Tuesday, July 5, 2011

ब्रह्मकमळ

ब्रह्मकमळाबद्दल मी कुठे कुठे वाचलं होतं. कुणाकुणाकडून ऎकलं होतं. वाटायचं कधीतरी पाहिलं पाहिजे! ....इतकंच. ओढ नव्हती लागली.
हे ’खरं’ ब्रह्मकमळ आहे की नाही ही चर्चा नंतरची. हे फड्या निवडूंगाचं झुडूप आहे, ते हिमालयातलं खरं ब्रह्मकमळ इथे लागत नाही/ रूजत नाही. वगैरे....
खर्‍या ब्रह्मकमळापेक्षा ही निवडुंगाची फुलं देखणी असतात आणि त्यांचा मंद सुवास हुरहूर लावतो एवढं खरं!
........

आपल्याला फुलं पाहायची सवय असते , त्या फुलांचे देठ / कळ्या फांद्यांना येतात... रितसर.
कधीही फुलाचं चित्र काढायला सांगितलं की फूल काढायचं, त्याला एक दांडी, खाली काही पाने....
ब्रह्मकमळाचं तसं नाही. एक पान... पानाच्या कडेच्या टोकातून कळी उगवते... वरच्या दिशेने नाही तर खालच्या दिशेने वाढते... एके दिवशी वळण घेते.... आणि पानाच्या नव्वद अंशाच्या कोनात फूल उमलतं... पानाखाली झोके घेणारं.....
........

संगमनेरला ब्रह्मकमळाचं पान लावलं. नंतर तिथे फूल आलं ते नेमकं आम्ही गोकुळाष्ट्मीला गेलो होतो, त्याच्या दोन दिवस आधी! आम्हांला फूल पाहायला मिळाले नाही. ठीक आहे.
मग आत्यांनी एक पान आमच्या्कडे आणलं. दीडेक वर्ष तेवढं पान कुंडीत होतं. त्याचा रंग हिरवा असल्याने मी पाणी घालायचे. हे काही लागत नाही....., भाग्यश्रीकडे पाने फुटली होती.

दीडवर्षानंतर त्याला हळूच एक पान फुटलं. वा!
मग आणखी एक.... त्या पानाला आणखी एक..... अशी पाने फुट्त गेली.
कुंडी भरगच्च दिसायला लागली.
आता मी फुलाची, कळी कुठे फुटतेय का? याची वाट पाहू लागले.
एक सरळसोट दांडी वाढायला लागली. याला कळी येईल का? छे! ती चार फूट वाढून त्यालाही पानेच फुटायला लागली. मोराच्या पिसासारखी! आणखी काही हिरवी मोरपीसे तयार झाली.

कळी काही येत नव्हती. येणारही नाही कदाचित! असू दे. असंही झाड किती सुंदर दिसत होतं.
..... आणि गेल्या वर्षी जूनमधे एक कळी आली. मी सारखं पाहते तरी मला दिसली नव्हती, पाहिली त्यादिवशी चांगलीच मोठी झालेली. वा! डोळ्यासमोर असून कशी दिसली नाही!
रोज सकाळी उठून कळी किती मोठी झाली, हेच बघायचं. पानाला फुटलेली कळी खालच्या दिशेने वाढत होती, एके दिवशी अचानक तिने दिशा बदलली. कळीच्या देठाचा बाक कसला वळणदार असतो!
कळी छान टपोरी झाली. संध्याकाळी सात - साडेसातला खजिन्याचं दार उघडावं तसं हळू हळू पाकळ्या विलग होऊ लागल्या. आमच्या सारख्या आतबाहेर चकरा सुरू झाल्या. साधारण साडेअकराला ब्रह्मकमळ पूर्ण उमललं. त्याचा त्याला एक मंद असा छान वास असतो. कमळासारखंच.. पाकळ्या.. पाकळ्या.... एक परीपूर्ण पद्म!

.....ब्रह्मकमळ रूजत नव्हतं.... त्याला पानेच आली... फूल येतच नव्हतं...... आणि फूल आलं.....
बस! घडतं तेव्हा इतकंच असतं ते! .......

फुलायचं कसं हे झाडाला माहितच नव्हतं. एकदा ते रहस्य उलगडलं. मग सोपंच झालं. जुलैमधे फूल आलं, ऑगस्टमधे आलं, सप्टेंबरच्या शेवटी दोनतीन आली.
ऑक्टोबरमधे माळी म्हणाला, ” आता इतक्या उशीरा ही फुलं कशी आली?”
पुढे डिसेंबरातही आली. आता त्याला इतकं फुलायचं होतं की ऋतूंचंही भान उरलं नाही.
पुन्हा वेड्यासारखी मे मधे फुले आली.
त्या बेट्याला बाहेर काय चाललंय याच्याशी काही देणं घेणं नव्हतं, ते आपल्या आतच मग्न! असं वेडं झाड इतकं गोड दिसतं!

