवत होते....’ बोक्या ऊन खात बसला होता’.....
सुहृद म्हणाला,’ ऊन काही खाण्याचा पदार्थ नाही’
”खरं आहे, पण तसं म्हणायची पद्धत आहे.”


एकीकडे पुढची गोष्ट वाचून दाखवत होते, मनाने कुठेच्या कुठे पोचले होते.
ऊन खाणे........ मी विसरलेच आहे.

अशा थंडीच्या दिवसात आमची कितीतरी कामे ऊन्हात व्हायची.
शाळेत जाण्यापूर्वी माझी वेणी घालून द्यायची असे, आई फणी, कंगवा घेऊन म्हणे ’चल, उन्हात बसू.’ खोबर्‍याचं तेल पातळ होण्यासाठी आधीपासूनच उन्हात ठेवलेलं असे.

रविवारी न्हायलं की केस वाळवण्यासाठी उन्हात जाऊन बसायचं. आधी केसांना टॉवेल गुंडाळलेला असे त्याचा मानेवर भलामोठा अंबाडा मला आवडे किंवा सोडल्यावर त्याची लांबलचक वेणी मागे हलवायला, खांद्यावरून पुढे घ्यायला मला आवडे. ”ओले केस सोड पाहू आधी” असं म्हणून आई मला उन्हात घेऊन जाई. माझे केस खसाखसा पुसून देई आणि ओला टॉवेल धुवायला घेऊन जाई. मी तिथेच उन्हात बसून राही. केसांशी मी खेळत बसे. केस हळू हळू कोरडे होत, मग भुरभुरायला लागत, अंग तापायला लागे., उब थेट आत शिरत असे. आईकडून न्हाहून घ्यायचं म्हणजे दमायचंच काम. उन्हात बसून झोप यायला लागे, डोळे मिटायला लागत. पापण्या मिटून सूर्याकडे पाहिले की त्या लाल-केशरी-पिवळ्या अशा दिसत. त्या रंगांचा गरम स्पर्श जाणवे. जणू आकाशातल्या एका सूर्याचे आपल्या डोळ्यात दोन सूर्य झाले आहेत. नंतर सावलीत डोळे उघडून पाहिले तर सावलीतही तेच रंग दिसत., कुठेही पाहिले तरी तेच रंग, जणू डोळ्याला चिकटलेले..... आत जाऊन झोपावे तर त्या थंडीत नको वाटे... उन्हात झोप अनावर होई... उन्हाचेही चटके बसत.... भूक लागलेली असे... तसेच जाऊन आत झोपले तर मस्त झोप लागत असे. अंगावर किंचित शिरशिरी येई. आई वरून पांघरूण घाली. मनातलं हिला बरोबर कसं कळतं? भुकेल्यापोटी जेमतेम वीस-पंचवीस मिनिटे झोप होत असे. जेवण्यासाठी आईची हाक ऎकू येई आणि कडाडून भूक लागलेली असे, डोळे उघडले तर सगळं नेहमीसारखं दिसायला लागलेलं असे.

पेपर वाचायचा असला की तो घेऊन उन्हात जाऊन बस, पुस्तक? तेही उन्हात जाऊन वाचायचे. पेनात शाई भरायची आहे? ऊन्हात बसून भरू, नखे कापायची आहेत? उन्हात कापू, हरभरे खायचे आहेत? उन्हात बसून खाऊ, शेंगदाणे कुटायचेत? उन्हात बसू...... स्वैपाकाचे आणि जेवणाचे काम तेव्हढे आत होत असे. ऊन सरकत असे, त्याप्रमाणे उन्हात बसायची जागा बदलत असे. उन्हावरून वेळ सुद्धा कळते असे.
आधी उन्हाकडे तोंड करून बसायचं, तापायला लागलं की पाठ करून बसायचं.
हिवाळ्याच्या दिवसांमधे मिळेल तेव्हढं ऊन शोषून घ्यायचं.

वाड्यातली आम्ही मुलं अशी उन्हात बसायचो, ऊन सरकलं की जागा सरकून घ्यायचो जणू आयांनी उन्हात घातलेली वाळवणंच...... पितात सारे गोड हिवाळा...उन्हात बसूनच नां?

पौषातला रविवार म्हणजे आईचे उपवास आणि आदित्याराणूबाईची पूजा. नैवेद्य असे, दुधातली तांदळाची खीर. ती खायची तीदेखील उन्हात बसूनच. रथसप्तमीला पितळी ताटावर आई चंदनाने सूर्य काढी त्याच्या रथाला एकच चाक ....... जयाच्या रथा एकची चक्र पाही.. नसे भूमी आकाश आधार काही.. असे सारथी पांगुळा ज्या रथासी.. नमस्कार त्या सूर्यनारायणासी.. आईला सारथी कसाबसा जमे पण घोडे जमत नसत. मग मी किंवा विश्वास त्या रथाचे चार घोडे काढत असू. दुसर्‍या दिवशी छोट्या सुगड्यातून दूध उतू घालायचे. ते पूर्वेला गेले तर छान!

