Friday, October 9, 2009

अजून येतो वास फुलांना

गेल्या काही दिवसांपासून आमच्या पारिजातकाला फुलं येताहेत. छोट्याशा पांढर्‍या पाकळ्यांच्या केशरी दांडी असणार्‍या पंधरा-वीस फुलांचा सडा सकाळी झाडाखाली पडलेला असतो. माझा तर विश्वासच बसत नाहिये! गेल्या वर्षी श्रावणात हे झाड लावलं. या श्रावणात फुले येतील असे वाटले होते. श्रावण गेला भाद्रपद गेला आणि आता अश्विनात पारिजातक बहरला. सत्यभामेने स्वर्गातून आणलेले झाड ते हेच! किती सुंदर देखणी फुलं! त्यांचा तो मंद सुवास! झाडाजवळ उभी राहिले,डोळे मिटून तो वास घेतला आणि मी एकदम कितीतरी वर्षं मागे गेले!
छोटी, झग्यातली, दोन वेण्या वर बांधलेली मुलगी मला दिसू लागली. अंगणभर पारिजातकाचा सडा पडला होता,ही छोटीशी मुलगी फुले वेचत होती. वाड्यात आमच्या शेजारी राहणार्‍या माईआजीची मैत्रिण जवळच राहत असे. त्यांच्या मागच्या अंगणात एक भले मोठे पारिजातकाचे झाड होते. एकदीड फुटाचा खोडाचा व्यास असावा. चार फूट उंचीचं नुसतं खोड, वर दहाफूट व्यासाच्या वर्तूळात पसरलेल्या फांद्या. एवढं मोठं पारिजातकाचं झाड मी आजवर पाहिलेलं नाही. श्रावणात आईला पूजेला फुले लागत म्हणून मी त्यांच्याकडे फुले वेचायला जात असे. मला उशीरा उठायला आवडतं. पण फुलांसाठी मी लवकर उठत असे.त्यांच्याकडे गेले की खाली फुलांचा गालीचा अंथरलेला असे. आणि फुलांचा घमघम वास येत असे. टोपली घेऊन, एकही फूल न तुडवता मी अंगणात उतरत असे. हलक्या हाताने सारी फुले वेचत असे.मग ते झाड हलवत असे, माझ्या अंगाखांद्यावरून फुले खाली पडत. तो फुलांचा पाऊस अंगावर घ्यायला खूप छान वाटे.झाड हलवताना मी वर पाहात असे,पडणार्‍या फुलांचा ओला कोवळा स्पर्श एका वेगळ्याच जगात घेवून जाई. तिथे मी कुणीतरी खास असे,जणू परीकथेतली छोटी राजकुमारी! बाकीचे सगळे माझी इच्छा ऎकण्यासाठी आतुर!
वेचून झाल्यावर सगळी टोपलीभर फुले त्या आजींना द्यायची. मग त्या मला किती फुले देतील याची वाट पाहायची,तो क्षण मला नकोसा होई. एकेक करून मी वेचलेली सगळी फुले मला परकी झालेली असत. मजुरी दिल्यासारखी त्यातली फक्त ओंजळभर फुलं त्या मला देत. मला वाईट वाटे. मी आईला तसे बोलूनही दाखवत असे.आई म्हणायची ,"अगं देवाला चार फुले मिळाली तरी पुरे." तेवढी फुलंही आई चार घरात वाटून टाकीत. माझं वाईट वाटणं केवळ कमी फुलांसाठी नसे.मी दुखावलेली असे, का ते मला सांगता येत नसे.मला त्या आजी मुळीच आवडत नसत. तरी दुसर्‍या दिवशी सकाळी पारिजातकाच्या ओढीने मी त्यांच्या घरी जात असे.
श्रावण म्हणजे ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यात प्रामुख्याने आहेत पारिजातकाची फुलं! सोमवार ,शुक्रवार आम्ही शुक्लेश्वराला/महादेवाला जायचो. तिथे तर ह्या फुलांचा खच पडलेला असे. ती थोडी सुकलेली असत.पायाखाली गेल्यामुळे फरशीवर कुठेकुठे केशरी डाग पडलेले दिसत. फुलांनी आता पार्टी बदललेली असे. सकाळची स्वप्नाळू दुनियेतली फुले आता अध्यात्मात शिरलेली वाटत. पांढर्‍याशुभ्र पाकळ्यांवर केशरी झाक आलेली दिसे.
ही फुले कधी विकली जात नाहीत.फुलवाल्याकडे मिळत नाहीत.एकट्याने एकांतात वाचायच्या कवितेसारखी असतात ही! ह्यांचं जाहीर वाचन होऊ शकत नाही की कार्यक्रम होऊ शकत नाही. फारतर पुस्तकात येऊ शकतात ही.