आता त्याला कळ्याही आल्या खूप! म्हणजे शंभर सव्वाशे! पानाच्या कडेने टोकाटोकाशी कळ्या!
एवढीशी कुंडी.... तेवढंच पाणी.... बाहेरच्या परीस्थितीचा विचार न करून त्याला चालणार नव्हतं...
किती माती... किती पाणी... किती फुलं..... काहीतरी गणित बघायलाच हवं ना?
मी गावाहून आले तर बर्‍याचशा मोहरीएवढ्या कळ्या काळ्या पडलेल्या!
असं सर्वांगांनी नाहीच फुलता येत इथे!
तू आजूबाजूची माणसं बघतोस का? न फुलता वाढणारी.... फुलण्याच्या शक्यता कोमेजतात त्यांच्या! .....पानांचे पिसारेदेखील फुलवू शकत नाहीत ते!

कळ्या कोमेजल्या तरी कोमेजल्या त्यापेक्षा जास्त हिरव्या होत्या. त्यातल्या काही मोठ्या होत होत्या. मोजल्या तर पंचवीस- तीस!
पहिल्या दिवशी तीन फुले आली. दुसर्‍या दिवशी चक्क पंधरा! फुलांचा वास पसरलेला! झाडाच्या अंगाखांद्यावर सगळीकडे फुले! झाड सजलेलं!
हे वैभव रात्रीपुरतं! सकाळी फुलं सुकून जातात. कुणीतरी म्हणालं ओला मलमलचा रूमाल फुलासमोर धरून ठेवायचा, नंतर तो एका बाटलीत पिळायचा. सुगंध साठवता येईल. मला तसं करावसं वाटलं नाही.
कुणी म्हणालं रात्री फूल तोडून डब्यात घालून फ्रिजमधे ठेवायचं. दुसर्‍या दिवशी तसंच राहतं. मला हे ही करावसं वाटलं नाही.
तिसर्‍या दिवशी अकरा फुलं उमलली. नीट फोटो काढता यावेत म्हणून हातात धरली तर मऊ मुलायम स्पर्श! सुगंध गच्चीत भरून राहिलेला.
एका पानाला तीन फुले होती! पानाला फुलांचा भार होत असणार?...... छे! ’प्रेमाचं ओझं’ असणार ते!
......

चौथ्या दिवशी सकाळी गच्चीत पाहवेना. तीसेक फुले सुकलेली.... पानांखाली लोंबत असलेली. आता नक्कीच हा भार! ही फुलं ना, गळूनही पडत नाहीत! चिवट पानाशी जोडलेली.....
काहीही जिवंत असतं तोवर हलकं, संपलं की त्याचं ओझं.........
काही काही प्रत्यक्षात संपलं तरी आठवणीत जिवंत राहतं.... मग त्याची आठवणही जिवंत, रसरशीत, सुगंधी.... जर आठवणीत संपून गेलं तर... त्या कलेवराचं ओझंच होत जाणार.....

नुसतं फुललेलं झाड कसं आठवणीत ठेवायचं? त्यापाठोपाठ असं उदास, निराश, अश्रू गाळणारं झाडही आठवणारच ना?
History + Edit items + Remove selected items .......... असं नाही ना करता येत!
प्रत्येक फुलत्या गोष्टीचा शेवट काय हे दाखवणारं, शहाणं करणारं झाड ते!
.......

आपल्याला शक्य झालं तर आपली फुले सुकली की वार्‍यावर सोडून द्यायची..... त्यांचा भार होऊ द्यायचा नाही. प्रत्यक्षात नाही आठवणीतही नाही......
.......

झाड अजूनही बर्‍याच मोहरीएवढ्या हिरव्या कळ्या धरून आहे. त्यातल्या काही आठ- दहा दिवसांत लवंगेएवढ्या होतील. मग आणखी मोठ्या होतील, एक दिवस फुलतील........
दुसर्‍या दिवशी सुकतील.....

फुलण्या सुकण्याच्या मधली अथांग काळी रात्र पसरलेली.... त्यावर उमललेलं सुगंधी शुभ्र कमळ.....
अशा काळोखात कुणी कुणी प्रकाशाचे कण धरून असतं... त्यातलं एक
अंधारावर विजय मिळवणारं नव्हे.... अंधार दाखवणारं
अशा काळोखात कुणी कुणी अस्तित्वाचे कण धरून असतं... त्यातलं एक
.......