Tuesday, October 5, 2010

गोंदण

आमच्या वाड्यात सगळे मुलगेच होते. मी एकटी मुलगी. एकटी कशी? आक्का होती ना? मी बालवाडीत होते तेंव्हा ती सातवी-आठवीत असेल. ती काही सारखं आमच्याबरोबर खेळायची नाही. सगळ्या मुलग्यांपेक्षा ती मोठी होती. मुले तिचं ऎकायची. ती अबोल, कामसू, नीटनेटकी होती. अभ्यासात फारशी हुशार नसेल पण त्याचं कुणाला काही नव्हतं. एकूण मुलीनं कसं असावं याचा ती आदर्श होती. ती मोठ्यांमधेच मोडायची. मी मात्र मुलांबरोबर भरपूर दंगा करत असे. लपाछपी, विटीदांडू आणि चक्का फिरवणे हे आमचे आवडीचे खेळ होते. दिवस दिवस आम्ही ते खेळत असू. मुलांचेच खेळ खेळत असू असे नाही, एखाद्या खेळाची लाट येत असे, मग सगळे तोच खेळ खेळत, गोट्या तर गोट्याच, चिरकी (ठिक्कर) तर चिरकीच. चिरकी खेळायला कधीकधी आक्का आमच्यात येत असे. भराभर घरं बांधायची. तिचे लांबसडक पाय लयीत लंगडी घालत असत. तिची चिरकी हव्या त्या घरात पडत असे. बाकी गोट्या वगैरे खेळायला ती कधी आली नाही.
मी कशी होते? मी सारखी बडबड करत असायचे. त्यामुळे या काकूंचा निरोप त्या काकूंकडे पोचव अशी कामे माझ्याकडे असत. घरात ज्या गोष्टी फुटू नयेत अशी इच्छा असे, त्या कोणी माझ्यासमोर बोलत नसत. विश्वासला सगळं माहित असे, बाहेर काय बोलू नये हे त्याला कळतं असं मला ऎकून घ्यावं लागे. असाही तो दादागिरी करायचा. मी सतत नाचत असायचे. वेगवेगळ्या पद्धतीने चालायला मला खूप आवडायचं. आमच्या वाड्यात फरशा होत्या. कधी कडांवर पाय न देता मध्यभागीच पाय द्यायचा, कधी फक्त कडांवरून, एका फरशीवर एकच पाय किंवा तिरपं तिरपं चालायचं किंवा नागमोडी चालायचं. जिन्याच्या कठड्यावरून घसरत खाली येणं हा माझा आवडीचा खेळ होता, माझाच काय सगळ्या पोरांचाच! अर्ध्या जिन्यातून हौदाच्या पत्र्यावर उडी मारायची, त्या गंजलेल्या पत्र्यावरून मोरीच्या पत्र्यावर उडी मारायची पुढे गॅलरीचे वाकलेले गज धरून गॅलरीत चढून जायचं हे उद्योग, मोठ्यांचा डोळा चुकवून मी करायला लागले होते. लवकरच माझं लिंबूटिंबू असणं संपणार होतं. आक्काचा सगळ्यात धाकटा भाऊ कायम माझ्याबरोबर असायचा. तो माझ्यापुढे एक वर्ष होता, पण तो माझं सगळं ऎकायचा, खेळात आम्ही दोघेच लिंबूटिंबू असायचो. तिच्या लाडक्या भावाची खास मैत्रिण म्हणून त्यांच्या घरात माझी वट होती.
तिची ती सुखात माझी मी सुखात अशा होतो. पण मी दुसरीत गेल्यावर घरच्या दारच्या सगळ्यांनीच मी मुलगी असल्याचं माझ्यावर ठसवण्याचे प्रयोग सुरू केले. यापूर्वीच माझं बोलणं सुधारलेलं होतं, मी जे मुलांसारखं आलो, गेलो म्हणायचे ते व्यवस्थित आले, गेले म्हणायला लागले होते. माझं झग्याचा काठ, मागे बांधायचे पट्टे चघळणं मी थांबवलं होतं. इथून पुढे सगळ्यांनीच मला आवरून बसायला शिकवायचं मनावर घेतलं.क्वचित झग्याचा मागचा घेर डोक्यावर (पदरासारखा) घ्यायची मला सवय होती. आईनेच ती बंद पाडली. केव्हाही, कुठेही बसलं की झगा व्यवस्थित गुडघ्यांवरून घेतला पाहिजे, कुठेही बसताना आधी दोन्ही हातांनी झग्याचा मागचा घेर साफ करून घ्यायचा मग समोरचा घेर गुडघ्यांवरून घेऊन व्यवस्थित बंदोबस्त करून बसायचं. हे काही मला जमायचं नाही. मी कशीही बसत असे. मग समोरच्या व्यक्तीने ’आ’ करून उजवा हात तोंडावर घेतला की मी लगेच आवरून बसत असे. कधी कधी मी इतकी माझ्या धुंदीत असे की या खुणांकडे माझं लक्षच जायचं नाही, मला जवळ येऊन हलवून जागं केल्यावर मी व्यवस्थित बसत असे. सारखं माझ्यापुढे आक्काचं उदाहरण ठेवलं जायचं. ती बघ कशी बसते, ती बघ कशी चालते, ती बघ कशी आईला मदत करते. सगळ्यांनी सारखं हेच सांगीतल्यामुळे मी आक्काकडे लक्षपूर्वक बघायला लागले.
ती खूप व्यवस्थित होती. भाजी चिरण्यापासून, धान्य निवडण्यापर्यन्त ती आईच्या बरोबरीने कामे करीत असे. ती झटकून, टोकाला टोके जुळवून, साफ कपडे वाळत घालत असे. तिचे केस कुरूळे आणि आखूड होते. ती त्यांची एक छोटीशी वेणी घालत असे, तिच्या चेहर्‍याभोवती कुरूळ्या केसांची महिरप छान दिसे. एके दिवशी मी आईला म्हणाले की मी कपडे वाळत घालत जाईन, आईने मला छोटे कपडे दिले, दुसर्‍या दिवशी आई म्हणाली, ”काही नको मला मदत, हे काय? येतंच! थोडी कमी धडपडलीस, गुडघे फोडून घेतले नाहीस तर तीच मदत मला खूप होईल!"
चार वाजता आक्का छोट्या चरवीत पाणी घेऊन हात, तोंड धूत असे, ती सफाईने परकराचा घेर आवरून बसायची, चेहर्‍याला, डोळ्यांनाही साबण लावून मग थोडसं पाणी तोंडावर शिंपडत असे, नंतर खूप पाणी घेऊन चेहरा धूत असे. त्यानंतर हाताला कोपरापर्यन्त साबण लावून धुवायची, सगळं पाणी दोन बोटांनी निपटून काढायची, असं पाणी निपटून काढत असताना मला एकदम तिच्या हातावर एक हिरवी चांदणी दिसली. ” आक्का, हे काय गं?” ” तारा आहे. गोंदलेला!” वा! कसला सुरेख दिसत होता तो! त्यांच्या गावच्या जत्रेत तिने लहानपणीच तो गोंदून घेतला होता. ” तुला नाही कुठे गोंदलेलं?” ” नाही” मला कुठेही गोंदलेलं नसावं? लगेच घरी येऊन मी आईच्या मागे लागले, ”मला गोंदवून घ्यायचंय.” भांडलेदेखील, आजपर्यन्त मला का गोंदलेलं नाही म्हणून. आई म्हणाली,”मेंदी काढण्याइतकं काही ते सोपं नाही. खूप दुखतं” आईने मला उडवूनच लावलं.
मी आक्कासारखी होण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत होते. ते मला जमण्यातलं नव्हतंच. ती शेवया छान करायची, म्हणून मीही करायला शिकले आणि त्यात तरबेज झाले. आधी हात अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचे, कोरडे करायचे. लोण्यासारखा मऊ कणकेचा गोळा हळुवार हातावर फिरवायचा, त्याची लांब दोरी बनवायची आणि ताटात ठेऊन द्यायची. त्यावर स्वच्छ ओला रूमाल झाकायचा. मग दुसर्‍या गोळ्यापासून एक दोरी बनवायची, वाटल्यास आणखी एक गोळा घ्यायचा. एकानंतर एक दोरी अशा तिन्ही दोर्‍या वळायला घ्यायच्या चार- पाच वेळेला त्या इकडून तिकडे वळल्या की बारीक तार पडत असे. त्यानंतर तिन्हींची टोकं बोटाला गुंडाळून त्या हातावर घ्यायच्या, हाताभोवती शेवया फिरवायला छान वाटे. एका एका तारेचा गार आणि नाजूक स्पर्श हाताला होत असे, त्या दोर्‍यांमधून पलीकडचं दृष्य मजेशीर दिसे. कोणीतरी शेवटची टोके जुळवून देई. दोन्ही हात शेवईसगट ताटात ठेवायचे वरून कोणी ओला रूमाल घाली. मिनिटभर हात तसे ठेवल्यावर रूमाल काढायचा आणि हात लांबवून शेवया ताणायच्या. वळून अर्धा मिलि. केलेला तारेचा व्यास आणखी कमी होत असे. त्यानंतर सुबक घडी करून त्या काठीवर वाळत घालायच्या. काय दिसायच्या त्या! मस्त!(पुढे चौथी-पाचवीत तर मी हातावर खूप छान घेते, अढी पडत नाही म्हणून वळणार्‍या बायका त्यांची वळून झालेली ताटे मला देत.)
एवढं एक शिकले मी तिच्यासारखं! मुलीचं एक तरी काम मला जमलं. एव्हाना मी तिच्यासारखं व्हायचं ठरवून टाकलेलं होतं. नाहीतरी विशूसारखं किंवा वाड्यातल्या इतर मुलांसारखं खोडकर आणि दाणगट मला व्हायचंच नव्हतं. काही खेळ मी सोडून देऊ शकत नव्हते, मुलांमधे खेळायला मजा यायची, हे ही खरंच. पण मोठी झाल्यावर मी ”मुलगी” च असणार होते ना! आता मला शाळेतली एक मैत्रिणही मिळाली होती. पण मला ते गोंदलेलं नव्हतं ना? त्याशिवाय माझ्या मुलगी असण्यावर शिक्कामोर्तब कसं होणार? आमच्या वाड्यातल्या सगळ्या बायकांना गोंदलेलं होतं, एवढंच काय! माझ्या आईला देखील कपाळावर एक ठिपका होता गोंदल्याचा! हे कमी म्हणून की काय माझ्या नव्या मैत्रिणीच्या हनुवटीवर गोंदलेलं. मीच एकटी बिच्चारी! अधून मधून आईच्या मागे लागून काही उपयोग होत नव्हता.
माझे केस लांब होते. आई रोज दोन वेण्या रिबीनी लावून वर बांधून द्यायची. रविवारी न्हायलं की मला केस मोकळे सोडायला मिळत. रिठ्याचा मस्त वास येत असे. केस पुसून आई एक बटवेणी घालून देत असे, बाकी सगळे केस मोकळे! मी डोके मागे करून ते किती लांब झाले आहेत, कुठपर्यन्त पोचताहेत हे पाहात असे. समोर वाकून ते जमिनीला टेकवत असे, हे सारं आईचा डोळा चुकवून. चार वाजता एकदा आईने वेण्या घालून दिल्या की पुन्हा पुढच्या रविवारपर्यन्त मला केसांशी खेळायला मिळत नसे. आमच्या वाड्यात नुकतेच लग्न झालेल्या दोन तीन काकू होत्या. त्यांना माझ्या केसांची वेणी घालून द्यायला फार आवडे. एखाद्या रविवारी त्यांच्यापैकी कुणाकडूनतरी मी वेगळ्या पद्धतीची वेणी घालून घ्यायची. एकदा केसांचे पेड घालताना मी पाहिलं तर काकूंच्या हातावर त्यांचं नाव गोंदलेलं! हिरव्या अक्षरात ’कमल’ पुढे छोटं कमळाचं फूल काढलेलं! मी ते पाहातच राहिले. काकू म्हणाल्या,” तुला नाही गोंदलेलं?” मी मान हलवली. (नुसते केस लांब असून काय उपयोग?) ” अगं देवाकडे जाशील तेंव्हा तो विचारेल ना? नांदून आलीस पण गोंदून नाही आलीस?” मला काही अर्थबोध झाला नाही. देव पृथ्वीवर काय काय केलं याच्या चौकशा करतो हे मला माहित होतं. पण नांदून म्हणजे काय? ” तू मोठी झालीस की तुझं लग्न करून देतील, तू नवर्‍याच्या घरी जाशील, त्याला म्हणायचं नांदायला गेलीस.” अच्छा! देवाकडे गेल्यावर मान खाली घालायची माझी इच्छा नव्हती. हे असलं कारण आईला पटणार नाही हे नक्कीच!
तरी घरी आल्यावर मी आईच्या मागे लागले. कितीही दुखलं, दोन दिवस शाळेत जाता आलं नाही, मला चालणार होतं. फार नाही पण एक चांदणी मला हातावर गोंदायचीच होती. मी सारखी आईच्या मागे मागे....बाबा म्हणाले,” काय पाहिजे?” ” मला हातावर गोंदायचंय” ” मग गोंदू या. काय बरं काढायचं?” ” मला चांदणी काढायचीयं” मग चांदणी कुठे काढायची हे मी आणि बाबांनी मिळून नक्की केलं. केव्हढी ते ही ठरवलं. आईने आमच्याकडे लक्षच दिलं नाही. तिच्या मते काही गोंदायबिंदायची गरज नव्हती. इतक्यात तर नकोच, मोठी झाल्यावर वाटलंच तर गोंदून घेईल. आता तिला काही कळत नाही. मी बाबांना म्हणाले, ”चला जाऊया.” ” कुठे?” ” कुठे काय? गोंदायला.” मजा म्हणजे कुठे गोंदून मिळतं हे बाबांना माहितच नव्हतं. मी ते विचारून ठेवलेलं होतं. शहागंजच्या बाजारात गोंदणारे लोक बसलेले असतात. बाबा म्हणाले,” ते सकाळी असतात, आता ते निघून गेले असतील.” ठीक आहे. पुढच्या रविवारी जावू या... माझ्या हातावर, माझा असा हिरवा तारा!...कायमचा!...माझी ओळख?..... तो आठवडा मी, चांदणी गोंदल्यावर हात कसा दिसेल, सगळ्यांना कसा दाखवीन, याची चित्रे रंगवण्यातच घालवला, पुढच्या रविवारी बाबांना जमलेच नाही. मी खट्टू झाले. त्यापुढच्या रविवारी सकाळीच आम्ही निघालो. जाताना माझा हात धरून आई म्हणाली,” खूप दुखेल हं. इंजेक्शन दुखतं त्यापेक्षा जास्त. फोड येतील, त्यात पाणी पण भरू शकतं. पुन्हा विचार कर.” मला सगळंच कबूल होतं. त्या हिरव्या चांदणीसाठी..... त्या तार्‍यासाठी मी काहीही करायला तयार होते.
शहागंजच्या बाजारात आम्ही सगळीकडे फिरून आलो, नेमके त्यादिवशी कोणी गोंदणारे आलेले नव्हते. आम्ही तसेच परतलो. येताना बाबा काय काय बोलत होते. मी गप्प. मी येताना दिसलेकीच आईने काय ते ओळखलं.
पुन्हाही काही काही घडत राहिलं आणि माझं गोंदायचं राहूनच गेलं.

