Monday, June 14, 2010

सर आली धावून....

खूप पाऊस पडला की आमच्या वाड्यात पाणी साचायचं. आम्ही भराभर होड्या करायचो, पाण्यात सोडायचो, दारातून वाकून ती कुठपर्यन्त जातेय ते बघायचो. आणखीही कोणी कोणी होड्या सोडायचं. थोड्या वेळाने पाणी ओसरायचं. कधीकधी झड लागून असायची, सतत पाऊस सुरू. सूर्यदर्शन नाही, मग मला त्या संन्याशांची काळजी वाटायची, सूर्यदर्शन झाल्याशिवाय कसे जेवणार ते? बिचार्‍यांना उपास. आमच्याकडे एक रामदासी यायचे सकाळी सकाळी, त्यांना भिक्षा घालायची म्हणजे मला पळावंच लागायचं त्यांच्या मागे. पुस्तकातल्या रामदासांसारखे दिसणारे हे रामदासीबुवा मोठ्यांदा ’ मना वासना दुष्ट कामा नये रे’ म्हणत असायचे. त्यांच्या जेवणाची विशेष काळजी वाटायची.
इतका सतत पाऊस कोसळायचा, वाटायचं जगबुडी येणार की काय?? आपण तर त्या नोहासारखी नौकाही बांधून ठेवलेली नाही. सगळे मोठे तर बिनधास्त! सतत एकवीस दिवस, एकवीस रात्री असा पाऊस पडत राहिला तर काय करतील??
दोन दिवसांनी सगळ्या घरादाराला, पुस्तकांना, कपड्यांना एक पावसाचा वास यायला लागायचा. स्वच्छ सूर्यप्रकाशाची ओढ लागून राहायची. चिकचिक, ओल, दमटपणा....... ओल्या छत्र्या, रेनकोट....न वाळलेले कपडे... एकदा घरात आलं की पुन्हा बाहेर पडावसं वाटायचं नाही. घरातल्या घरात करायचे उद्योग सुरू व्हायचे. बाबा काही पावसाच्या गोष्टी सांगायचे, गंमतशीर गणितं, कोडी. मी नुकतीच वाचायला शिकल्यामुळे, माझ्या वाचनाचे प्रयोग, कविता, गाणी काय काय सुरू व्हायचं. तरी पाऊस संपायचा नाही.
अशाच एखाद्या रात्री, मध्यरात्री , अचानक ती जोरदार सर यायची. वरच्या मजल्याच्या पत्र्यावरून खाली पडणार्‍या सरीचा तो आवाज मला सहन व्हायचा नाही. छाती भरून यायची, पुढच्या क्षणाचा भरवसा नाही, असं काहीतरी... मी श्वास रोखून बसायची..... रेझोनन्स असेल. ती माझी अस्वस्थ होण्याची फ्रिक्वेन्सी असेल.....आई लगेच उठायची, जागीच असल्यासारखी.... मला तिला सांगायचं असायचं ’ हा आवाज थांबव’ मला काही बोलताच यायचं नाही. मी बधिर.. घाबरून बसलेली... स्वत:ला कुठं लपवावं न कळणारी. मी काही हालचाल करायचे नाही, रडायचे नाही, काहीही करणं शक्यच नसायचं मला. आई उठून उदबत्ती लावायची. मला मांडीवर घेऊन बसायची, अगदी जवळ. माझ्या पायांवर माझी आवडती गोधडी घालायची. हात माझ्या पायांभोवती गुंफायची. माझ्या गालाला गाल लावून ती रामरक्षा म्हणायला सुरूवात करायची....हळू आवाजात....माझी भीती संपायची नाही... पण बाहेरच्या त्या अमानवी आवाजाच्या विरोधात, माझ्या बाजूने आईने तिचा आवाज लावलेला असायचा. रामरक्षा झाल्यावर तो अंगारा मला लावायची. तोवर सर संपली नसेल तर... पुढे ’भीमरूपी महारूद्रा’ ....... ती विशिष्ट सर संपली की मला जरा बरं वाटायला लागायचं. थोपटत थोपटत आई मला झोपवायची. आईची साडी आणि गोधडी यांच्या मधे, आईला चिटकून, मी झोपत असे.
सकाळी जाग येई तेंव्हा उजाडलेलं असे. आई नेहमीसारखी कामाला लागलेली. रात्रीचं स्वप्न विसरावं तसं मी सगळं पुसून टाकत असे.
शाळेत जाण्याच्या तयारीला लागत असे.... रेनकोट घालून घराबाहेर पडत असे....