सूर्याचे आणि ऊन्हाचे हिवाळाभर कौतुकच असायचे. हिवाळ्यातला आकाशाचा तो निळा रंगही किती मोहविणारा!

अशात तो धनुर्मास येई.त्यात एखाद्या रविवारी सूर्योदयाला देवाला आणि सूर्याला नैवेद्य दाखवायचा. त्याआधी आम्हांला स्नान करून तयार असावे लागे, कुणीतरी बिचारा मुंजाही आवरून येत असे, नाहीतर आई आत्याच्या मुलांना रात्री झोपायला बोलावत असे. म्हणजे मुंजाची वाट पाहायला नको. वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, बाजरीचा खिचडा, तूप, लोणी असा बेत असे. इतक्या पहाटे जेवायला गंमत वाटे. पेपर येण्यापूर्वी आमची जेवणे होत. पेपर आला की आम्ही सगळे एकेक पान घेऊन उन्हात बसत असू, अर्थात आई सोडून.

माझ्या मोठीआईला ऊन खात बसायला आवडे. आई अजूनही तिचं आवरलं की गच्चीत ऊन खात पेपर वाचते.
मी ते विसरूनच गेले आहे.

सुदैवाने हिवाळ्यात आमच्या गच्चीत ऊन येते..न्हायलं की सवयीने मुक्ता सुहृदला केस उन्हात वाळवून या असं सांगते. माझेही केस उन्हात वाळवते....सोय म्हणून... एक काम म्हणून... मी त्याची मजा घेत नाही... उन्हाशी खेळत नाही, ते अंगाखांद्यावर मिरवत नाही.
एखाद्याने प्रेमाने आपल्यावर वर्षत राहावं आणि आपण त्याला विसरूनच जावं ? इतकी कृतघ्न मी कधी झाले?
उन्हाशी तर मी बेईमानी केली.
त्याची आणि माझ्या मुलांची साधी ओळखही करुन दिली नाही.

------------------------

Sunday, January 2, 2011

गोष्ट एका शोधाची ... शोधातल्या प्रवासाची... प्रवासातल्या आनंदाची....

या वेळेस नाताळच्या छोट्या सुट्टीत कोल्हापूर- बेळगाव (जमल्यास धारवाड) जायचं ठरवलं. अशी ’भाषा सहल’ काढायचं कधीचं मनात होतं यावेळी अचानक जमून आलं. या सहलीचे दोन उद्देश होते, एक म्हणजे कोल्हापूर, बेळगाव इथली मराठी ऎकायची, दुसरं म्हणजे प्रकाश नारायण संतांच्या लंपनचं बेळगाव त्याच्या नजरेतून पाहायचं, त्याचं घर आणि तो परिसर पाहायचा. (जमल्यास धारवाडचे जीएंचे घरही पाहून यायचे.)
कोल्हापूर सोडल्यावर थोड्यावेळाने तवंदीकडे जाणारा रस्ता लागला, हे इंदिरा संतांचं माहेर.
पुढे हत्तरगी, यनकनमर्डी वगैरे गावे लागल्यावर आपण लंपनच्या भागात जात आहोत, हे जाणवू लागलं. बेळगाव आल्यावर आमचा शेजारी मुलांना म्हणाला,” स्वेटरं घेतलात ना? घालून सोडा”

२५ ला रविवारी संध्याकाळी बेळगावला पोचलो. बेळगाव माझ्या कल्पनेपेक्षा खूपच मोठं होतं /आहे. लंपनचे घर शोधणे अवघडच होते.

सोमवारी सकाळी मिलिन्दला म्हणाले, ”आपण गुगल वरून बेळगावचा नकाशा काढून आणायला हवा होता.” ” डिरेक्टरीत नकाशा आहे.” हा माणूस जिथे असेल तिथला आजूबाजूचा छापील मजकूर वाचायचा ठेवत नाही!
त्यात कुठेही गुंडीमठ रस्ता नाही! लंपनचे घर तर गुंडीमठ रस्त्याजवळ! हॉटेलमधे विचारले, माहित नव्हते. लेखकाने रस्त्याचे नाव बदलले असणार!
शारदा संगीत मधे लंपनच्या भावविश्वातला नकाशा आहे, तो आणि डिरेक्टरीतला नकाशा यांची पुन्हा पुन्हा तुलना करत होतो. गावाच्या मध्यातून जाणारा लोहमार्ग सारखाच होता. रेल्वेचे पहिले गेट, दुसरे गेट, तिसरे गेट तेही होते. काही रस्ते (नावं नव्हेत) सारखे होते.
आम्ही सोबत विनायक गंधे यांचं ” लंपनचे भावविश्व” हे पुस्तक आणलं होतं. ते पद्मगंधा प्रकाशनाचे पुस्तक आहे.
” पद्मगंधा प्रकाशनात फोन करून गंधेंचा फोन नं. मिळवायचा का? ते सांगू शकतील. त्याआधी धर्मापुरीकर काकांना फोन करून विचारते.”
काका प्रवासात होते, त्यांच्याकडे सुप्रिया दीक्षितांचा फोन नं. होता पण घरी!