नववी-दहावीत कधीतरी पैठणला सहल गेली होती, तेंव्हा तिथल्या जत्रेत मी पेटी घेऊन बसलेले, गोंदवून देणारे पाहिले. त्यांच्याभोवती आयाबाया बसल्या होत्या. हसर्‍या, उत्सुक .... मला पुन्हा त्या भूमिकेत शिरता आले नाही. मी गोंदवून घेतले नाही.

Monday, June 14, 2010

सर आली धावून....

खूप पाऊस पडला की आमच्या वाड्यात पाणी साचायचं. आम्ही भराभर होड्या करायचो, पाण्यात सोडायचो, दारातून वाकून ती कुठपर्यन्त जातेय ते बघायचो. आणखीही कोणी कोणी होड्या सोडायचं. थोड्या वेळाने पाणी ओसरायचं. कधीकधी झड लागून असायची, सतत पाऊस सुरू. सूर्यदर्शन नाही, मग मला त्या संन्याशांची काळजी वाटायची, सूर्यदर्शन झाल्याशिवाय कसे जेवणार ते? बिचार्‍यांना उपास. आमच्याकडे एक रामदासी यायचे सकाळी सकाळी, त्यांना भिक्षा घालायची म्हणजे मला पळावंच लागायचं त्यांच्या मागे. पुस्तकातल्या रामदासांसारखे दिसणारे हे रामदासीबुवा मोठ्यांदा ’ मना वासना दुष्ट कामा नये रे’ म्हणत असायचे. त्यांच्या जेवणाची विशेष काळजी वाटायची.
इतका सतत पाऊस कोसळायचा, वाटायचं जगबुडी येणार की काय?? आपण तर त्या नोहासारखी नौकाही बांधून ठेवलेली नाही. सगळे मोठे तर बिनधास्त! सतत एकवीस दिवस, एकवीस रात्री असा पाऊस पडत राहिला तर काय करतील??
दोन दिवसांनी सगळ्या घरादाराला, पुस्तकांना, कपड्यांना एक पावसाचा वास यायला लागायचा. स्वच्छ सूर्यप्रकाशाची ओढ लागून राहायची. चिकचिक, ओल, दमटपणा....... ओल्या छत्र्या, रेनकोट....न वाळलेले कपडे... एकदा घरात आलं की पुन्हा बाहेर पडावसं वाटायचं नाही. घरातल्या घरात करायचे उद्योग सुरू व्हायचे. बाबा काही पावसाच्या गोष्टी सांगायचे, गंमतशीर गणितं, कोडी. मी नुकतीच वाचायला शिकल्यामुळे, माझ्या वाचनाचे प्रयोग, कविता, गाणी काय काय सुरू व्हायचं. तरी पाऊस संपायचा नाही.
अशाच एखाद्या रात्री, मध्यरात्री , अचानक ती जोरदार सर यायची. वरच्या मजल्याच्या पत्र्यावरून खाली पडणार्‍या सरीचा तो आवाज मला सहन व्हायचा नाही. छाती भरून यायची, पुढच्या क्षणाचा भरवसा नाही, असं काहीतरी... मी श्वास रोखून बसायची..... रेझोनन्स असेल. ती माझी अस्वस्थ होण्याची फ्रिक्वेन्सी असेल.....आई लगेच उठायची, जागीच असल्यासारखी.... मला तिला सांगायचं असायचं ’ हा आवाज थांबव’ मला काही बोलताच यायचं नाही. मी बधिर.. घाबरून बसलेली... स्वत:ला कुठं लपवावं न कळणारी. मी काही हालचाल करायचे नाही, रडायचे नाही, काहीही करणं शक्यच नसायचं मला. आई उठून उदबत्ती लावायची. मला मांडीवर घेऊन बसायची, अगदी जवळ. माझ्या पायांवर माझी आवडती गोधडी घालायची. हात माझ्या पायांभोवती गुंफायची. माझ्या गालाला गाल लावून ती रामरक्षा म्हणायला सुरूवात करायची....हळू आवाजात....माझी भीती संपायची नाही... पण बाहेरच्या त्या अमानवी आवाजाच्या विरोधात, माझ्या बाजूने आईने तिचा आवाज लावलेला असायचा. रामरक्षा झाल्यावर तो अंगारा मला लावायची. तोवर सर संपली नसेल तर... पुढे ’भीमरूपी महारूद्रा’ ....... ती विशिष्ट सर संपली की मला जरा बरं वाटायला लागायचं. थोपटत थोपटत आई मला झोपवायची. आईची साडी आणि गोधडी यांच्या मधे, आईला चिटकून, मी झोपत असे.
सकाळी जाग येई तेंव्हा उजाडलेलं असे. आई नेहमीसारखी कामाला लागलेली. रात्रीचं स्वप्न विसरावं तसं मी सगळं पुसून टाकत असे.
शाळेत जाण्याच्या तयारीला लागत असे.... रेनकोट घालून घराबाहेर पडत असे....

Wednesday, June 2, 2010

हर्षमानसी

मी पाचवीत होते की सहावीत आठवत नाही. त्यावर्षी आमचा वर्ग कडेला होता. सगळे वर्ग असे सरळ रेषेत, आमचा मात्र काटकोनात. सुटी संपून नुकतीच शाळा सुरू झालेली. पावसाचा वास, मातीचा वास, पहिल्या पावसानं तरारलेला हिरवा वास, नव्याकोर्‍या वह्यापुस्तकांचा वास, बोटावर उमटलेल्या जांभळ्या कॅमलच्या शाईचा वास, सगळे वास घेऊन नव्या वर्गातलं नवं आयुष्य सुरू करणारी हुरहुर घेऊन बसलेली मी.
मराठीचा तास होता. शिकवायला दातेबाई होत्या. निवृतीच्या जवळ आलेल्या. मोठं कुंकू लावीत आणि चापून चोपून नऊवारी नेसत. शिकवताना आम्हांला मराठीबद्दल काहीही गोडी वाटू नये याची काळजी घेत. धडा वाचून दाखवत, आमच्याकडून वाचून घेत, खूप प्रश्नोत्तरे सोडवून/ लिहून घेत, परीक्षेसाठीची पूर्ण तयारी होत असे, पण आम्ही मात्र कोरड्याच.
त्यादिवशी बाई वर्गात आल्या आणि जोरदार पाऊस सुरू झाला. वर्गाच्या मोठाल्या खिडक्यांमधून तो कोसळताना दिसत होता. भर दुपारी काळोखून आले. पावसाचा इतका आवाज होता की पहिल्या बाकावरही बाईंचे बोलणे ऎकू येत नव्हते. मग आम्ही सगळ्याच नुसता तो पाऊस पाहात बसलो आणि त्याचा आवाज ऎकत बसलो. पावसाचा ओलावा वर्गभर पसरला होता. पाचेक मिनिटं ती सर कोसळत होती. नंतर पाऊस कमी झाला, खिडकीमधून दिसेनाशी झालेली झाडे पुन्हा दिसायला लागली. बाईंनी शिकवायला सुरूवात केली.......

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे

आईशप्पथ! आम्ही सगळ्या अशा अधर झालो आणि अख्खा वर्ग असा उचलला गेला त्या ओळींनी! चमत्कारच झाला. मी एकदा बाईंकडे पाहिलं आणि मग खिडकीतून बाहेरच बघत बसले. ती कविता, त्यावरचं बाईंचं स्पष्टीकरण कानावर पडत होतं. कविता थेट आत शिरत होती. मी तर वर्गात नव्हतेच मुळी, उघड्या हिरव्या माळावर अशी हात पसरून कविता भोगत होते. पुढे मी जेव्हा साऊंड ऑफ म्युझिक पाहिला तेव्हा त्यातलं ते पहिलं दृष्य आहे ना? ती हात पसरून गाणं म्हणत असते तेव्हा मला ’श्रावणमासी’ आठवली.
त्यादिवशी त्या कवितेला परातत्वाचा स्पर्श झाला होता. जे आम्ही अनुभवत होतो ते या जगातलं नव्हतंच मुळी. आनंदाचं एक कारंजं आतमधे सुरू झालं होतं. आम्ही त्यात भिजत होतो. हळूहळू पाऊस पूर्ण थांबला आणि ते वेडं ऊन पडलं. पिवळं, सोनेरी, ओलं, हळवं, सगळ्या जगावर जादू करणारं. आता हा आनंद सहन होईना. हा तो हर्षमानसीच की काय कवितेतला?

तास संपला.

Monday, May 31, 2010

पैठणीच्या चौकड्यांनो

शांता शेळक्यांची एक ’पैठणी’ नावाची कविता आहे. ही आजीची पैठणी आहे.

फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

फडताळ्यातल्या गाठोड्यात पैठणी जपून ठेवलेली आहे. तिथे जे जुने कपडे आहेत ना? त्या प्रत्येकाचीही एक एक गोष्ट आहे. आज कवयित्रीने आपल्याला पैठणीची गोष्ट सांगायला घेतली आहे.
फडताळ, गाठोडे या शब्दांमुळे आपण त्या खूप जुन्या दिवसांमधे जाऊन पोहोचतो. त्यातली ही तळातली गोष्ट आहे. पैठणी कशी आहे त्याचं वर्णन पुढे येतं. पैठण्या अस्सल रेशमाच्या असतात, पूर्वी जरीत सोन्या, चांदीच्या तारा असत. पैठणी हातमागावर विणतात. मागावर विणकाम चालू असलेली पैठणी फार सुंदर दिसते, ते ताणे, बाणे चमकणारे धागे, एका एका धाग्याने, मानवी पद्धतीने पैठणी पुढे सरकत जाते, रोज इंच, दोन इंच. विणून झालेला भाग ज्या निगुतीने गुंडाळून ठेवलेला असतो, बघायला हवा. पैठण्या वर्षानुवर्ष टिकतात. दोन तीन पिढ्यांना वापरता येतात.
हे विणकामाचे वातावरण शांताबाईंना जवळून परीचयाचे होते. त्याबद्दल त्यांनी फार सुंदर लिहून ठेवलंय.
अशी ही पैठणी, आजी तिच्या लग्नात नेसली होती.

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्‍यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची....जाणीव गूढ आहे त्यास.

आजी डोक्यावरून घेतलेला पदर हातात धरून वाकून सगळ्यांच्या पाया पडली होती.... नवी नवरी, नुसते सासरच्यांचे पायच पाहिले असतील, ज्यांना नमस्कार करायला सांगीतला त्यांना करायचा इतकंच. आणि ज्याच्या जोडीने ती सगळ्यांच्या पाया पडली असेल, त्याची तरी तिला ओळख होती का? नाहीच. आजीने त्याला नीट पाहिलेलंसुद्धा नसेल, क्वचित ओझरती डॊळाभेट झाली असेल, भटजींनी सांगीतलं तेंव्हा हाताला हात लावला असेल, सप्तपदीच्या वेळी त्याचा हात धरून मागोमाग चालली असेल. या भांडवलावर अख्खं आयुष्य त्याच्याबरोबर काढायचं. त्याची ओढ वाटली असेल, दुरावाही असणारच. सगळे लग्न विधी पूर्ण होईपर्यन्त तो होताच ना आसपास? त्याचा अंगगंध लागलाच असेल ना पैठणीला?.......ओळखीची...अनोळखीची....जाणीव गूढ आहे त्यास.

धूप-कापूर-उदबत्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

पैठणी नेसायची वेळ केंव्हा येणार? सण-वार असले तरच. बरेचसे सण-वार तर श्रावणातच. सण म्हणजे तर किती कामे, बायकांचा पिट्टा पडतो म्हणून श्रावण जळत गेले असं म्हंटलं असेल का? पैठणीने मन जपलं असं का म्हंटलं असेल? आजीला देवाधर्माचं वेड असेल. तो देव तिला देत असणार मन:शांती. कितीही काम पडलं तरी सण-वार नीट केल्याचं समाधान आजीला होत असेल. सगळी आरासही आजी मन लावून करत असणार. कितीतरी हळदी-कुंकाचे समारंभ पैठणी नेसून साजरे झाले असतील.ते सगळे वासही पैठणी धरून आहे.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.

नवी नवरी संसारात मुरत गेली तशी तशी वापरून वापरून पैठणीही मऊ होत गेली. सराव हा शब्द सरसरून अंगावर येतो मग जाणवतं किती खरा आहे तो! पैठणीने आजीचे आयुष्य कसे गेले हे सांगितले. रंग, गंध, स्पर्शाने! ही कविता वाचताना सारखी सारखी मी येऊन थांबते त्या ओळी आहेत...अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले..... या दोन ओळीत बायकांच्या आयुष्याची गोष्ट आली आहे. काय हवं बाईला?? घरदार, मुलंबाळं आणि अहेवपणी मरण. आजीचं पुण्यं भारी असणार!! सगळं मिळालं आजीला.. तिच्या आयुष्याचं सोनं झालं.
इथे आजीची गोष्ट संपली. आणि नातीची सुरू झाली.....

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात; कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.