पण क्वचित एखादी मुलगी पारिजातकाचा गजरा शाळेत घालून येई, शाळेत येईयेईतो तो सुकून जाई. तेव्हा आम्ही मुली फार गजरे घालायचो,फुलं माळायचॊ. बाईंना फुले द्यायला चढाओढ असे. आमच्या शाळेबाहेर एक- दोन बुचाची झाडे होती.आम्ही कायम तिथे फुले वेचत असायचो.वरून फुल पडलं की वेचायचं,कधीकधी झेलायचं. हे माझं / तुझं चालायचं. हातात त्या फुलांचा गठ्ठा असे, मग फुरसतीत त्यांच्या वेण्या तयार करायच्या. आताही बुचाची झाडे फुलली आहेत. लॉ कॉलेज रस्त्यावर तर फुलांचा सडा पडलेला असतो. मला एकदाही तिथे कुणी फुले वेचताना दिसले नाही. फुले वेचणा-या त्या मुली कुठे गेल्या?
मीही आपण कधीतरी फुले वेचत असू हे विसरुन गेले होते. पारिजातकाच्या ह्या गंधामुळे मी त्या दिवसांमधे फिरुन आले. गंधाच्या आठवणी एवढ्या तीव्र असतात हे मला पहिल्यांदाच कळले.
पूर्वी मी नर्सरीत जाऊन तिथे छान दिसणारी/फुले न येणारी कुठल्यातरी अवघड नावांची रोपे घेऊन येत असे. ती निरनिराळ्या कारणांनी टिकली नाहीत. यावेळेस अस्सल देशी झाडे लावायची ठरवले. कण्हेर ,गुलाब,जास्वंदी,कोरांटी, अबोली, सोनचाफा वगैरे. सहज माळ्याला विचारलं पारिजातक मिळेल का? तर त्याने आणून दिला.
ठरवून झाडे लावली असं नाही. लहानपणी आजूबाजूला होती ती झाडे लावू असं वाट्लं होतं. पण ते तेवढ्‍यापुरतंच .
पारिजातकाला फुले येण्याची वाट पाहिली तीही तेवढ्यापुरतीच. फुले आल्यावर मला कळले, मला आतून किती हवी होती ही फुले!
मला आजवर हे माहीत नव्हते, माझ्यात किती रुजलेली आहेत ही फुले! बालपणीचा कुणी मित्र भेटल्यासारखं वाटतंय मला. मधल्या वर्षांनी काहीच परिणाम केलेला नाही आमच्या मैत्रीवर. ती तशीच टिकून आहे फुलाच्या ओल्या कोवळ्या स्पर्शासारखी! मला खूप छान वाटतंय. खूप आनंद होतोय.
या वळणावर हे झाड माझी वाट पाहत थांबलं असेल अशी अपेक्षा मी केली नव्हती.पर्‍या,राजकुमार्‍या आणि त्यांचे सेवक सगळेच पुस्तकात गेले. त्यांना बाहेर येता येत नाही की मला त्यांच्या राज्यात शिरता येत नाही. मोठं होणं किती हतबल करतं नाही माणसाला? तरीही टेरेसवर जावून डोळे मिटून येणारा वास घेतला की त्या आठवणींमधे तरी जावून येता येतं. मनाची मोठी गंमत असते नाही? आत खोलवर कुठे काय काय द्डून बसलयं आपल्यालाही पत्ता नसतो. कुठ्ल्या किल्लीने कुठले दार उघडेल आणि त्यात काय सापडेल काही सांगता येत नाही.
माझ्या आठवणीत आज फक्त फुलांचा सडा आणि ते झाड आहे. काळाच्या ओघात आजींना मी कधीतरी माफ करुन टाकलंय. त्या बिचार्‍या एकट्या राहत, गावातच मुलगा सून वेगळे राहत,त्यांचं वय झालं होतं.त्यामुळे विक्षिप्तपणा असेल. आज मला त्यांच्याबद्द्ल कृतज्ञताच वाटते. त्या सगळी फुले वेचण्यासाठी ठेवत. माझी आणि पारिजातकाची गाठ त्यांच्याशिवाय कशी पडली असती?
तर,
आमच्या पारिजातकाला फुले येताहेत ही बातमी मी सगळ्यांना सांगायला सुरवात केली. पण "हो का?" "वा! वा!" "छान!" याच्यापलीकडे कोणी गेलं नाही. मी हिरमुसले. कोणाला काही कळलंच नाही.
मला वाटतं या आनंदाचंही असंच आहे, एकांतात वाचायच्या कवितेसारखं!