कुठून कशी सुरूवात करावी? लंपनच्या गावात तर पोचलो पण घर कुठे आहे?

मी मुक्ता- सुहृदचे आवरेपर्यन्त मिलिन्दने पद्मगंधा प्रकाशनात फोन केला होता, तिथे कुणी नव्हते सगळे ठाण्याला साहित्यसंमेलनात! मग मिलिन्दने डिरेक्टरीतून राणी पार्वतीदेवी कॉलेजचा फोन नं शोधून, तिकडे फोन केला, कुणी नव्हते. नंतर ’तरूण भारत’ कार्यालयात फोन केला, त्यांनी ”लोकमान्य वाचनालय” (गोवा वेस) इथे जा, तिथे अशोक याळगी असतील, ते तुम्हांला लंपनचे घर दाखवतील असे सांगितले.

वा! नवरा असावा तर असा! (इथे नवर्‍याविषयीच्या कौतुकाने मला भरून आले.)

एकदा याळगी भेटले की झाले. ते घराचा पत्ता देतील मग लंपूच्या शाळेचं नाव विचारून घेऊ. हे काम तर झकास झाले!

आम्ही वाचनालयात गेलो. खालच्या मजल्यावर पुस्तक प्रदर्शन होते. वरचे वाचनालय बंद होते, कधी उघडणार? पुस्तक विक्रेत्याकडून मिलिन्दने याळगींचा नंबर घेतला, याळगींना फोन लावला. तेही साहित्यसंमेलनात! चार वाजता वाचनालय उघडेल तेंव्हा या, (आणखी एक नाव सांगितलं) , त्यांना मी बोलून ठेवतो म्हणाले.
छे! आता काय करायचे?

आम्ही प्रदर्शनाच्या इथे रेंगाळलो. पुस्तक विक्रेत्याशी गप्पा मारल्या. त्याला प्रकाश संत किंवा त्यांची पुस्तके माहीत नव्हती. मी सारखा फिरतीवर असतो, बेळगावात नसतो अशा सबबी सांगत होता. काही पुस्तके घेतली.
एका परिचितांकडे जायचे होते, त्यांच्याकडे जावे, तिथे कदाचित माहिती मिळू शकेल. ’रेल्वेच्या पहिल्या गेटाकडे’ जावे आणि फिरून जरा शोधावे असे मी म्हणत होते.

लंपन आमचा कितीही लाडका असला तरी त्याची पुस्तके वाचणारे कमीच भेटतात. आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण कमी. साक्षरांमधेही वाचणारे कमी. वाचणारांमधेही बहुतेक रोजचे वर्तमानपत्र आणि साप्ताहिकं, मासिकं वाचणारे! पुस्तके वाचणारे लोकच मुळात किती कमी आहेत!

तेव्हढ्यात घाईघाईने एक आजोबा वाचनालयाच्या मागच्या बाजूने येत होते. मिलिन्दने त्यांना आम्ही कशासाठी आलो आहोत ते सांगितले. ते म्हणाले,” मी तुम्हांला एक फोन. नं. देतो, ते तुम्हांला अधिक माहिती देऊ शकतील.” शेजारीच त्यांचा बंगला होता, आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी एक फोन लावला, आम्हांला म्हणाले,” विष्णुपंत कुलकर्णी स्वत:च इकडॆ येत आहेत.”