पैठणीचा अजूनही आजीशी संपर्क असणार, आजीचं मन गुंतलेलं असेल पैठणीत, नातीचं कुशल पैठणी नक्कीच आजीला सांगू शकेल.
इथे न मागीतलेलं एक मागणं नात पैठणीकडे मागते आहे असं मला वाटतं, ते म्हणजे आजीसारखं अहेवपणी मरण.....

*************

माझी एक मैत्रीणसुद्धा या कवितेत जाऊन बसली आहे. कविता वाचताना ती मला आठवतेच आठवते.
हॉस्टेलवर गप्पांचे विषय कुठून कुठे जातील सांगता येत नाही. एकदा असंच मरणावर बोलणं चाललं होतं. कुणाकुणाचं काय काय... नवर्‍याच्या मांडीवर आणि सगळी नातवंडं अशी समोर दिसत असतानाच मी मरणार, एखादा नातू यायचा असेल दूरून तर मी त्याच्यासाठी थांबेन........ , ...मला तर अपघाती मरण हवं, आत्ता आहे , आत्ता नाही, माझं मलापण कळणार नाही...., मला कळायला हवं सहा महिन्यांनी मरणार, म्हणजे त्या सहा महिन्यात मी हवं तसं जगून घेईन.......असं सगळं चाललेलं.... मग नवर्‍याच्या आधी मरायचं की नंतर? आमचे कुणाचेही नवरे तेव्हा दूरवरही दिसत नव्हते. अशावेळी बोलणं किती सोपं असतं. बहुतेकींचं मत पडलं की नवर्‍याच्या आधी मरायचं. एक मैत्रिण म्हणाली,” तुम्ही सगळ्या स्वार्थी आहात. मी माझ्या नवर्‍यावर खूप प्रेम करीन. शेवटी त्याला कुठलं आजारपण येईल? दुखणं येईल? माहीत नाही. मी त्याचं सगळं करीन. मुलं/ नातवंडं त्याच्याकडे नीट बघतील न बघतील, त्यापेक्षा मीच बघेन. असा माझ्या मांडीवर माझा नवरा जाईल. आणि मग मी मरायला मोकळी .” त्यादिवशी ती माझी मैत्रिण मला जरा जास्त कळली.
**************

Friday, May 7, 2010

राशोमोन पाहिल्यानंतर

’राशोमोन’ पाहिला. एकाच घटनेकडे चौघांच्या नजरेतून पाहिलेलं. राशोमोन (मला आधी राशोमान वाटलेलं) दरवाजा आणि पडणारा पाऊस. कुरोसावाचा ग्रेट सिनेमा. एव्हढंच सिनेमा बघण्यापूर्वी माहीत होतं. पाडळकरांचं पुस्तक हेतुत: वाचलं नव्हतं.
”ग्रेट!!” पहिल्या पाहण्यानंतरची प्रतिक्रिया! काही गोष्टी भिडल्या, काही आवडल्या, काही कळल्या काही नाही कळल्या.
पाडळकरांचं पुस्तक वाचताना त्यातल्या महत्त्वाच्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या हे कळल्यावर छान वाटलं. (म्हणूनच हे लिहायचं धाडस करत आहे. या टप्प्यावर जे कळलंय ते एवढं आणि असं आहे.)
पुन्हा एकदा सिनेमा पाहिला.
१) माणसं देहबोलीतून जे सांगतात, त्यातले बारकावे समजून घ्यायचे असतील तर आधी दहा जपानी सिनेमे पाहून मग पुन्हा ’राशोमोन’ पाहायचा, असा प्रयत्न करून पाहायला पाहिजे.
२) पहिल्यांदा पाहताना सारखं लक्ष सबटायटल्सकडेच जात होतं, ते वाचत पात्रांकडे पाहायचं, एक कसरतच.तरी संवाद खूप कमी आहेत. (त्यानिमित्ताने लक्षात आलं, मला पहिलं आकर्षण शब्दांचंच आहे की काय? काहीही समजून घ्यायचं तर ते शब्दांद्वारे आणि ते बाहेर पडणार तेही शब्दांच्या माध्यमातूनच. माझ्या मनात जाण्याचा मी एक शब्दांचा महामार्ग करून ठेवलाय, बाकी पायवाटा?? )
३) पहिल्यांदा पाहताना ’आत पाऊस- बाहेर पाऊस’ असा मस्त योग होता. सिनेमात शिरायला मदत झाली. पाऊस पडत असताना आपणही स्वीकारासाठी अनुकूल असतो.

**************

राशोमान जवळच्या जंगलातून एक सामुराई आणि त्याची सुंदर बायको जात असतात, वाटेत डाकू त्याला फसवून त्याच्या बायकोचा गैरफायदा घेतो, नंतर त्याचा खून होतो. खून कोणी केला? की आत्महत्या? हे तिघे आणि लाकूडतोड्या यांच्या नजरेतून हे प्रसंग दाखवले आहेत.
छायाचित्रण अफाट आहे. माणसाच्या मनाचं प्रतिक असणारं ते जंगल इतकं प्रभावीपणे चित्रित केलं आहे. छायाप्रकाशाचा खेळ, ऊनसावलीची जाळी असणारी ती जमीन, विशेषत: पानांमधून दिसणारा सूर्य. राशोमोन गेटवर सतत कोसळणारा तो पाऊस. तो पाऊस आणि ते जंगल ही दोन महत्त्वाची पात्रे आहेत.
संगीताबद्द्ल मला काहीच लिहीता येणार नाही, भिडणारं आहे.
अभिनय लाउड वाटला. कदाचित बारावे शतक अधोरेखीत करण्यासाठी असेल, त्यामानाने राशोमोन गेटवरील पात्रांचा अभिनय सहज होता. घटना सांगताना ती अशी जरा भडक होत जाते म्हणूनही असेल. ताजोमारूचा अनागरपणा ठसवण्यासाठी असेल. बरचसं काम शब्दांशिवाय झालं. तिघांच्याही कहाण्या सांगितल्या जात होत्या, त्याप्रमाणे पात्रांचा अभिनय बदलत होता.
मला महत्त्वाचं वाटलं ते दिग्दर्शक चित्रपटाद्वारे काय सांगू पाहतोय ते! (मला काय कळलं ते! मुख्यत: कथेच्या अंगाने)

******
(या भागातील विवेचनासाठी विजय पाडळकरांनी पुस्तकात (गर्द रानात... भर दुपारी) दिलेल्या पटकथेचा आधार घेतला आहे.)
आणखी एक महत्त्वाचं पुस्तकातलं--कुरोसावा म्हणतो,’माझ्यावर दस्तयेवस्कीइतका कुठल्याच लेखकाचा प्रभाव नाही.’

कुरोसावा या सिनेमाच्या मध्यवर्ती कल्पनेबद्द्ल म्हणतो,’यातील माणसे, आपण खरे जसे आहो, त्यापेक्षा अधिक चांगले आहो ह्या असत्याची साथ घेतल्याशिवाय जगू शकत नाहीत." ’कारण माणसाचे हृदय हीच अनाकलनीय गोष्ट आहे.’

यात एक खून होतो, त्यात वि्शेष काही नाही, कितीतरी खून होतात. डाकू ताजोमारू एका परस्रीची अभिलाषा धरतो, तिचा गैरफायदा घेतो, यातही नवीन काही नाही. विशेष हे आहे की प्रत्येक जण ही गोष्ट सांगताना आपली प्रतिमा कशी उजळवू पाहतो.
ताजोमारू सामुराईला फसवून त्या स्त्रीचा गैरफायदा घेतो, इथपर्यन्त गोष्ट सारखी आहे. फरक त्यापुढे सुरू होतो.
(ताजोमारू=डाकू, सामुराई=नवरा, दोन्ही वापरले गेले आहेत.)
कोर्टासमोर तिघांनी सांगीतलेली घटना---

ताजोमारू----
एका वार्‍याच्या झुळूकीमुळे हे झाले. त्यामूळे तो जागा झाला, स्त्रीच्या तोंडावरचा पडदा उडाला, तिचे अप्रतिम सौंदर्य त्याच्या दृष्टीक्षेपात आले, तो मोहात पडला, शक्यतो नवर्‍याला न मारता तिला मिळवायची असे त्याने ठरवले. नवर्‍याला फसवून जंगलाच्या आत नेऊन बांधून ठेवले. ती स्त्री जंगलात खोलवर आली नव्हती. तो तिच्याकडे आला, तिच्या नवर्‍याला साप चावला असे सांगीतले. त्यावर ताजोमारू म्हणतो,’ गोठलेल्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहात होती. अचानक गंभीर झालेल्या मुलासारखी ती मला वाटली. तिला असे पाहून मला त्या माणसाविषयी मत्सर वाटला.” त्यामुळे त्याने नवर्‍याची काय अवस्था केली आहे, ते तिला दाखवायचे ठरवले.
हा क्षण मला महत्त्वाचा वाटतो. नवर्‍याच्या डॊळ्यांदेखत जर काही घडलं नसतं तर गोष्ट बदलली असती.
आणखी एक, हे तिघेही मानवी मनाची ओळख असणारे आहेत. शब्दांपेक्षाही चेहर्‍यावरचे हावभाव, त्याचे त्यांनी लावलेले अर्थ कथेत महत्त्वाचे आहेत. ( तिघेही असे मानवी मनाचे तज्ञ कसे?--एक शंका)
तो तिला नवर्‍यासमोर घेऊन आला. ते दृष्य पाहून ती आपल्या कमरेचा खंजीर काढते, डाकूला मारायला धावते, त्याला तिचे कौतुक वाटते. झतापट होते. शेवटी ती दमते कोसळते. सुरुवातीला प्रतिकार करते नंतर त्याच्या आवेगाला साथ देऊ लागते.
नंतर डाकू ताजोमारु जाऊ लागतो. ती थांबवते, दोघांसमोर मानहानी सहन करू शकणार नाही म्हणते, दोघांपैकी जो दुसर्‍याला मारील त्याच्याबरोबर जाईन म्हणते. डाकू नवर्‍याच्या दोर्‍या सोडतो. नवरा शूरपणे लढतो, शेवटी डाकू त्याला मारतो. ती पळून गेलेली असते.

स्त्री-----
तिचा गैरफायदा घेतल्यावर डाकू पळून जातो. ती रडत नवर्‍याजवळ जाते. त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागते. रडता रडता तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे जातं. ती सांगते,” त्याच्या डोळ्यात दु:ख नव्हतं, संताप नव्हता. होता फक्त माझ्याबद्दल तिरस्कार.”
ती खंजीराने नवर्‍याच्या दोर्‍या कापते, त्याला म्हणते,” वाटल्यास मला शिक्षा करा, मारून टाका, पण असे पाहू नका.” ती खंजीर घेऊन नवर्‍याजवळ जात असते. कोर्टात ती सांगते,”त्या क्षणी मला चक्कर आली. जागी झाले तेव्हा खंजीर छातीत खुपसलेला होता. नंतर मी एका तळ्यात स्वत:ला संपवायचा प्रयत्न केला.” (हे सगळं ती रडत रडत सांगत असते.)

नवरा---
हा मेलेला नवरा एका माध्यमाच्या मार्फत बोलता होतो,
माझ्या बायकोवर अत्याचार केल्यावर डाकू तिच्याजवळ बसून तिचे सांत्वन करू लागला. ”जे काही घडले आहे त्यानंतर तिचा नवरा तिचा स्वीकार करणार नाही”, त्याने तिच्या प्रेमात पडूनच हे कृत्य केले. तिने डाकूबरोबर का जावू नये?
माझी बायको त्याच्याकडे हळूवार नजरेने पाहात होती. माझ्या आयुष्यात इतकी सुंदर मी तिला कधीच पाहिले नव्हते.
माझी बायको डाकूला म्हणाली,’ मला तुझ्याबरोबर घेऊन चल.” त्यापुढे ती म्हणाली,’त्याला ठार कर” याहून क्रूर कुठले शब्द असतील काय? तो डाकूसुद्धा क्षणकाल स्तंभित झाला.
डाकूने तिला खाली पाडले, तिच्या पाठीवर पाय ठेवून म्हणाला,’ या स्त्रीचे मी काय करू? सोडून देऊ की ठार मारू? तू फक्त सांग--” या शब्दांसाठी मी डाकूला जवळ्जवळ माफच केले.
डाकू सामुराईकडे येऊ लागतो, तेवढ्यात ती पळून जाते.
खूप वेळाने डाकू एकटाच परत येतो. सामुराईच्या दोर्‍या कापतो. जातो.
सामुराई खंजीर आपल्या छातीत खूपसून घेतो.

लाकूडतोड्याने ही घटना पाहिलेली असते, कोर्टात तो प्रेत पाहिल्याचे सांगतो. पण नंतर नागरीक आणि उपदेशकासमोर तो त्याने काय पाहिलं ते सांगतो.
ताजोमारू स्त्रीजवळ बसून तिला विनवीत असतो, लग्न करण्यासाठी गळ घालत असतो. तू म्हणशील तर डाकूचे आयुष्यही सोडून देईन, प्रामाणिकपणे कष्टाची कामे करीन. शेवटी वैतागून ’तू हो म्हण, नाहीतर तुला ठार करीन.’
ती स्त्री म्हणते,” मी काय सांगू? एक स्त्री अशा प्रश्नाचे उत्तर देऊ शकते?”
तिला जमिनीत रूतलेला खंजीर दिसतो, तो घेऊन ती धावत नवर्‍याजवळ जाते, त्याच्या दोर्‍या कापते.
ताजोमारू म्हणतो,”अच्छा, आम्ही दोघांनी याचा निकाल लावावा अशी इच्छा आहे तर?”
पण तेवढ्यात नवरा म्हणतो, ’अशा स्त्रीसाठी मी आयुष्य पणाला लावणार नाही. पाहिजे तर ही तुला घेऊन टाक. माझा घोडा माझ्यासाठी हिच्यापेक्षा किमती आहे.’
स्त्रीला धक्का बसतो. ताजोमारू जायला निघतो. ती त्याला म्ह्णते,’थांब’ ताजोमारु म्हणतो, ”माझ्यामागे येऊ नकोस.” जमिनीवर पडून ती रडू लागते. नवरा म्हणतो,’ कितीही रडलीस तरी आमच्यापैकी कुणीही तुला स्वीकारणार नाही.’ असे बोललेले ताजोमारूला आवडत नाही,” तिच्याशी असा वागू नकोस. हे पुरूषाला शोभत नाही. ती दुर्बल स्त्री आहे, रडेल नाहीतर काय करेल?’ हे ऎकल्यावर स्त्री एकदम मोठमोठ्याने हसायला लागते. ( तिचं हसणं भयंकर आहे) ती म्हणते, ”मी दुर्बल? तुम्ही दोघे दुबळे आहात.(नवर्‍याकडे वळत) तू जर खरा पुरूष असशील तर या डाकूला ठार का करत नाहीस? तू खरा पुरूषच नाहीस. म्हणून मी रडते आहे. या नाटकाने मला थकवून टाकले आहे. (ताजोमारूकडे वळून) ताजोमारू तरी कुणी वेगळा असेल असे मला वाटले होते. (त्याच्या चेहर्‍यावर थुंकते.) पण नाही. तोही पुरूष नाही. तोही माझ्या या नवर्‍यासारखाच!”
”ध्यानात ठेवा. स्त्री फक्त खर्‍या पुरूषावरच प्रेम करते. आणि जेव्हा ती प्रेम करते वेड्यासारखे करते. इतर सारे काही विसरून. स्त्रीला फक्त ताकद वश करू शकते. तलवारीची ताकद-”
डाकू आणि सामुराई द्वंद्वासाठी तयार होतात............. शेवटी ताजोमारू सामुराईची हत्या करतो.
स्त्री पळून जाते. डाकू पळतो पण ती त्याला सापडत नाही.