Wednesday, June 2, 2010

हर्षमानसी

मी पाचवीत होते की सहावीत आठवत नाही. त्यावर्षी आमचा वर्ग कडेला होता. सगळे वर्ग असे सरळ रेषेत, आमचा मात्र काटकोनात. सुटी संपून नुकतीच शाळा सुरू झालेली. पावसाचा वास, मातीचा वास, पहिल्या पावसानं तरारलेला हिरवा वास, नव्याकोर्‍या वह्यापुस्तकांचा वास, बोटावर उमटलेल्या जांभळ्या कॅमलच्या शाईचा वास, सगळे वास घेऊन नव्या वर्गातलं नवं आयुष्य सुरू करणारी हुरहुर घेऊन बसलेली मी.
मराठीचा तास होता. शिकवायला दातेबाई होत्या. निवृतीच्या जवळ आलेल्या. मोठं कुंकू लावीत आणि चापून चोपून नऊवारी नेसत. शिकवताना आम्हांला मराठीबद्दल काहीही गोडी वाटू नये याची काळजी घेत. धडा वाचून दाखवत, आमच्याकडून वाचून घेत, खूप प्रश्नोत्तरे सोडवून/ लिहून घेत, परीक्षेसाठीची पूर्ण तयारी होत असे, पण आम्ही मात्र कोरड्याच.
त्यादिवशी बाई वर्गात आल्या आणि जोरदार पाऊस सुरू झाला. वर्गाच्या मोठाल्या खिडक्यांमधून तो कोसळताना दिसत होता. भर दुपारी काळोखून आले. पावसाचा इतका आवाज होता की पहिल्या बाकावरही बाईंचे बोलणे ऎकू येत नव्हते. मग आम्ही सगळ्याच नुसता तो पाऊस पाहात बसलो आणि त्याचा आवाज ऎकत बसलो. पावसाचा ओलावा वर्गभर पसरला होता. पाचेक मिनिटं ती सर कोसळत होती. नंतर पाऊस कमी झाला, खिडकीमधून दिसेनाशी झालेली झाडे पुन्हा दिसायला लागली. बाईंनी शिकवायला सुरूवात केली.......

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे

आईशप्पथ! आम्ही सगळ्या अशा अधर झालो आणि अख्खा वर्ग असा उचलला गेला त्या ओळींनी! चमत्कारच झाला. मी एकदा बाईंकडे पाहिलं आणि मग खिडकीतून बाहेरच बघत बसले. ती कविता, त्यावरचं बाईंचं स्पष्टीकरण कानावर पडत होतं. कविता थेट आत शिरत होती. मी तर वर्गात नव्हतेच मुळी, उघड्या हिरव्या माळावर अशी हात पसरून कविता भोगत होते. पुढे मी जेव्हा साऊंड ऑफ म्युझिक पाहिला तेव्हा त्यातलं ते पहिलं दृष्य आहे ना? ती हात पसरून गाणं म्हणत असते तेव्हा मला ’श्रावणमासी’ आठवली.
त्यादिवशी त्या कवितेला परातत्वाचा स्पर्श झाला होता. जे आम्ही अनुभवत होतो ते या जगातलं नव्हतंच मुळी. आनंदाचं एक कारंजं आतमधे सुरू झालं होतं. आम्ही त्यात भिजत होतो. हळूहळू पाऊस पूर्ण थांबला आणि ते वेडं ऊन पडलं. पिवळं, सोनेरी, ओलं, हळवं, सगळ्या जगावर जादू करणारं. आता हा आनंद सहन होईना. हा तो हर्षमानसीच की काय कवितेतला?

तास संपला.