दरम्यान गंमत अशी झाली होती की आम्ही वाचनालयात गेलो, पाठोपाठ काही भुरटे चोर वाचनालयाच्या मागच्या बाजूला गेले, त्यांनी तोड्फोड केली आणि काही वस्तू चोरून घेऊन जात होते, ते या शेजारच्या वेलंगी आजोबांनी पाहिले. म्हणून ते घाईघाईने इकडे आले होते, त्यामुळे त्यांची आमची भेट झाली. विष्णुपंत कुलकर्णी म्हणजे वाचनालयाचे चिटणीस. ते येईपर्यन्त वेलंगी आजोबांनी आम्हांला इंदिरा संतांचे जुने घर कुठे आहे ते सांगीतले. दहा मिनिटांत कुलकर्णी आले, पंच्याहत्तर/ शहात्तर वर्षांचे विष्णुपंत सायकलवरून आले. वेलंगी आजोबांनी त्यांना थोडक्यात चोरीविषयी सांगीतले, नंतर आमची ओळख करून दिली. तेव्हढ्यात वेलंगीआजी बाहेर आल्या त्यांनी (बहुधा चोरीसंदर्भात) आमची चौकशी सुरू केली, आम्ही केंव्हा आलो, काही पाहिले का? वगैरे. आम्ही काहीही पाहिले नव्हते, आम्हांला काहीही ऎकू आले नव्हते, त्या पुस्तक-विक्रेत्याला तर अजूनही काही कळले नसेल. विष्णुपंत कुलकर्ण्यांनी आमची त्यातून सुटका केली आणि आम्हांला इंदिरा संतांच्या नवीन घराचा पत्ता दिला. तिथे रवी संत (इंदिराबाईंचा मुलगा) राहतात, हे ही सांगीतले.
वा! त्यांच्याकडून तर नक्की माहिती मिळेल. हे तर एकदम भारी! आम्ही रिक्षाने तिकडे निघालो, मधे राणी पार्वतीदेवी कॉलेज लागलं तिथे वर्षभर पुलं शिकवायला होते. थोडे शोधल्यावर इंदिराबाई्चे घर सापडले. शेजार्‍यांनी सांगितले, मोठा कुत्रा आहे, म्हणून बाहेरूनच आवाज देत होतो. एक तरतरीत आजी बाहेर आल्या, त्यांना आम्ही कुठून, कशासाठी आलोय ते सांगीतले, त्या म्हणाल्या,” तुम्ही आत या. ” या रवी संत यांच्या पत्नी, इंदिराबाईंच्या सूनबाई, वीणा संत.

त्यांच्याशी गप्पा झाल्या. शेवटची पंचवीस वर्षे इंदिराबाई इथेच राहात होत्या असे त्या म्हणाल्या. मला इंदिराबाईंची वासंती मुझूमदारांनी घेतलेली मुलाखत टीव्हीवर बघितल्याचे आठवत होते, ती ह्याच घरात झाली का? असे विचारल्यावर त्या हो म्हणाल्या, बाहेरचा झोपाळा ओळखीचा वाटला.
जुनं घर रेल्वेच्या पहिल्या गेटाजवळ ठळकवाडीत आहे. इंदिराबाईंच्या बहुतेक कविता त्यांनी त्या घरातच लिहिलेल्या आहेत. ( ’ घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली’) पूर्वी बाईंनी लावलेली सायली खरंच अंगणात होती, मोठ्ठं अंगण होतं, फणसाचं झाड होतं (कटीखांद्यावर घेऊन बाळे?), लक्ष्मीची झाडे होती, केळीचं झाड होतं, आंब्याचं होतं.’ म्हणे समोरची खुर्ची , ”बैस इथे क्षणकाळ” , घेते ठेऊन टेबल , माझी धनोली, घड्याळ ’ म्हणणारे घर ते तेच! ’उंदरांचाही संसार होऊ दे’ म्हणणारे घर ते तेच!
आमचा असा समज होता, प्रकाश संत हे बेळगावला त्यांच्या आजी आजोबांजवळ राहायचे. वीणाताई म्हणाल्या,” ते सख्ख्य़ा आजीला दत्तक गेलेले असले तरी ते राहायचे आई-बाबांबरोबरच! ” आम्ही शोधत होतो ते लंपनचे घर म्हणजे इंदिराबाईंचे ठळकवाडीतील घरच होते. आम्ही सगळ्यांना प्रकाश नारायण संतांचे / लंपनचे घर पाहायचे आहे सांगत होतो, बेळगावात बहुतेकांना इंदिरा संतांचे घर माहित होते! :)
आता घराची कशी अवस्था असेल सांगता येणार नाही, खूप जुनं झालेलं आहे. घरमालक काही लक्ष घालत नाहीत. पुस्तकातल्या सारखा हा स्वतंत्र बंगला नसून जोडून असणार्‍या (चाळवजा) चार घरांपैकी पहिले कोपर्‍यावरचे कौलारू घर आहे. आता अंगण राहिलंच नाही, घरासमोर मोठी भिंत आली आहे, त्या म्हणाल्या.
”सुप्रिया दीक्षित ( प्रकाश संतांच्या पत्नी ) म्हणजे सुमीच ना? ” दिवाळी अंकातील एका लेखात प्रकाश संतांनी आपल्या बालमैत्रीणीला लग्नासाठी कसे विचारले, तेव्हा त्यांची मनस्थिती कशी होती, ते सारं वाचल्याचं मला आठवत होतं. ” हो. त्यांची आई आणि इंदिराबाई दोघी मैत्रिणी, दोघीही ट्रेनिंग कॉलेजमधे शिकवायच्या. त्यांचे घर चार घरे सोडून होते.” मिलिन्दने त्यांना शारदा संगीत विद्यालय, लंपूची शाळा कुठे आहे ते विचारले. त्यांनी आम्हांला लंपनचे घर, त्याची शाळा आणि शारदा संगीत विद्यालय कुठे आहे, कसं जायचं ते सांगीतलं. ” या भागात लंपन, लंपू अशी छोट्या मुलांची नावे खरोखरच असतात का?” ” हो, पण इकडे म्हणणार लंप्या, आमच्या निरंजनला त्याचे सगळे मित्र निर्‍याच म्हणतात.” पुढे त्या म्हणाल्या,” मुलांची आपसातली बोली तुम्हांला कशी ऎकायला मिळणार? ते ” काय बे” ” धरून सोड ” असं ही मुलं बोलत असतात.”
”बेळगाव आता खूप बदललं असेल ना?”
” खूपच. माझे मिस्टर म्हणजे रवी ६७ वर्षांचे आहेत, प्रकाश त्यांच्याहून सात वर्षांनी मोठे होते. आता ते ७४ वर्षांचे असते, ते दहा वर्षांचे असतानाचे बेळगाव म्हणजे साठ-पासष्ठ वर्षांपुर्वीचे बेळगाव.” प्रकाश संतांबद्दल म्हणाल्या ” ते पुस्तकातल्या लंपनसारखे प्रत्यक्षातही फार हळवे होते, ते आईच्या हाताचा ठसा, नाही का? अगदी तसेच!”