****************

तिघांनी आपापल्या कहाण्या का बदलल्या असतील? ----- कारणे (मला वाटणारी)

लाकूडतोड्याने आपली कहाणी बदलली आहे. शिवाय किमती खंजीर उचलून नेला आहे. तरीही गोष्टीत तो सहभागी नाही, निरीक्षक आहे म्हणून त्याचीच कहाणी जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाणारी आहे असं म्हणता येईल. हे लक्षात घेऊन त्या तिघांनी आपापल्या कहाण्या कशा बदलल्या? आणि का बदलल्या? हे पाहण्याचा प्रयत्न करू या.
ताजोमारू ---- आपण ज्या स्त्रीच्या मोहात पडलो ती सुंदर तर आहेच, सुरूवातीला प्रतिकार करते, ती वेगळी आहे, मी काही कुणाही सामान्य स्त्रीच्या मागे लागलो नाही हे त्याला सांगायचे आहे. तो तिला शोधत नाही कारण शेवटी ती सामान्य स्त्रीसारखी पळून गेली.

प्रत्येकजण (त्यात आपण सगळेही आलोच.) विचारले जावू शकणारे संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन, आपल्या वागण्यातून त्याची उत्तरे मिळतील याची काळजी घेत कहाणी सांगतो. त्यात स्वप्रतिमा जपणे आणि स्वसमर्थन दोन्ही आहे.
अर्थात स्वप्रतिमाही समाजाच्या कुठल्या स्तरातला तो आहे, त्याच्या + समाजाच्या नैतिक अनैतिकतेच्या कल्पना काय आहेत? यावर अवलंबून असते.
ताजोमारू स्त्रीला लग्नासाठी गळ घालतो, हे सांगत नाही, त्यासाठी डाकूगिरी सोडायला तयार झाल्याचे सांगत नाही. त्याने पुन्हा आपली अस्सल डाकूची प्रतिमा उभी केली आहे. उलट सामुराई शौर्याने लढल्याचे सांगतो. ह्याचं शौर्य सिद्ध व्हायचं असेल तर समोरचाही तोलामोलाचा नको का?

सामुराई--- डाकू तिला विनवतो ऎवजी हा सांगतो नाहीतरी या प्रसंगानंतर नवरा तुला स्वीकारणार नाहीच म्हणून तू माझ्याबरोबर चल, असे डाकू म्हणाला. आणि डाकूबरोबर जाताना बायको नवर्‍याला ठार मार असे सांगते. डाकूही अशा स्त्रीला स्वीकारत नाही. इथे बायकोची प्रतिमा वाईट करून तो स्वत:ची सुधारतो आहे.
इतका वेळ अभिमानाने तो बायकोला मिरवीत आणत असतो पण तिच्यावरच्या बलात्कारानंतर तिची किंमत शून्य होते. आजवर बायकोचे सौंदर्य ही त्याच्यासाठी मानाची गोष्ट असेल पण तिचे पावित्र्य संपल्यावर ती नकोशी झाली.
डाकूकडे ती पाहात होती तेंव्हा ती किती सुंदर दिसत होती, हे तो सांगतो..... हे त्याचे स्वसमर्थन चाललेय. अशा बायकोसाठी काय लढायचे?..... स्वत:चं नाकर्तेपण लपवतोय. ज्याची बायको अशी वागते तो काय करणार? म्हणून तो स्वत:च्या छातीत खंजीर खुपसून घेतो.

स्त्री---सांगते तिला नवर्‍याचे केवळ तिरस्काराने, थंडपणे बघणे असह्य होते. नाहीतरी त्याची बघ्याचीच भूमिका असते. ती द्वंद्वाला उद्युक्त केल्याबद्दल काही बोलतच नाही. इथे ती स्वत:ची प्रतिमा खाली करून नवर्‍याची सावरते आहे. ती नवर्‍याला खलनायक बनवत नाही, नवरा मात्र सगळा दोष तिच्या माथी मारतो आहे. ती असे करून फार त्याग करतेय असं नाही, हे करून ती स्वत: सहानुभुती मिळवू पाहते आहे. कारण सरळ सरळ नवर्‍याला दोष देणारीला सहानुभूती मिळणार नाही हे तिला माहीत आहे.
नवरा अनावधानाने स्वत:कडून मारला गेल्याचं ती सांगते, हे ही तसं पाहता खरंच आहे, शेवटी तो तिच्यामुळेच मेला ना? तरी त्याला मारण्याचा गुन्हा ती स्वत:वर का ओढवून घेत असावी?

*************

एकाच घटनेकडे पाहण्याचे तिघांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. प्रत्येकासाठीचं सत्य वेगवेगळं आहे. कोणीही गुन्हा लपवत नाही, प्रत्येकजण आपापल्या परीने खरंच सांगतो आहे.
आपण आपापल्या परीने वाढत असतो, बरे-वाईटाच्या आपापल्या व्याख्या असतात ( जरी त्याच्यांवर समाजाचा प्रभाव असतो.) आपले अनुभव असतात, आपली कुवत असते, हे सगळं घेऊनच आपण सत्याला भिडतो. ह्या संचितामुळे जे आपल्याला सत्याचं आकलन होईल ते आपलं सत्य. खास आपलं! ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणारंच ना?
जे सत्य असतं, त्याची नॊंद करताना आपण त्याचे आपल्या परीने अर्थ लावून नोंद्वून घेतो, नोंदवून घेतलंय ते सत्य नाही. ते सत्याचं आकलन आहे.
मग निरपेक्ष सत्याचं काय? तसं काही असणं शक्य आहे का? तसं नसेल तर आधाराची फळीच काढून घेतल्यासारखं होईल.
सत्य आणि असत्य यात तरी काही फरक करता येईल की नाही? आपल्याला कळलेलं सत्य जाणीवपूर्वक बदलणे म्हणजे असत्य असं म्हणता येईल का? मग सत्य आणि असत्य यात महत्त्वाची गोष्ट जाणीव/ जाणीवपूर्वकता? मग अजाणतेपणीचं सगळंच आकलन सत्य? छे! हे काही गणित नाही. असेल तर मला कळलेलं नाही किंवा गृहीतकात काहीतरी चूक असेल.
आपलं सत्य म्हणजे आपल्या अनुभवांनी डागाळलेलं सत्य??
म्हणजे आपण वागणार एक आणि दुसरे त्याचा अर्थ लावून ठरवणार आपण काय/ कसं वागलोय ते! मग आपण सुद्धा समोरचा काय अर्थ लावेल याचा अंदाज बांधत आपल्या सत्यापर्यन्त त्याला पोचवता येईल असं वागायचं. सत्यावर संस्कार करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे सत्य आणि असत्य यांची सरमिसळ होतेय का?
असं करून आपण जे सत्य बनवतो ते आपल्या अहंकाराला सुखावणारं, आपली प्रतिमा सुधारणारं असं असतं का? म्हणजे स्वार्थी सत्य?? कुणाला ऎहिकाची ओढ कुणाला पारलौकिकाची. पण स्वार्थ कुणाला चुकला नाही.
मग निखळ सत्याला जाणून घेण्याची काही वाट आहे की नाही?? की तसं काही अस्तित्वातच नसतं?

सिनेमा पडद्यावर चालू असतो तोपर्यन्त काही नाही पण नंतर तो मनात घुसतो....... आपण विचार करायला लागतो, ह्या व्यक्तिरेखा अशा का वागल्या असतील?...... पुढे विचार करतो, माणसे अशी का वागतात?....... मग लक्षात येतं, आपणही माणूसच आहोत.....ते थेट आपल्याजवळच येऊन पोचतं....प्रत्येक वेळी खंजीरच खुपसावा लागतो असं नाही.................

*************

Monday, May 3, 2010

ती वेळ येईल तेव्हा

आमच्याकडे हिरव्या कापडी बांधणीचं ’कठोपनिषद’ होतं. त्यातील नचिकेत आणि यम यांची प्रश्नोत्तरे वाचण्याचा फार पूर्वी एकदा प्रयत्न केला होता. तेव्हा काहीही कळलं नव्हतं, हे आठवतंय. रेड्यावर बसलेल्या यमाचं उगमस्थान ते पुस्तकच आहे की काय असं वाटलेलं. मृत्यूचा शोध घेणार्‍या नचिकेताचा मात्र चेहरा डोळ्यासमोर येत नाही.
००
’विहिर’ पाहिला.( नीट कळायला अजून एकदा पाहायला हवा आहे.) आपापल्या पातळीवर आपणही शोधत असतोच अर्थ. जीवनाचा शोध काय नि मृत्यूचा शोध काय शेवटी एकच आहे.
००
’आपण अमर असल्यासारखे जगतो’ असं म्हणतात, मला ते तितकसं खरं वाटत नाही. मरणाची जाणीव आपल्या आत खोलवर असते. मृत्यूचा घाव फार लवकर स्वीकारतात लोक. त्यातनं बाहेर कदाचित येणार नाहीत लवकर, पण स्वीकार होतो. कारण आत आत आपल्याला ते माहीत असतं.
००
आत्मा अमर, तो शरीरे बदलतो. अशा कल्पनांनी माणसाला खूप आधार दिला असणार. आपण संपणार, काहीच उरणार नाही, पुढे काय?? मुलांबाळांवरचं प्रेम हे त्या तीव्र जीवनेच्छेमुळे असेल काय?
००
औरंगाबादला पुस्तके मासीके चाळताना, एक मला आवडणारी कविता सापडली, ’अकस्मात धनलाभ’ व्हावा तशी! आशय माझ्या लक्षात होता, शब्द विसरल्याची चुट्पूट लागून राहीली होती.

ती वेळ येईल तेव्हा

मंत्र नकोत, फुलं नकोत
भाषणंबिषणं तर नकोतच नको.
तुला तर ठाऊक आहेतच
माझ्या सगळ्या आवडीनिवडी.

शेंदरी पानं गळताना
बागेतून मारलेली चक्कर
शेकोटीच्या उबदार धगीसमोर
मन लावून घातलेले गोधडीचे टाके

मी स्वैपाक करीत असताना
तू मोठ्याने वाचलेल्या कविता
अंधार्‍या नि:शब्द हिमसेकात
एकाच पांघरूणामधली ऊब.

एक तेवढं लक्षात असू दे.
तशी काही चढाओढ आहे असं नाही. पण
तुझ्यावरचं प्रेम आणि शब्दांवरचं प्रेम
यामधलं अधिक तीव्र कुठलं?

तेही ठरवायचं कारण नाही.
काही कोडी न सोडवलेलीच बरी!
ती वेळ येईल तेव्हा
फक्त एक कविता वाच.

--अजिता काळे

योगायोगाने (कदाचित तेव्हा मी मुद्दाम ठेवले असतील, दोन वर्षांनंतरच्या ) त्या खालच्या अंकात अजिताला श्रद्धांजली होती. तिने स्वत:ला मिटवत आणले, संपवले. का ते तिच्या जवळच्यांनांही कळले नाही.
००

Monday, April 5, 2010

मुक्काम घर

घर म्हणजे घरातली माणसं, त्यांचे नातेसंबंध, ओलावा, प्रेम वगैरे हो ना? घर म्हणजे नुसत्या दारे, खिडक्या, भिंती, छप्पर नव्हे, नाही का?

हे काही खरं नाही. घर म्हणजे ते सगळं सुद्धा सिमेंट, दगड, वीटा वगैरे. भिंती- त्यावरचे रंग, खिडक्या- त्यातून दिसणारी झाडे,आकाशाचा तुकडा, कपाटे, पुस्तके, पेपर, स्वैपाकघरातली भांडी, ड्बे, खुर्च्या, टेबले सगळं सगळं. हे सगळं माझ्या ओळखीचं आहे, त्यांच्याशी माझ्या आठवणी निगडीत आहेत. हे सारं माझ्या भोवती आहे, म्हणून तर हे माझं घर आहे ना? या घरातल्या सगळ्या वस्तू जोवर आपल्याला आपलंस करून घेत नाहीत ना,? तोवर घर आपलं होत नाही.
लग्नानंतर मी पुण्यात राहायला आले, तरी घर, माझं मुक्कामाचं ठिकाण, माझं मूळ तिथंच होतं औरंगाबादला, इथल्या घरी मी जणू तात्पुरतीच राहात होते. काळाच्या लांबीवर आपलं घर ठरत नाही. महिन्या दोन महिन्यांनी औरंगाबादला जाऊन पुरेशी उर्जा मी घेऊन येत असे. म्हणजे मी इकडे दु:खात होते असं नाही. व्यवस्थित स्वैपाक करत होते, संध्याकाळी मिलिन्दची वाट पाहात होते, आम्ही भरपूर नाटका-सिनेमांना जात असू, भांडत असू. पण एक उपरेपण होतं.
आमचं शिवतीर्थनगरमधलं घर दोघांसाठी बरंच मोठं होतं, आमच्याकडे सामानही फारसं नव्हतं, आहे तेच इकडे तिकडे फिरवून मी घराचं रूप बदलत असे तेही तटस्थतेने. आम्ही एक सॉफ्ट बोर्ड बनवून घेतला होता, तिथे मी काय काय कविता लिहून लावत असे, मिलिन्दही काही निवडक/ आवडतं लिहून ठेवत असे, ती एक माझी आवडती जागा होती, पण तसं तर मी माझ्या रूममधेही भिंतभर काहीतरी लिहून लावलेलं असायचंच की!
प्रत्येक माणूस म्हणजे एक बिंदू असतो. लग्न झाल्यावर दोन बिंदूंनी एक रेषा बनते. ती कुठल्याही प्रतलात सामावू शकते, सासरच्या - माहेरच्या. मुलं झाली की तीन बिंदूंनी एक प्रतल बनतं, आणि मग त्या कुटूंबाचं अस्तित्व जाणवू लागतं.
मुलं नसली की ते घर, घर वाटत नाही का? म्हणजे आपलं घर हेच त्यांचं मूळ घर असतं ना? मुक्ता झाल्यावरदेखील माझं उपरेपण पुरतं गेलं नव्हतं. सर्वत्र मधलं घर मिलिन्दने घेतल्यावरच मी पाहिलं. मी आणि मुक्ता तिथे धमाल करायचो, भिंतीवर खूप चित्रे काढली होती. खिडकीत बसून गप्पा मारायचो, ओट्यावर पाय पसरून बसायचो. हळूहळू मी बदलत चालले होते. नंतर मुक्ताची शाळा सुरू झाली, पुढे पुढे सारखं औरंगाबादला जाणं जमेनासं झालं.
औरंगाबाद सुद्धा बदलत चाललेलं होतं. आमचं घरंच नाही तर अख्खं औरंगाबादच मला आवडतं. तिथल्या हवेतच आपलेपणाचा वास आहे. त्या गल्ल्या, ते रस्ते, ते दरवाजे, दरवाज्यांमधून रस्ते, चिमण्यांचं झाड, ती दुकानं, ते फुलवाले, ती बुचाची आणि चटकचांदणीची झाडे, आमचा बसस्टॉप, आमची पाणीपुरीची ठरलेली गाडी, रस्त्यांवरची ती दुकाने, आधी सायकलवर नंतर लुनावर माझ्याबरोबर असायच्या त्या मैत्रीणी, आमचा बसायचा ठरलेला कट्टा, आम्ही रात्र रात्र जागायचो ती गच्ची, तो वरचा चंद्र......... सगळंच बदलत चाललेलं होतं. अनोळखी होत चाललेलं.....आपण एखाद्या शहरावर इतका जीव टाकतो, त्याला ते माहितही नसतं, ते शहर चाललंय पुढे पुढे... मला गाठणं शक्य होत नाहीये......... मी तरी त्या शहरावर प्रेम करते की त्या काळाच्या तुकड्यावर? शोधलं पाहीजे.
आमचं घर बदललं नाही. ज्या घरात सुना येतात ते घर त्यांच्या कलाने चालायला लागतं. तिथे येणार्‍या लेकींना ते परकं वाटायला लागतं. औरंगाबादचं घर हे आई-बाबांचं घरच राहिलं त्यामुळे तिथे गेलं की अजूनही ते मूलपण भेटू शकतं आणि त्यात शिरता येतं. आपलं घर हे आपण आहोत तसं आपल्याला स्वीकारणारं असतं. तिथे निवान्त पसरता येतं, उशीरापर्यन्त झोपता येतं, आईबाबांशी भांडताना यांना काय वाटेल याचा विचार करावा लागत नाही, शाळेतलं प्रगतीपुस्तक दाखवावं तसं आपल्या कौतुकाच्या गोष्टी त्यांच्यासमोर मिरवता येतात, मनातलं दु;ख बोलून दाखवावं अशी चार-दोन नाती आपण कमावतो पण आपला आनंद मोकळेपणाने सांगावा अशी नाती दुर्मीळ असतात.

आम्ही जरा मोठं घर घ्यायचं ठरवलं. मी खूप घरे पाहिली आणि आमचं सध्याचं घर आम्हां दोघांनाही आवडलं. घरात काही सोयी करून घ्यायच्या ठरवल्या. आम्ही दोघांनी बसून काय काय हवं हे ठरवलं. त्याचे मी काही आराखडे बनवले, हावळांशी चर्चा झाल्या. एकूणच मी घराची अंतर्गत रचना या विषयात बूडून गेले. वीटांची एक भिंत करायची ठरली, मी लॉरी बेकरचं पुस्तक घेऊन आले, त्यातली एक मांडणी सुचवली. नुसत्या वीटांमधून किती वेगवेगळ्या रचना करता येऊ शकतात! काटकसरही करत होतोच. त्यामुळे स्वैपाकघरातल्या नव्या ओट्याला जुन्या ओट्यासारख्याच पांढर्‍या टाइल्स लावायच्या ठरवल्या. मग वेगळेपणासाठी त्यावर पेंटींग करायचं ठरवलं. इंटरनेटमुळे तर जगच घरात आलंय. टाईल पेंटींगचे खूप नमुने पाहिले. शेवटी एक मधुबनी चित्र काढायचं ठरवलं. चित्र काढायला मजा आली. त्या टाइल्स बसवल्या आणि घर थोडं थोडं माझं होऊ लागलं. हावळांची डिझाइन्स होती, काम मिलिन्दचा मित्र पीडी करत होता. घरात झोपाळा बसवायचा ठरवला होता, मी तो कधी बसेल याची वाट पाहात होते. पीडी बरोबर टिंबर मार्केटमधे चकरा मारल्या, शेवटी आम्हांला हवा तसा झोपाळा मिळाला. मिलिन्द तेंव्हा महिनाभर सिडनीला होता. तीन-चार महिन्यांच्या सुहृदला घेऊन मी घराच्या आघाड्या सांभाळत होते, घरात गुंतत चालले होते. झोपाळा आणला. बसवायचा राहिला होता.

वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुटीत चार-सहा दिवस आम्ही आमच्या मधल्या मामाकडे जायचो, मुधोळला. सगळीच मामे-मावस भावंडं जमलेली असायची. सगळ्यांची सगळ्यात आवडती गोष्ट होती, ”बंगई" म्हणजे झोपाळा. मुधोळला गेल्यावर हातपाय धुवून झाले, देवाला आणि मोठ्यांना नमस्कार करून झाला की बंगईवर बसायचे. समोरून तीन, मागे तीन, बाजूला दोन उभे, एखादं छोटं मांडीवर ! अशी ती झुलायला सुरूवात व्हायची. जागा बदलल्या जायच्या पण झुलणे सुरूच. कधी कधी भांडणं व्हायची, आया म्हणायच्या ”जा की जरा, नागूमावशीच्या बंगईवर.’ मग काहीजण डोळे पुसत तिकडे. मामाच्या घरी लाकडी पाट होता तर इकडे बाजेसारखी विणलेली बंगई होती. नागूमावशीची मुले जर बंगईवर बसलेली असली तर उठून सहजच आम्हांला बसू देत. किती उदार! नागूमावशी काहीतरी निवडत बसलेली असायची, मग तिच्या चौकशा सुरू होत. शेवटी ”मुधोळच्याच शाळेत घाला नाव, म्हणजे रोज बंगई खेळता येईल.” एकेकदा वाटायचं खरंच असं करावं का? आई जवळ नसेल तर चालणार नाही हे लक्षात येई. शाळेला सुट्या लागून बरेच दिवस झालेले असत, शाळेच्या आठवणीने एक कळ येऊन जाई. मग पुन्हा तिथून उठून मामाकडे. कोणी बंगईवरून उठलं तर बंगईवर! जोरात झोका घेऊन, पाय लांब करून तुळईला लागेल का हे पाहायचे. पण असले खेळ मोठे कोणी चालू देत नसत. बाकीचं आमच्या आजूबाजूचं सगळं स्थिर जग आणि आमचं त्यापासून वेगळं असं हलतं जग. आमच्या जगाचे जणू नियमच वेगळे! तिथे बसल्यावर आम्हांला सारखं हसायला येत असे. वेगात समोरून येणारा वारा आम्हांला मागे ढकलायचा, मग पायाने जमिनीवर रेटा देऊन आम्ही वेग वाढवून त्याला हरवायचा प्रयत्न करायचो, तो बेटा आणखी वेगाने येऊन आम्हांला हसवत असे. मित्रच आमचा! आम्ही स्थिर आहोत अशी कल्पना केली की बाजूच्या भिंती, कोनाडे, दारं हलताना दिसायची, ती एक गंमतच वाटे. झोपाळ्यावर बसणे म्हणजे आमच्या आनंदाची परमावधी! रात्री झोपताना नाखुषीनेच आम्ही त्यावरून उतरत असू. झोपलो तरी बंगईवर बसून आहोत असंच वाटे, दुसर्‍या तिसर्‍या दिवशी आमचं इतर गंमतींकडे लक्ष जात असे.
बंगईशिवाय मुधोळ अशी कल्पनाच करता येत नाही. मामांनी पुढे ओसरीवर फरशी घातली, आणखी काही बदल केले पण बंगई तशीच ठेवली. नंतर आम्ही भावंडे ज्याला जेंव्हा जमेल तेंव्हा वर्षा-दोन वर्षांनी मुधोळला जात असू. मग सावकाश एकट्या- दुकट्यांना त्यावर बसता येत असे.
कधी मामा बंगईवर बसून आणि मी समोर खुर्चीवर असे आमचे वाद झालेले आहेत, खूप टोकाचंही काय काय मी बोललेली आहे. पुढे पुढे मी ते बंद केलं, ऎकणं वाढवलं. बरोबरीच्या नात्याने मामांनी सांगीतलेलं ऎकलं. रात्री त्यावर बसून मामी काही मनातलं बोलल्या आहेत. बंगई हे संवादाचंच प्रतिक होतं शब्दांच्या आणि शब्दांशिवायच्याही.

आमच्याकडे बंगई बसली आणि इतकं छान वाटलं मला! औरंगाबादच्या माझ्या घराच्या जोडीला हे घरही माझं झालं आहे. आता जेंव्हा मी हे घर माझं आहे असं म्हणते तेंव्हा आतून आतून मला माहित असतं, हे माझं आहे. मग हे गावही मला माझं वाटू लागलं. मुलांसाठी तर हे गाव म्हणजे त्यांचंच गाव आहे आणि मुलं इतकी माझी आहेत ना!......... हल्ली कुठून गावाहून आले आणि इथल्या ओळखीच्या खुणा दिसायला लागल्या की मला बरं वाटतं, चला आलो आपल्या घरी!

बंगईला आम्ही झोपाळाच म्हणतो. बंगई बसवल्यावर माझ्या लक्षात आलं, माझ्या आठवणीतून मी ही माझ्या घरी घेऊन आले आहे, पण त्याबरोबरच काहीच मला आणता आलेलं नाही. बंगई खूप वेगळी आहे झोपाळ्यापेक्षा, त्याची मजा घ्यायला खूप भावंडं लागतात. माझ्या सगळ्या भावंडांसाठी, माझ्या बालपणासाठी मी ’बंगई’ हे नाव मागेच ठेवून आले. ते एकटं नाव तोडून मला इकडे आणताच आलं नसतं.

कधी झोपाळ्यावर बसून सुहृदला झोपवायचं, कधी मी, मुक्ता, सुहॄद बसून सुहृदच्या आवडीच्या कविता म्हणतो, कधी आम्ही दोघं बोलत बसतो, कधी मुलं ओढण्या बांधून त्याचं हलतं घर बनवतात, कधी येणार्‍यांशी मनमोकळ्या गप्पा होतात. कधी मी एकटीच काही काही आठवत बसते. झोपाळा बसणार्‍याचं मूलपण जागतं ठेवतो.

माझे सगळे विचार आणि माझी रूखरूख जर मला गाठोड्यात गुंडाळून खुंटीला टांगता आली ना! तर मी म्हणेन कुठे बाहेर न जाता, पुस्तके वाचत, काही बाही लिहीत असंच कायम घरी राहायलाच मला आवडेल.

Wednesday, March 24, 2010

’ट्युलिप्स’च्या देशातून

’ट्युलिप्स’च्या देशातून हे एक छोटेसे पुस्तक आहे,सव्वाशे-दीडशे पानांचे, अंजू व्हॉन वेर्श हिने लिहिलेले. ही गायिका/कवयित्री संजीवनी मराठे यांची मुलगी. कमर्शियल आर्टचा डिप्लोमा झाल्यावर ती फ्रेंच भाषेचा अभ्यास करत होती, तिचं एक छान मित्रमंडळ होतं. या मंडळींची ह्युब व्हॉन वेर्श या डच तरूणाशी ओळख झाली. त्याला अंजूशी परिचय करून घ्यावासा वाटला. महिनाभरात दोघांनी लग्न करायचं ठरवलं. वयाच्या एकविसाव्या वर्षी (७२ साली) अंजू लग्न करून हॉलंडला गेली. तिथून तिने आईवडीलांना पत्रे लिहिली. तिच्या लग्नाला वीस वर्षे झाली, त्यानिमित्त तिने पाठवलेल्या पत्रांचं (संपादित करून) संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. हा इतका घरगुती मामला आहे.
कुणाकडे तरी सहज गेले होते, तेंव्हा हे पुस्तक जरा चाळलं, चार पाने वाचली, पुस्तक पूर्ण वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली, नंतर कधीतरी अन्य पुस्तके आणण्यासाठी दुकानात गेले होते तेंव्हा हे पुस्तक मी घेऊन आले. पुस्तक मला आवडलं, खरं म्हणजे अंजूच खूप आवडली. तिचं माझं सगळं जुळतं असं नाही, तिच्या एका पत्रात आहे, ’तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सर्वतोपरी डच व्हायचा प्रयत्न करत आहे’ तिला ’मृण्मयी’ आवडली, तिच्यापर्यन्त पोचता येत नाही म्हणून खंत वाटते, मला तर ’मृण्मयी’ पटलीच नाही.( मजा म्हणजे नंतर तेरूओ खूप आवडल्याचं ती लिहिते.)