त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वीचे बेळगाव शोधायला! इथे पंधरावीस वर्षात माझ्या डोळ्यांसमोर शहरं किती बदलत जातात, अनोळखी होत जातात, मी पाहिलंय.

रेल्वेच्या पहिल्या गेटाजवळ रिक्षा सोडली आणि वीणाताईंनी सांगितल्याप्रमाणे सावरकर रस्त्यावरून निघालो, हणमशेटांकडे घर कुठल्या गल्लीत आहे याची विचारणा केली. पुढे गेल्यावर एका किराणा दुकानदाराला विचारले, त्यालाही घर माहीत होते. प्रत्येकजण आता इंदिराबाई तिथे राहात नाहीत हे सांगत होता. तरीही आम्हांला पाहायचे आहे म्हंटल्यावर चकित होत होता. समोर अपार्ट्मेंट झाल्याने ही घरे मागे गेली आहेत, कुठल्या गल्लीतून शिरावे अंदाज येत नव्हता. एका गल्लीत वीणाताईंनी वर्णन केलेलं घर दिसलं.


दार वाजवून विचारलं, ” इंदिरा संत राहायच्या ते हेच घर का?”
”हो”
आम्ही पुण्याहून आलोय, घर पाहायचंय, का पाहू इच्छितो वगैरे बोललो.
ते ” वेलकम, या, या ” म्हणाले.
कल्पनेतल्या घरापेक्षा हे घर फारच छोटे होते. ( तरी वीणाताईंशी बोलल्याने मनाची तयारी झाली होती. घर नांदते होते, हेच खूप होते. कुलूप लावलेले रिकामे असते तर?)
सलामीलाच ज्यांना भेटायचं होतं ते कुरकुरे फाटकराव भेटले नाहीत. आज्जी आणि कृष्णाबाई तिथे उभं राहून एकशे सत्तावीस मिनिटे गप्पा मारायच्या. ...... आम्ही ज्या वास्तूत उभे होतो ते लंपनचेच घर होते, लेखकाने त्याच्या प्रतिभेने काही गोष्टी कल्पिल्या असतील पण मूळ जे होते ते हेच होते. आम्ही लंपनच्या घरात उभे होतो! खरेच वाटेना!
मला आता भीती वाटू लागली, तो माडीवरच्या खोलीत जाणारा जिना या घरात असेल ना? माडीवरची ती आधी त्याच्या आईची असणारी, नंतर लंपूची झालेली खोली असेल ना?
उन्हातून आल्यामुळे आतल्या मंद उजेडाला डोळे सरावत होते. हळूहळू आतलं दिसायला लागलं. बैठकीची खोली, नंतर मधली खोली शेवटी स्वैपाकघर, फोटो काढण्याची परवानगी मिळाली, फोटो काढले. स्वैपाकघरातून बाहेर येताना एकदम भिंतीलगत असणारा मधल्या खोलीतून वर जाणारा जिना दिसला. वा!... ”वरची खोली पाहिली तर चालेल का?” आजी आम्हांला वर घेऊन गेल्या. वरची खोली पाहिल्यावर ते घर आवडूनच गेलं, आल्याचं सार्थक झालं.
मागच्या बाजूला असणार्‍या दोन खिडक्या, समोरच्या बाजूला वर दोन खिडक्या एका बाजूला तो जिना, हवासा एकांत लंपूला इथे मिळत असणार! स्टुलावर उभे राहिलेले भिंतीवर दिशा रंगवणारे आजोबा मला दिसायला लागले. रंगाचा डाग पडलेल्या जमखानेबुवांना आज्जीने याच जिन्यावरून खाली नेलं ! .......
आम्ही तिथून बाहेर पडलो.(जोशी आजी- आजोबा धन्यवाद!)
गुंडिमठ रस्त्यावरून चालताना लंपूच्याच काय काय गोष्टी आठवत होत्या.
पहिल्या गेटाजवळच्या हॉटेलात खाऊन घेतलं.
पहिलं गेट ओलांडून गावाच्या दुसर्‍या भागात गेलो. लंपूचा नकाशा पाहात होतोच.
रेल्वेचे रूळ हे लंपनच्या भावविश्वाचा महत्वाचा भाग आहेत. त्यांचे फोटो काढले. कुसुमच्या पत्रातली वाक्ये आठवत होती....माझ्या आयुष्याचा तालही मला या रूळांमुळेच सापडलाय. मी आनंदानं या नव्या तालावर चालत राहीन.......