अंजू पत्रांमधे ह्युबविषयी लिहिते, मित्रांविषयी, मुलांविषयी, तिच्या सासरच्या लोकांविषयी लिहिते, ती ठिकठिकाणी सहलीला गेली त्या स्थळांची, तिथल्या शिल्पांची, चित्रांची वर्णने आहेत, शिवाय पुस्तकांविषयी, संगीताविषयी, चित्रपटांविषयी, निसर्गाविषयी लिहिते. महत्त्वाचं हे आहे की सगळं ती मनापासून लिहिते. स्वत:ला तपासत राहते, परीस्थिती स्वीकारते. त्या दोघांच सहजीवन खूप छान आहे.
सगळ्यात... मधे मधे ती असं मनातलं, खरं खरं काय काय लिहीते ना? ते मला फार आवडतं. सुरवातीच्या एका पत्रात ती लिहिते,
’मी रडले परवा रात्री. तुझा आवाजच आठवेना.’
ह्यापुढचंही छान आहे.
ह्युब म्हणाला,’मला आठवतोय ना, शिवाय घरी गेल्यावर टेप ऎकूच’
पुस्तक वाचताना आधी महिना-दोन महिन्यांच्या ओळखीवर लग्न करून परदेशी जाणार्‍या या मुलीची काळजी वाटते, पोटातून माया वाटते.
वरचा प्रसंग वाचल्यावर जरा बरं वाटलं, आहे की नवरा सोबत. आईचा आवाज आठवत नाहीये म्हणून येणारं रडू त्याला कळू शकलं. त्यावर तो ’मी आहे ना?’ असं म्हणालेला नाही. या क्षणी तो असून उपयोग नाही हे सुद्धा त्याला कळलं.
तिने घरात एक ’इंडिया कॉर्नर’ केला. आईने पाठवलेल्या कडूनिंबाच्या पानांपासून भारतातून आणलेलं/ पाठवलेलं सगळं तिने तिथे ठेवलं. इथे नवर्‍याशिवाय ओळखीचं कुणी नाही, ती लिहते ...पण ही ’जागा’ खोलीत आली आणि एक जवळचं माणूसच कायम इथे आलं असं वाटलं...
हॊणार्‍या बाळाबद्द्ल लिहीताना...एक दोन पांढरी झबली शिवून (स्वत:) पाठव. विकत घेऊ नकोस, कारण मग त्यांना तुमचा ’वास’ येणार नाही... अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी तिला महत्त्वाच्या वाटतात ना? त्या मला आवडल्या.
एकदा ती लिहीते...खूप गप्पा मारव्याशा वाटताहेत. या देशात राहून नवं काय शिकले? तर कोणत्याही कामाची लाज वाटू नये, हे. मुलामुलींत मोकळं पण सभ्य कसं वागावं, हे. घरात स्वच्छता राखावी, हे. सर्व माणसं समान भासली पाहिजेत. त्यांचा दर्जा आपल्याला श्रेष्ठ वाटतो तो का वाटतो? -डिग्रीसाठी, कसबासाठी, सहानुभूतीपूर्ण स्वभावासाठी, मानवी स्वभावज्ञानासाठी, चटकन दिसणार्‍या खुल्या दिलासाठी? ज्यांचा दर्जा कनिष्ठ वाटतो, तो का? कोतं, कोमेजलेलं बंद मन, अग्रेसिव्ह स्वभाव, बुद्धीचा जडपणा, वृत्तीचा खवट कुजकेपणा, फाजील महत्त्वाकांक्षा, हिंसक विचार, धडाधड वाटेल तशी स्टेटमेंट्स करण्याचा स्वभाव? एखादं माणूस का कशामुळे आवडतं किंवा नावडतं? म्हणजे नक्की काय घडतं? गीतेत सांगितल्याप्रमाणे चांगलं व वाईट ही दोन्ही परमेश्वराचीच रूपं आहेत हे कळतं पण वळतं का? असे कितीतरी विचार. त्यातले काहीच अजून पक्के झालेले नाहीत. पण बीजं रूजताहेत. ज्या नव्या गोष्टी शिकले असं सांगते आहे, त्या शिकत आहे. न संपणारी ही क्रिया निदान सुरू झाली आहे........अशी विचार करत बसते ना? म्हणूनही ती मला आवडते. ती लिहिते ते काही फार मोठं तत्त्वज्ञान नाही पण तिने ते अनुभवातून मिळवलं आहे.
आईची, भारताची तिला सारखी आठवण येत राहते. ती आठवणी काढते पण हळहळत बसत नाही. घरात कामे करताना, हे कळवू ते कळवू असं ती मनाशी म्हणत असते.
एकदा लिहिते....आत्ता फारा दिवसांनी शांत वाटतंय. ते जोपर्यन्त जाणवतंय तोपर्यन्त अनुभवून घ्यायचं. मग पाण्यावर तरंग उठतात तशी ती शांतता ढवळते, पण तो थोडका वेळ बरंच काही देऊन जातो, नाही का?
ह्युब किती चांगला आहे याबद्द्ल ती बरेचदा लिहीते...आम्हां दोघांची तार नेहमी जुळलेली असते. अधूनमधून बेसूर झाली तरी ती तशी राहत नाही. रोज रात्री दिवसभर धडपड केलेल्या शरीराने आणि अनेक तर्‍हेच्या गोष्टींनी भरलेल्या मनाने बिछान्यावर पडलो की एकमेंकांबद्दल इतकं प्रेम वाटतं, ममता वाटते. शनिवारी व रविवारी उशिरा {हे मला आवडलं} हळूहळू जागं होताना इतकं छान वाटतं. एकमेकांची उणीदुणी (ती असतातच) न पाहता क्रेडिटेबल गोष्टीच डोळ्यात भरतात.
...... मी कधी कधी त्याला म्हणते की ’तू ज्या तर्‍हेने काम करतोस, अभ्यास करतोस, जीवन जगतोस त्याचं मला फार कौतुक वाटतं, पण ते व्यक्त करायला पुरेसे शब्दच सापडत नाहीत.’ मग तो माझ्याकडे एका मस्त नजरेने बघतो. ’समजलं’ असं सांगते ती नजर. मजा आहे ना?....
.....ह्युबचा अभ्यास उत्तम चालू आहे. दर शनिवारी मात्र तो दिवसभर घरकाम-मुलं-स्वैपाक करतो व मी खोली बंद करून चित्रं काढते. ही एक फारच छान अरेंजमेंट आहे......(वा!!!!!)
... आमचे प्रश्न (विशेषत: personal) भिजत घोंगडं करून न ठेवता वेळीच त्यावर बोलून मनं मोकळी करणं आम्हांला जमतं...
तिला सासरघर पण खूप छान मिळालं. सासूबद्दल तर ती ’मला दुसरी आई मिळाली’ असं लिहिते.
विभी, टॉम आणि प्रेमा (दत्तक-कन्या) यांच्या वाढण्याबद्द्ल लिहिते. स्वत:च्या घरांबद्दल लिहिते.
.......आपण आघारकर बंगल्यात असताना अनुभवलेल्या कितीतरी लहान मोठ्या घटना मला आठवतात. दर पावसाळ्याच्या सुरवातीला गुलबक्षी फुलायची, फाटकापासल्या गवतांत बचनागाची इवली फुलं डोलायची, अंगणाच्या डाव्या बाजूला खूप आघाडा उगवे, गुलाबाचा वेल आणि फाटकावरचा जाईचा वेल, कडुनिंबाचा गंध - किती किती आठवणी. हादगा तर वेड लावणारा. आघाड्याच्या पानाखालची चंदेरी मखमल, आजीकरता अडुळशाची पिकली पानं पण आणायची असत. मोगर्‍याची फुलं हळुवार हुंगावीशी वाटत. गुलबक्षीच्या काळ्या बिया पण त्यांचं देखील नवल वाटायचं. तुला आठवतं का कोपर्‍यातल्या त्या निरूपद्रवी संत्र्याच्या झाडाला खरोखरच एकदा दोनतीन बारकी संत्री लागली होती. अदभूतच नव्हतं का ते?.... या सगळ्या अनुभवांचा व्यक्तीच्या घडणीत खूप वाटा असतो. आमच्या इथल्या country house मध्ये आमच्या मुलांनाही अशा नवलाच्या परी पाहायला मिळतात. शेळ्यामेंढ्या, पशुपक्षी, गवती पानंफुलं पाहत बागडावं - अगं ,एकदा तर मुलांच्या डोळ्यांदेखत भरदुपारी एका वासराचा जन्म झाला....!(खरं आहे! मी लहानपणी एका वासराचा जन्म पाहिला होता, तो माझ्या मनावर कोरला गेलाय.) अशा अनुभवांची लेणी त्यांच्या बालमनावर चढतात..... त्यांचं निसर्गप्रेम फुलतं ठेवतात...
ती असं साधं, सरळ लिहित जाते. सोपं नसतं ते! अर्थात ही खरीखुरी पत्रे आहेत, त्यामुळे नात्यातला ओलावा दिसत राहतो. कधी कधी ती तटस्थपणे लिहीते.
.....आपण दूर अंतरावरून एकमेकांना भेटतो. नेमक्या सुखद भावना एकमेकांना पोचवतो. जवळीक असण्यामधून जे संघर्ष निर्माण होतात ते या परीस्थितीत निर्माण होत नाहीत. अर्थात जर आपला स्नेहसंबंध खर्‍या अर्थाने विकसीत होत असेल, तर त्यात मतभेदांनाही जागा असली पाहिजे आणि ते असूनही मैत्रीचं नातं फुलत राहिलं पाहिजे. नाहीतर तो संबंध एकांगी आणि पोकळ होतो. कुणाशी मतभेद होणं या गोष्टीलाही नात्यात स्थान असतं, याची जाणीव होत आहे.......
तिचं वाढत जाणं पत्रातून दिसत राहतं. हळूहळू ती तिथे रूळते मग संसारात रमत जाते. मग तपशील वाढायला लागतात, मनातलं खरं बोलणं कमी व्हायला लागतं. ( संसारात रमलो की आपण स्वत:पासून दूर जायला लागतो का?)

हे पुस्तक वाचाच अशी मी तुम्हांला शिफारस करणार नाही, चालणार आहे नाही वाचलं तरी. आपल्याला आवडणारी माणसं ग्रेट्च असतात असं नाही, महत्त्वाचं असतं ती आपली असतात. पुस्तकांचही तसंच आहे. शिवाय ग्रेट पुस्तके तर सगळ्यांचीच पण आपली पुस्तके (माणसेही) फक्त आपलीच!
हे पुस्तक म्हणजे काही राजप्रासाद नाही की बंगला नाही किंवा एखादी गगनचुंबी इमारत नाही तुमचं लक्ष वेधून घेईल अशी. हे एक साधं घर आहे, ओसरी असणारं, तुम्हांला या म्हणणारं. माझे या घराशी कसे धागे जुळले माहित नाही पण सवड झाली की मी तिथे जाऊन येते.

Wednesday, February 24, 2010

..कारमाझफ बंधू..

औरंगाबादला एकदा रात्री टीव्ही बघत बसले होते. काहीतरी चालू होतं, पाहावसं वाटलं, कथेत शिरायचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात त्यातलं एक पात्र म्हणालं," मैं तो इस गम के काबील नही" माझ्या अंगावर सर्र्कन काटा आला. हे दु:ख लाभण्याची माझी लायकी नाही? दु:खाला केवढं मोठं केलं त्याने! आपल्याला माहीत असतं मी दु:खात, पण दु:खच माझ्या दारी चालत आलं . ” अरे बाबा, असा गरीबाघरी का आलास? कसं स्वागत करू मी तुझं? कसं तुला सोसू? नाही रे माझी तेवढी लायकी!”. देवाकडे दु:ख मागणार्‍या कुंतीएवढे नसणारच आपण. देवा, तू मला नाही आठवलास तरी चालेल, पण दु:ख देऊ नकोस. असंच मागणं मागू आपण. फारतर आमच्या क्षूद्र सुखदु:खात रमण्याची आम्हांला शक्ती दे.
दुसर्‍या दिवशी आवर्जून त्या वेळेला टीव्ही लावला, तेंव्हा कळलं तो ईडीयट कांदबरीतला भाग होता, सलग चार-पाच दिवस दाखवत होते. शेवटचा भाग मी पाहिला, काही कळले नाही. ते वाक्य मात्र रूतून बसलं.ही माझी दस्तयेवस्कीशी (Fyodor Dostoyevsky) पहिली भेट. तेंव्हा मला ईडियट ही त्याची कादंबरी आहे हे माहीतही नव्हतं.
पुढे मी पुण्याला आल्यावर मॅजेस्टीक गप्पांच्या कार्यक्रमाला गेले होते. श्री.ना.पेंडसेंशी गप्पा होत्या. शेवटी जागतीक साहित्यात मराठी कादंबरी कुठे ? वगैरे. पेंडसे दस्तयेवस्कीचं (डोस्टोव्हस्की, डोटोव्हस्की असेही त्याचे वेगवेगळे उच्चार केले जातात.) नुसतं कौतुक करत होते, विशेषत: त्याच्या ’कारमाझफ बंधू’(Karamazov brothers) चं! मला हा लेखक माहीतच नव्हता. मला जागतिक किर्तीचे सगळे लेखक माहित आहेत असं नाही.(मी खूपच कमी, तेही मराठीच वाचते.) आपल्याला चित्रांमधलं काहीच कळत नसलं तरी कान कापून घेणार्‍या व्हॅन गॉग चं नाव तरी माहीत असतं. तसं पहिल्या रांगेतला हा लेखक मला निदान ऎकून माहित असायला हवा होता असे वाटून गेले.
(तो रशियन असल्याने जास्तच वाटलं. ’ग्लासनोस्त’ आणि ’पेरिस्त्रोयीका’ पूर्वीच्या भारत-रशिया मैत्रीच्या काळात रशियन पुस्तकांचे मराठी अनुवाद सहज मिळायचे. इतकी स्वस्त, इतकी देखणी पुस्तके असत ती! त्यामुळे काही रशियन लेखकांची नावे माहीत होती. साशा, आल्योशा, मिखाईल, फ्योदरोविच आणि ग्रेगरोविच वगरैंना अडखळत नव्हते.)
कॉन्टिनेन्टलच्या अनिरूद्ध कुलकर्णींनी दस्तयेवस्कीची काही पुस्तके भाषांतरीत करून घेतली आहेत. त्यातली काही मी आणली,वाचली. पुढे एका प्रदर्शनात मला ’कारमाझफ बंधू’ दिसले, मी घेऊन आले. वाचायला सुरूवात केली, दमले. पानांमागून पाने काही कळायचं नाही, मधेच वीज चमकून जावी तशी वाक्ये. कशीबशी ती कादंबरी मी शेवटापर्यन्त आणली. आता नव्या समजेने ती पुन्हा वाचायला हवी आहे. एकाच सौंदर्यवतीच्या प्रेमात असलेल्या पितापुत्रांची गोष्ट, त्यात वडिलांचा खून होतो, मुलावर खूनाचा आरोप. यानिमित्तने माणसाच्या मूलभूत वृत्तींचं केलेलं विश्लेषण.
पुस्तके वाचणार्‍या माणसांबद्द्ल मला आदर आहे. बाकीची एवढी आकर्षणे असताना जी माणसे पुस्तकांची निवड करतात त्यांचं कौतुक वाटतं.माझ्या मनात मी त्यांना पुढच्या रांगेत बसवते. माझी आवडती पुस्तके वाचणार्‍यांना / ती ज्यांना आवडतात त्यांना तर मानाच्या खुर्च्या असतात. लंपन ज्यांना आवडतो, त्यांच्याशी माझे धागे जुळतात. ’देनीसच्या गोष्टी’ मधला देनीस तर माझा लाडका आहे ( पुढे उर्जा प्रकाशनाने ते डेनिसच्या गोष्टी म्हणून आणलं, पण माझा आपला देनीसच), पाडस, कातकरी विकास की विस्थापन, मुक्काम , आहे मनोहर तरी, अशी काही(अजूनही बरीच) माझी लाडकी पुस्तके आहेत. ती वाचणार्‍या माणसांबद्दलही मला कुतुहल वाटतं.

तर, कारमाझफ बंधू!
मिलिन्द मुंबईत असताना आम्ही ठाण्यात छोटा फ्लॅट घ्यायचा विचार करत होतो. मी तिथे जाईन तेंव्हा घरं बघायचे. रिसेलचाच बघत होतो.एक घर पाहायला तीन मजले चढून गेलो, तेवढं चढल्यावरच लक्षात आलं हा फ्लॅट काही आपण घेणार नाही. गेलो होतोच म्हणून बेल वाजवली. ज्यांचं घर होतं ते अजून तिथे राहातच होते. मी जुजबी प्रश्न विचारले. त्या बाईंना घराबद्द्ल काय काय सांगायचं होतं, मी ऎकत होते. कोणाच्या खाजगी वर्तूळात शिरायचं म्हणजे मिलिन्द्ला अवघडल्यासारखं होतं, मी सहज शिरते. कुठलेही प्रश्न सहज विचारू शकते.
माणसे कशी जगतात? कशी लढतात? कशी जिंकतात? कशी हरतात? काय विचार करतात? हे जाणून घ्यायला मला आवडतं. घरंही घरातल्यांबद्दल खूप काही बोलतात. घराची रचना कशी आहे? कुठल्या गोष्टी म्हणजे घरातल्यांना सोयी वाटतात, कशाला महत्व आहे? घरात बाईचं स्थान काय असेल? याचा एक ढोबळ अंदाज आपण लावू शकतो. मग मी खरंच त्या घरात शिरते. कोणी कुणाबद्द्ल चांगलं बोलत असेल तर तेही आपण ऎकलंच पाहिजे (दुर्मिळ गोष्टी) ते ऎकून माणसांच्या मनात घराला काय स्थान आहे, हे ही कळते. मिलिन्द कंटाळतो हे लक्षात असूनही मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवते. तो स्वैपाकघर पाहायला येतच नाही. बाई बोलत असतात मी त्यांच्या उत्साहाला आवर घालत नाही. त्यांनी दारामागे कसं कपाट केलंय हे मला दाखवलं. चांगलं मोठं आहे म्हणून उघडून दाखवलं. कपाटात एका बाजूला मुलीची खेळणी आणि दुसर्‍या बाजूला पुस्तके. त्यात ’कारमाझफ बंधू’. मी चकीत झाले.
बाहेर आल्यावर मिलिन्दला म्हणाले," अरे, त्यांच्याघरी ’कारमाझफ बंधू’ होतं कपाटात! "
कोण बरं वाचत असेल? त्या बाई? की त्यांचा नवरा? मी त्या दोघांकडेही नीट पाहिलेसुद्धा नाही.
छे! पुढच्यावेळेस कोणाकडे दिसलं तर मी हा प्रश्न नक्की विचारीन.
मागच्या वर्षी मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गळ्यातलं, कानातलं असं काही बघायला आमच्या मागच्या सोसायटीत गेले होते. ती बाई हौसेने असं काही बाही बनवते. शनिवार सकाळ . मला दार उघडून बसायला सांगितलं. मुलीला न्हाऊ घालत असावी. मी बसले. घर पाहात होते. पुस्तकांच्या कपाटात जी.एं. ची पत्रे. त्या इंग्रजाळलेल्या वातावरणात हा धक्काच होता. मागे वळून पाहिलं तर माझ्या डोक्यामागच्या कपाटात ’कारमाझफ बंधू-१’ ’कारमाझफ बंधू-२’ बसलेले. तिने मला निवडीसाठी डबा आणून दिला, बहुदा मुलीच्या डोळ्यात साबण गेला. मला एकटीला सोडून ती परत गेली. आली तेंव्हा पहिला प्रश्न मी विचारला, ” ही पुस्तके कोण वाचतं तुमच्याकडे?" ती म्हणाली,"माझा नवरा, त्याचीच आहेत सगळी पुस्तके". बुटका, गुट्गुटीत, कुरळ्या केसांचा असा तो नवरा बाहेर आला, टेरेसवर गेला, आतमधे रेंज नसावी, मोबाईललवर बोलत होता. मी त्याच्याकडे नीटच पाहून घेतलं. बाहेर कुठे भेटला तर ओळखता येईल इतकं. फ्रिजवर गच्च भरलेले A,B,C,D , छोट्या वाटीत बांबूची रोपे, मण्यांचे पडदे ( आणि सलग मराठी बोलू न शकणारी मराठी बायको) मला त्याची काळजीच वाटायला लागली. कसा निभावणार हा?
मी काही निवडलं, पैसे दिले, बाहेर पडले.
हा माणूस मराठी भाषांतर का वाचत असेल? कारमाझफ बंधू बद्द्ल त्याला कुतुहल का वाटलं असेल? त्याला जमलं का वाचायला? वाचताना त्याचं मत काय बनलं? तो दमला का? त्याला काय कळलं त्यातलं? त्याने दस्तयेवस्कीचं आणखी काय काय वाचलंय?

छे! आता पुन्हा कोणाकडे हे पुस्तक दिसलं तर मी हॆ प्रश्न नक्की विचारीन.