उजवीकडे वळलो एक छोटी बाग लागली नंतर ठळकवाडी क्लब.... अच्छा! ही बाग म्हणजेच मधुमालती ग्राउंड, पूर्वी हे मोकळं असणार आणि एक घसरगुंडी असणार...... चालत पुढे गेलो. कानडी शाळा लागली....लंपूच्या नकाशाप्रमाणे वळलो पण शारदा संगीत विद्यालय काही लागलं नाही. बेळगावकरांच्या दुकानापासून अगदी जवळ आहे असं वीणाताई म्हणाल्या होत्या. बरंच पुढे जाऊन माघारी फिरलो आणि आता शाळा शोधूया असे ठरवले. ... बटणं जागेवर आणि चड्ड्या पोटावर ठेवण्याच्या कामात गुंतलेली पोरं अर्थातच आम्हांला दिसणार नव्हती.. .....

रजपूत बंधू प्रशाला..... छोटीशीच शाळा... एक दोन फोटो काढले, आणखी काढले नाहीत, शाळेची जागा वादात आहे, भांडणं कोर्टात गेली आहेत. शाळेची रया गेली आहे, आम्ही जिना चढून जाऊन वरचे वर्ग बघून आलो. कुठले कुठले वास कोंडलेले ते वर्ग अगदी बापुडवाणे दिसत होते...... लंपनच्या वेळी या शाळेत केवढे चैतन्य नांदत असणार! ...... शाळेला अजरामर करणारा भारी लेखक आपल्या शाळेत शिकून गेलाय याची तिथे कोणालाही कल्पना नाही!
बेळगावकरांच्या दुकानाशी आलो आणि शारदा संगीत विद्यालय शोधायचा पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहायचा असे ठरवले.
यावेळी नकाशा बाजूला ठेऊन विचारत विचारत गेलो. संगीत शाळा सापडली. लंपनने दाखवलेल्या गल्लीच्या अलीकडची गल्ली आहे, अजिबात वर्दळ नाही. काही विचारपूस करावी तर विद्यालय बंद होते. मिलिन्दने पाटीवर पाहिले तर स्थापनेला पंचवीस वर्षेच झालेली, कदाचित संचालक बदलले असतील, वीणाताईंनी सांगितलेले विद्यालय आम्ही शोधले होते, नक्की!
सकाळी दहाला निघालेलो, साडेतीन- चारला हॉटेलवर परतलो.
दमलो होतो आणि खूप मजेत होतो.......

साखळी ही माझ्या आवडत्या कथांपैकी एक आहे! मिलिन्दला म्हणाले,” संध्याकाळी असर्गेश्वर शोधूया का?”
प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत एक मिलिटरी महादेव होता, एक बिस्कीट महादेव होता एक कपिलेश्वर होता. ”असरगा - असर्गेश्वर” हॉटेलात किंवा रिक्षावाल्याला माहित नव्हते. रिक्षावाला म्हणाला, ”मी इथलाच आहे, असला महादेव कुठला, पाहिलो नाही” मग मी कुठल्या महादेवाजवळ धबधबा आहे का? विचारले. नव्हता. शाळेची पायी सहल काढायची म्हणजे शाळेपासून दोन-तीन किलोमीटरवर हवा. कपिलेश्वर तसा आहे आणि पूर्वीचं मंदिर तळ्यात आहे, निदान पाण्याशी संबंध आहे, म्हणजे हाच असर्गेश्वर असणार असा मी निष्कर्ष काढला. तिथे जाऊन आलो.
---------


धारवाडला जाऊन जीएंचं घर पाहून येऊ असं मी म्हणत होते, मिलिन्दने उदारपणे सहलीचा एक दिवस वाढवला. आता आमचा आत्मविश्वास वाढला होता. जीएंची पुस्तके आम्ही सोबत आणली नव्हती. धारवाडचे आमचे नक्की नव्हते. आम्हांला कडेमनी कांपाउंड एवढेच आठवत होते.
दुसर्‍या दिवशी साधारण दहाला निघालो. कौस्तुभकडे ’जीएंच्या कथांमधील परिसर’ असं पुस्तक असल्याचं मिलिन्दला आठवलं, त्याला फोन लावला, तासाभराने वाचून आम्हांला कळव असं सांगितलं.... दीडतासात धारवाड. बेळगावला सगळीकडे आम्ही मराठीतच बोलत होतो.

धारवाडला मराठी कळणारे फारसे कुणी नाहीत. स्टॅंडवर उतरलो. जीएंच्या नावाची, कडेमनी कांपाउंड भागाची चौकशी केली, कुणाला काहीच माहित नव्हते अगदी पुस्तकांच्या दुकानदारालासुद्धा! दुकानात मराठी पुस्तके नव्हती. आता दोन पर्याय होते, कॉलेजात जाणे किंवा वाचनालयात जाणे. ( जणू साहित्यिकाचे घर शोधण्याची एक पद्धतच आम्ही शोधली आहे :) :) )

आम्ही रिक्षाने तिथल्या मुख्य ग्रंथालयात गेलो. तिथल्या कर्मचार्‍यांना जीएंचे नाव ऎकूनही माहीत नव्हते, मराठी येत नव्हते. मी तिथे मराठी पुस्तके आहेत का? विचारले तर त्या बाईंनी मला कपाटाकडे नेले आणि तिथली मराठी पुस्तके दाखवली. एका बाजूला फक्त तीस-चाळीस पुस्तके होती! इतकी अनास्था! त्यातले एकही जीएंचे नाही!...... सोलापुरात महाकवी बेन्द्रे यांच्याबद्दल किती माहिती आहे? त्यांची किती पुस्तके उपलब्ध आहेत एकदा शोधले पाहिजे...... ही साहित्याबद्दलची अनास्था म्हणायची की भाषांमधला दुरावा?

तिथे बरीच कॉलेजातली मुले अभ्यास करत बसली होती. मी विचारले, ”यांत कुणी मराठी शिकणारे असेल का?” त्यांनी नकारार्थी मान हलवली. मी निघाले, त्यांनी मला थांबवलं आणि मुख्य ग्रंथपालांना ’हिरेमठ’ यांना बोलावून आणलं. त्यांनांही जीएंची माहिती नव्हती. मी आपली ते इथेच राहात होते, ते मराठीतले ’ ग्रेट रायटर’ आहेत वगैरे सांगत होते. ते म्हणाले,” तुम्ही किती दिवस धारवाडमधे आहात? मी संध्याकाळपर्यन्त शोधतो.” आम्ही चार पर्यन्त निघणार होतो. तरी त्यांनी फोन नं. लिहून घेतला, कळवण्यासारखी माहीती मिळाल्यास कळवतो म्हणाले. वर तुम्ही १९७ ला फोन करून ’कडेमनी कांपाऊंड ’ सांगा ते तिथला फोन नं. देऊ शकतील, असा सल्ला दिला.
तिथला फोन नं मिळायला तिथे कोणी राहते की नाही, कोण जाणे!

आम्ही निराश होऊन ग्रंथालयाच्या पायर्‍यांवर बसून राहिलो. आता कॉलेजात जाऊन पाहिले पाहिजे, मी म्हणाले आपण पोस्टात जावूनही पत्ता शोधू शकू. असेच बसलो होतो, मिलिन्द भाग्यश्रीला फोन लावून ”पुस्तकातून जीएंचा पूर्ण पत्ता कळव.” म्हणाला. कौस्तुभला फोन लावला तर त्याने कथांमधले ’सोमेश्वर मंदिर, दुर्गामाता मंदिर, कर्नाटक व्यायामशाळा’ धारवाडमधे आहेत हे कळवले. भाग्यश्रीने ” कडेमनी कांपाऊंड, माळमड्डी ” असं सांगीतलं आणि जीएंच्या कॉलेजचं नाव जेएसएस......

... जीएंना जाऊन २३ वर्षे होताहेत, त्यापूर्वी दोन-तीन वर्षे त्यांनी धारवाड सोडलं... पंचवीस/ सव्वीस वर्षांपूर्वी धारवाड सोडलेल्या एका थोर मराठी लेखकाशी धारवाडला काहीही देणंघेणं नाही... जीएंच्या वृत्तीनुसार असतील तेव्हाही आजूबाजूच्यांना त्यांची ओळख नसेल...... एका लेखकाचं घर शोधत जाणं त्यांना आवडलंही नसतं.... जीए इतकं कमी फिरले आहेत, त्यांचा सारा वेळ घर, क्लब आणि कॉलेज यामधेच जाई.... त्यांचे मित्र (काही मोजकी माणसं), त्यांची पुस्तके, त्यांचं लेखन..... लोकांमधे ते रमले नाहीत......पण माणसाच्या मनात असणार्‍या अनघड वाटा त्यांना ऒळखीच्या होत्या, माणसाआतला प्रदेश, माणसातला माणूस त्याचं दु:ख, सुख, मत्सर, क्रौर्य , चांगुलपणा, मर्यादा , नियतीशरणता ते जाणत होते...... त्यांची पुस्तके सोडून ....... घर पाहण्याचा हट्ट आम्ही का धरत होतो? पाच- सहा तासात इथला परीसर नुसता डोळ्याखालून घालणंही अवघड......

उगीचच लंपू-मुक्ताचे फोटो काढत होते. इतक्यात दोघीजणी आल्या, त्यातली एक दुसरीला म्हणाली,” तुम्ही आत जाऊन या, मी इथेच थांबते.” मराठी ऎकून आम्हां दोघांचेही डोळे चमकले. ज्या बाई थांबल्या होत्या त्यांच्याशी मी बोलले, त्या कल्याणी राजे, मुळच्या नागपूरच्या, गेल्या दीडवर्षापासून धारवाडमधे विवेकानंद केंद्राचं काम पाहतात. त्यांनांही जीएं ठाऊक नव्हते, पण त्यांनी त्यांच्या एका परिचितांना फोन केला. त्या मुलालाही काही कल्पना नव्हती, तो म्हणाला बाबांना माहित असेल. कल्याणीताईंनी त्याच्या बाबांना फोन केला, ते सांगू शकणार होते, बॅंकेत कामात होते, त्यांनी दहा मिनिटांनी फोन करायला सांगितला. कल्याणीताईंनी आम्हांला त्या श्रीयुत गोखले यांचा फोन नं दिला. मी त्यांचे आभार मानले, दुसर्‍या बाई आल्यावर त्या दोघी गेल्या.

मी दहा मिनिटांनी गोखल्यांना फोन केला. ” मी विद्या कुळकर्णी बोलतेय....... सगळं सांगितलं.” ते म्हणाले,” तुमच्याकडे काही व्हेईकल आहे का?” ” नाही, आम्ही रिक्षाने येऊ.” ” तुम्ही माळमड्डीच्या कॅनरा बॅंकेजवळ या, मग मी तुम्हांला घर दाखवीन. तिथून अगदी जवळ आहे पण नवीन माणसाला सापडणार नाही. मी गाडी घेऊन येतो.” आम्ही कॅनरा बॅंकेजवळ थांबलो, त्यांना फोन केला, ते म्हणाले ” दोन मिनिटांत पोचतो.” ते चारचाकी गाडी घेऊन आले. ते मुळचे धारवाडचेच, पूर्वी संघप्रचारक म्हणून काम केलेले, आसामात जावून आलेले, सध्या ते व्यवसाय करतात.
आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. त्यांना दोन तीन घरांमधलं कुठलंतरी कडेमनी कांपाऊंड आहे हे त्यांना माहित होतं.
कडेमनी कांपाऊंड हे आमच्या समजुतीप्रमाणे कुठल्या भागाचं नाव नव्हतं तर एका प्लॉटचं नाव होतं. आधी आम्ही पाहिली ती घराची मागची बाजू होती. तिथे कुणी राहात नाही, असं शेजारी म्हणाले. गोखल्यांनी आम्हांला पुढच्या बाजूने नेलं. घर दाखवलं. आम्ही त्यांचे आभार मानले, ते मिलिन्दला म्हणाले ” कुळकर्णी साहेब [:)], मी घाईत आहे नाहीतर तुम्हांला स्टॅंडवर पोचवलं असतं”
घर बंद होतं. फाटकाला कुलूप. मधे एक कुत्रा होता. घरासमोरचं ते अंगण, फुलझाडं, तुळशीवृंदावन पाहून मला जीएंपेक्षा त्यांची बहीण प्रभावतीच आठवत राहिली. अंगणात बारीक रेघेची रांगोळी काढायला तिला खूप आवडायचं.
नंतर सोमेश्वर मंदिर, दुर्गामाता मंदिर आणि कर्नाटक व्यायामशाळा पाहून आम्ही परतलो.
--------------------------------------------------------------------------




**************
दोन्ही ठिकाणी आम्ही वेळेत गेलो....आणखी वर्षा दोनवर्षांनी ही घरे दिसणार नाहीत..... तिथे दिमाखदार इमारती उभ्या राहतील... आयुष्यातला सोन्याचा तुकडा असावा अशी वर्षे ज्या लेखकांनी त्याठिकाणी वास्तव्य केले, त्या लेखकांच्या कुठल्याही ओळखीच्या खुणा पुन्हा दिसणार नाहीत. समाज म्हणून आपण किती अप्पलपोटे आहोत, स्वार्थी आहोत हेच पुन:पुन्हा प्रत्ययाला येत जाते.
कुणी म्हणेल त्यांची पुस्तके? ती तर आहेतच ना?
हो, ती तर राहतीलच, त्यांचे आयुष्य असेल तेवढे दिवस.
पण समाज म्हणून आपण कशाची कदर करायची?
काय आठवायचे आणि काय विसरायचे? कुठल्या आमच्या अभिमानाच्या गोष्टी आहेत, हे ठरवायला नको का?
***************