०००००००००००००००००

~~~~~~~~

सुस्वागतम!
आपण आठवणीने आलात
बरं वाटलं

हे आहे कच्चं लिखाण
विरंगुळा म्हणून केलेलं
तुम्ही तुमचा वेळ द्यावा
असं काही यात नसेलही

पण जरा जपून
कागद उडताहेत इतस्तत:
एखादा तुमच्या पायाखाली येईल
त्याचा हळवा कोपरा दुखावेल
एखादा फाटून कायमचा जायबंदी होईल

तेव्हढी काळजी घ्या
बाकी स्वागत आहे
ते तर म्हंटलं मी
सुरवातीलाच

************

हिशोब केला सगळा तर
सारं काही चोख
स्वत:साठी ठेवावे म्हणून
उरतात का हे पुन्हा पाहिले
तर शिल्लक काहीच नाही.
दिवसांचे, तासांचे, मिनिटांचे
देणे द्यायचे ठरलेले
काहीही इकडे तिकडे
करायची सोय नाही.

गणित येणं, हिशोब करणं,
या गोष्टी सोप्या आहेत.
हवं तसं जगायला, शिलकीत उरवणं,
ते मात्र अवघड आहे.

*************

निळा, पिवळा, हिरवा, विटकरी
रंग एकात एक मिसळत गेलो की
शेवटी एक काळसर राखाडी तयार होतो
मग त्यात लाल, गुलाबी, पिवळा
कुठलेही रंग मिसळून पहा
मातकट रंगाच्याच वेगवेगळ्या छटा

आयुष्यानेही जर असा मातकट रंग घेतला असेल
तर त्या रंगछटेतून सुटका नाही.

***************

कुठलीही गोष्ट
मग ती हवीशी असो की नकोशी
जर अदृश्य करायची असेल तर
असं समजायचं की ती अस्तित्वातच नाही.

कधी कधी ती खरोखरच गायब होते,
जणू कधी नव्हतीच.
जर अशी दिसेनाशी झाली नाही तर
....स्वीकारायची.

***********


खाली खोल दरीत गेलेल्या स्वत:ला
पुन्हा वर ओढून आणायचं
अंधार संपून आशेचे किरण दिसेपर्यन्त
त्यातील उब शोषून चालायला लागायचं
तो पुढे पुन्हा एक दरी (की तीच दरी?)
आणि, दरीच्या तळाशी कधी पोचते कळतही नाही
पुन:पुन्हा तोच खेळ
आयुष्य म्हणजे स्वत:ला वर खेचत राहणं,
एव्हढच होऊन बसलयं.

**************

दिवस नुसते जातात
हातातून वाळू निसटून जावी तसे
शहाणपण काहीच चिटकत नाही
तेंव्हा जुनं शहाणपण
नव्याने वापरून वेळ निभावून न्यावी
नवा दिवस काय नव्याने शिकवेल
याची वाट पहावी
काही वेळा जुना दिवस नव्याने
नवा दिवस म्हणून उगवतो

पण एखादा दिवस येतोच ना
अंतर्बाह्य़ बदलून टाकणारा
नवी नजर देणारा
त्याच्या प्रतिक्षेत
दिवस नुसते जाऊ द्यावेत

***************

काळजी

”आई असायचं, म्हणजे काय करायचं?”
”मुलांना तहानलाडू, भूकलाडू बांधून द्यायचे बरोबर.”
” ते कसे करायचे?”
” बाई गं, हे माहीत नाही, तर आई कशी झालीस?
आता तुझी मुलं कसा प्रवास करतील, शिदोरीशिवाय?”

********

निष्काळजीपणामुळे बोट कापलं गेलं
भराभर रक्त यायला लागलं,
कसंबसं हळद लावून,
पट्टी बांधून थांबवलं.

रक्ताचं आणि त्वचेचं
बरं चाललं असेल ना आत?
रक्ताने उसळी मारायची आणि
त्वचेने बांधून घालायचं.

हेच तर नातं नाही त्या दोघांचं??

************

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
माझा एकटीचा
सगळं शहर निद्राधीन
मी ऎकतेय, बघतेय...पाऊस

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
लाजरा, संकोची, अनलंकृत
आशीर्वादासारखा झरणारा
खोलवर रूजणारा

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
निशब्द, आश्वासक, आत्ममग्न
सगळं बोलून झाल्यानंतरच्या
शांततेसारखा

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
गळ्यातल्या आवंढ्यासारखा
डोळ्यातून वाहणार्‍या पाण्यासारखा
मोकळं करणारा

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
माझा एकटीचा

***********

मौन म्हणजे

मौन म्हणजे
गप्प बसणं नाही
तर ठरवून गप्प बसणं.

मौन म्हणजे
बोलायचं नाही, असं नाही
तर सुचवायचं काही काही.

मौन म्हणजे
संवादाला नकार नाही
तर संवादाची पद्धत निराळी

***********

आपण शोधतो वाटा
इकडे, तिकडे
आजूबाजूला
आपल्याला माहीत असतं
या सत्यापर्यंत पोचत नाहीत

सत्य चक्रव्यूहात असतं
त्याबाबतीत आपण सारे असतो
अभिमन्यूसारखे
लढत आत जावू शकणारे
बाहेर पडायचा रस्ता माहीत नसणारे

अशावेळी शेवटी काय?
तेच एक अंतिम सत्य

************


वारा आला
तुझ्या दिशेचा
मंद मंद, अन
गंधभारित
हलका हलका
वळणे घेत
गाण्याची रे
लकेर घेत
पान अन पान
हलले रे
मन माझे
थरथरले रे
सारे सारे
कळले रे

*************

भरतकाम

भरतकामात आपण टाके घालत जायचे
कधी साखळी टाका, तर कधी उलटी टीप
टाके कुठलेही असोत
आपण आपलं पुढे जायचं
वेळोवेळी गाठी माराव्या लागतात,
त्या मनात ठेवायच्या नाहीत.
एखादे वेळी चार टाके उसवून
पुन्हा घालावे लागतात.
कधी सुई, टचकन बोटात जाते
रक्ताचा टपोरा थेंब वरती येतो,
बोटाला फूल आल्यासारखा...
डोळ्यात पाणी येतं आपोआप
ते कुणाला दाखवायचं नाही.
एक दिवस दोरा संपतो....
झालेलं भरतकाम निरखता यावं,
एवढा वेळ मिळेलच असे नाही.
सुई कापडाला टाचून ठेवायची नीट
आणि उठायचं

*************


मी ठरवते, आता रडणं थांबवायचं.
कुणीतरी येतं सहज खपली काढून जातं.

मी ठरवते,आता पुरे, मी बाहेर पडेन
काहीतरी नवं उभं राहतं, माझ्या पायातलं बळच जातं.

मी ठरवते, मी जगायला सुरूवात करीन
कुठलं तरी वादळ येतं, माझी उमेदच संपून जाते.

सत्य काय आहे? मला उभं राहता येत नाहीये, हे?
की मला उभंच राहायचं नाहीये. हे?

************

डोळ्यांवर विश्वास ठेवायचा आणि
आकाश गाठायचं ठरवलं तर
मैलोनमैल चालत गेलो तरी
आकाश भेटणार नाही.

निष्कर्ष काय काढायचे?
दिसतं तसं नसतं?
धरतीची साथ सोडल्याशिवाय
हे शक्य नाही?

तर्क बाजूला ठेवून
मनाने गेलात तर??
बघा,
तिथे कुठलीच मर्यादा नाही.

************


एकटं आकाश

माझ्या लहानपणी ना!
झाडं असायची उंच उंच!
घरं?? बुटकी बुटकी!
झाडांकडे ना!
असं वर, पाहावं लागायचं!
हिरव्या पानांमधून ना!
निळं आकाश दिसायचं!

आता ना!
इमारती झाल्या आहेत उंच उंच!
झाडांकडे ना!
असं खाली, पाहावं लागतं!
आणि वरती पाहिलं ना!
तर नुसतं आकाश दिसतं, एकटंच!

*************
तू म्हणजे

समज, तू म्हणजे
एक पिंपळाचं झाड आहेस.
ते गीतेतलं नाही हं!
’खाली शाखा वरी मूळ’
किंवा तो आळंदीचा
सोन्याचा पिंपळही नाही.

तू आहेस एक साधं
पिंपळाचं झाड ;
फाल्गुनात सगळी पानं
गळाल्यावर,
चैत्रात पुन्हा पालवी धरणारं,
लाल, किरमीजी, पोपटी.
ते बघ, या खिडकीतून दिसतंय,
सळसळणारं.

ते झाड माझं? की तू माझा?
की तूच ते, इथून सतत दिसणारं झाड
होऊन राहिला आहेस, माझ्यासाठी?

************
मनातला तू

माझ्या मनातल्या मनात
एक मनातला तू आहेस
मनातल्या तुला मी
हे सांगते, ते सांगते,
त्यावरच्या तुझ्या प्रतिक्रिया?
त्याही मीच ठरवते.
आपल्या खूप गप्पा मारून होतात.

आपण एकमेकांसमोर आलो
की गप्प होतो.

तुझ्याही मनातल्या मनात
एक मनातली मी असणार

*************


गाण्याची जर असेल साथ

रस्ता लांबच लांब,
सोबतीला कुणी नाही;
चालत जाल आरामात,
गाण्याची जर असेल साथ.

एकाकी एकांतात,
दुखर्‍या आठवणीच्या तळाशी;
बाहेर याल आरामात,
गाण्याची जर असेल साथ.

गर्दी गोंगाटात,
टीपेला पोचलेला स्वर;
ऎकू शकाल आतला आवाज,
गाण्याची जर असेल साथ.

गाण्याची जर असेल साथ,
हवे काय आयुष्यात?
गाण्याची जर असेल साथ.
तरून जाल आरामात.


*************

गाणं

मला भेटलं एक गाणं
वळणावरती थांबलेलं
वरून वरून उत्साही
आतून आतून आनंदी

लागण झाली मला त्याची
होतंच तसं लाघवी ते
वरून वरून तरंगणारं
आतून आतून भिजलेलं

माझं गाणं- भिरभिरं
मजेत फिरणारं
माझं गाणं- खरंखुरं
काळजात बसणारं

माझं गाणं- गोडुलं ते
आत्ता होतं- गेलं कुठे?
मनात माझ्या रूतलेलं
आत्ता होतं- गेलं कुठे?

वळणावरती मीच थांबलेय
येणार्‍याची वाट पहात
वरून वरून फुललेली
आतून आतून गंध जपत

************

मोगर्‍याचे दिवस

पुन्हा आले आहेत
मोगर्‍याचे दिवस
यावेळी त्यांना जमतयं
तीच जादू करायला
आतून आतून
मनं उमलवणारी

पाकळी पाकळी
सुटी होत जाते
गंधाची वलयं
फेर धरू लागतात
आतमधे ही हुरहुर कशाची?
आता कोणाची वाट पाहायची?



***************
एकांताचा डोस

जर लोकांमधे वावरतानाचं नाटक,
यशस्वीरित्या पार पाडायचं असेल;
तर एकांताचा एक डोस
रोज घ्यायला हवा,
तो मिळू शकला नाही
तर लोकांमधे नाटक
उघडं पडण्याची भीती असते.

************


तुला काहीच कसं ग आशादायक दिसत नाही?
तेच तेच लिहू नकोस, खरं वाटायला लागेल.
दुसर्‍या बाजू पाहायच्याच नाहीत
असं ठरवलं आहेस का? पस्तावशील.
वळीवाचा पाऊस पडतो,
कसला मातीचा गंध सुटतो,
तुला कोणीच आमंत्रण देत नाही का?
बाहेर ये, धुऊन जावू देत पावसात सारं
बघ कसं स्वच्छ वाटेल,
मग नवं काही लिही, किंवा लिहू नकोस
लिहिणं हे कौशल्य आहे फक्त!
अनुभवायला जमेल का बघ.


*************

पायातलं त्राण गेलंय़
चालायचंय अजून
मैलोन मैल
तेही हसर्‍या चेहर्‍याने
वेदनेची रेष न दाखवता
ती शक्ती
कुठून आणायची?


*************

भीती

भीती
किती सहजपणे लिहितो
हा शब्द!
पोटात जेंव्हा गोळा येतो ना?
आणि अंगभर पसरत जाते
थंडगार निर्जीव लहर
त्याचा अनुभव घेतला की कळतं
भीती म्हणजे काय असेल ते!
हळूहळू निष्प्राण होत जायचं
आपल्या डॊळ्यांदेखत!
भीती मारत नाही,
अशा अवस्थेतही जिवंत ठेवते
पुढे तिला सोबत घेऊन जगायचं
तिने तुम्हांला सोडावं
इतके भाग्यवान तुम्ही
आहात की नाहीत, माहित नाही!

**************
शेवटी जिवंत!

दलदलीत मी चालले आहे खोल खोल
पायाला कसलाच आधार नाही
तरी त्या भीतीतही मनात आलं
दलदलीत बूडून मरणारे, असे मरतात होय?
चला, हा अनुभव गाठीशी घेऊन मरूया.
....................................
ओ, सॉरी! मला जगायचंय.
आवाजच फुटेना तोंडातून
मी गेले बहुदा पूर्ण आतच
आजूबाजूला नुसता गार चिखल!
...................................
जाग आली तेंव्हा मी जिवंत!
कोणीतरी हात दिला बहुतेक.
.....................................
.....................................
काय ग! किती खराब झालीस?
हसले. (पण जिवंत आहे ना?)

**************


तुला काही सांगायचंय?
तू शब्द शोधतीयेस?
तुला खात्री वाटत नाहीये शब्दांबद्द्ल?
तू साशंक आहेस शब्दांच्या अर्थाबद्द्ल?
(मनातल्या मनात दहावेळा
म्हणून झालंय ना?)
तू अंदाज घेतीयेस?
तू घाबरत नाहीयेस ना?
छे! मला वाटतच होतं,
तू काही बोलणार नाहीस.


*************

माझी मुलगी
सारखी बडबडत असते,
गळ्यात पडते’
कानात ’सिक्रेट’ सांगते,
मला हे घाल,
ते नको सांगते,
जरा दुर्लक्ष झालं तर
रूसून बसते,
अगदी मी होते तशीच!
मला खूप ओळखीची वाटते.
उद्या आणखी शहाणपण शिकवेल,
मग प्रेमात पडेल.....

माझा मुलगा
बडबड करतो,
त्याच्याशी खेळायला लावतो,
हे हवं, ते नको हट्ट करतो,
मी त्याला समजून घ्यायचा
प्रयत्न करते,
हा कुठल्या वाटेने मोठा होईल?
मला तो अनोळखी वाटत राहतो,
त्याच्या बाबांइतका!

****************

”मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा”

कवी असोत की शायर
प्रेम करायचं ते त्याने
करवून घ्यायचं ते तिने
विचारायचं त्याने
होकार द्यायचा तिने
इथेसुद्धा पायर्‍या
ठरलेल्या आहेत
कर्ता तो कायमच
(आणि कर्म तिचं??)
प्रेमबीम करायचं असलं
तरी ती दोन पायर्‍या खालीच

एके दिवशी सकाळी उठल्यावर
साक्षात्कारासारख्ं तुमच्या लक्षात येतं
प्रेम म्हणजे ’हे असं असतं’

*************

प्रेम खरं म्हणजे साक्षात्कारी असतं.
एके दिवशी सकाळी तुम्ही उठता
आणि तुमच्या लक्षात येतं
तुम्ही प्रेमात पडला आहात.
ते तुमच्या हातात नसतंच मुळी
फारतर प्रेमामागे जायचं की नाही
हे तुम्ही ठरवू शकता,नीट विचार करून
आणि मग जाता किंवा जात नाही
त्याने तसा काहीही फरक पडत नाही.

**************


प्रेम म्हणजे
काय असतं?
सुरवातीच्या आकर्षणानंतर
उरतं ते?
पुराचा भर ओसरल्यावर
संथपणे वाहात राहतं ते?
चेहर्‍यावरच्या हललेल्या रेषेवरून
मनातलं ओळखतं ते?
समोरच्यासाठी स्वत:ला
बदलण्याचा प्रयत्न करतं ते?
वाळवंटाच्या दिवसांमधे
चालतं ठेवतं ते?
रोजच्या रगाड्यातही
सारखं आठवतं ते?

ह्याच्यापेक्षाही अधिक काहीतरी
जे सांगता येत नाही ते.

*************

माणसं एकमेकांना वापरतात
खेळणं म्हणून,
दोन माणसांच्या संबंधातली युद्धं
आणि राजकारणं
तर सनातन आहेत.

आपल्याला
शस्त्र आणि चिलखतांशिवाय
भेटणे शक्य होईल का?

*****************
लेखक आणि अभिनेता

लेखक माझ्यापर्यंत पोचतात
त्यांच्या लेखनातून
लेखन ही एक
भूमिका असते का?
लेखकाने घेतलेली?
त्या पलीकडचा लेखक
म्हणजे अज्ञाताचा प्रदेश
त्यामुळे लेखन कसं आहे?
सांगता येईल एकवेळ
लेखक कसा आहे?
कसं सांगणार?

तरीही,
लेखक आणि अभिनेता
यांच्यात फरक
असेलच ना?


*******************

Friday, February 19, 2010

~ ~ ~ ~ ~

कुठून कसे अचानक
काळे ढग जमून आले
सगळीकडे पसरला राखाडी प्रकाश
वस्तूंचे अंतरंग बदलणारा
उदास, हवाहवासा
खुर्चीत बसले पाय पोटाशी घेऊन
वाटले मला आता पंख फुटणार

पावसाचा थेंब पडला नाही

कोरे कागद घेऊन
हातात पेन धरून बसले
अक्षरे पेरांच्या टोकाशी आलेली
मनात आले खूप दाटून

कागदावर काही उमटेचना

सारे काही झाले पुन्हा लख्ख
व्हा पुन्हा तर्कशुद्ध बुद्धिनीष्ठ

मी उठले
या उजेडात आता
रोजचीच कामे करायला हवीत.

***************

प्रेम आणि मैत्री
यांच्यात फरक
कसा करता येईल?

प्रेम असेल तर
मैत्री असतेच (ना?)
मैत्री आहे
म्ह्णून प्रेम असेलच
असे नाही

विश्वास, हक्क,
आदर,
एकमेकांसाठी
नुसतं असणं
हे तर दॊन्हीतही

मग काय?
ओढ म्हणायची
ती?
प्रेमाला वेगळं
करणारी
की आणखी
काही?

प्रेम कुठेतरी
अव्यक्ताच्य़ा
प्रदेशात नेतं
का?

Friday, January 22, 2010

गावाकडल्या गोष्टी

वर्षातून एकदाच आम्ही नांदेडला जायचो. सगळी मामे-मावस भावंडे जमलेली असत. नुसती धमाल करायचो आम्ही! कधीतरी औरंगाबाद की नांदेड असा सामना होत असे. मी आणि विश्वास त्या नांदेडवाल्यांना पुरून उरत असू. आमच्याकडे शिक्षणाच्या सोयी, ऐतिहासीक महत्त्वाची ठिकाणे असं बरंच काय काय होतं. गुरूद्वारा सांगितलं तर वेरूळ सांगता येई, ह्नुमानटेकडी, शिकारघाट असं सांगितलं तर आमच्याकडे बावन्न गेट होते, मलिक अंबर वगैरे मंडळींनाही आम्ही आमच्यात ओढत असू. ते म्हणत आमच्याकडे गंगा आहे. (नांदेडला गोदावरीला गंगाच म्हणतात) गंगेला काय सांगणार तुम्ही? पाणचक्की? की मकबरा? असंच काहीतरी आम्ही सांगत असू, पुढे तर आम्ही औरंगाबादेतून खांब नदी वाहते हे ही एका पुस्तकातून शोधून काढलं. नदी कसली? नालाच तो? आमच्या शाळेजवळून वाहणारी ही नदी आहे हे आम्हांला माहितच नव्हतं! तेंव्हाही गंगेच्या तोडीचं काही नाही हे मला कळलेलं होतं. त्यांना त्यांचा मुद्दा नीट मांडता येत नसे, आज वाटतं एका गंगेच्या जोरावर खरं तर ते जिंकू शकत होते.

पहाटे पाचलाच मोठीआई गंगेला जावून येत असे. आम्ही उठल्यावर आठ-साडेआठला आई, मावशा, मामी आणि आम्ही सगळी मुलं गंगेवर जात असू. मंदाआत्याच्या घरापर्यंत गंगा दिसतच नसे, पुढे एकदम पाणीच पाणी दिसायला लागे. त्या उतारावरून तर आम्ही धावतच सुटत असू आधी वाळू मग पाणी...पाण्याचा जिवंत स्पर्श पावलांना झाला की पावले अधर होऊ पाहात.पाण्याची किमया तुमच्यावर झाली की तुम्ही बदलता. कृष्णाच्या गोष्टींमधे जे मंतरलेपण आहे ते यमुनेमुळेच आहे का?.... सुरूवातीला पाणी गार गार पण थोड्या वेळाने तेच उबदार वाटे. वाहत्या पाण्याशी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे खेळत बसायचो. मोठ्यांचे स्नान, पुढे कपडे धुणे होत असे. कपडे वाळत येत पण आम्ही बाहेर पडायला राजी नसायचो. आमची प्रतिमा गुणी मुले अशी असल्याने आईच्या दोनचार हाकांत आम्हांला बाहेर यावे लागे. हळूहळू सगळेच बाहेर येत. बाहेर आल्यावर उन्हं तापली आहेत हे लक्षात येई. मग वाळूत दगड शोधत बसायचे. दुपारी सागरगोटे खेळायचे असत त्यासाठी आम्ही दगडच वापरत असू. कधी किल्ला करत बसायचो, तोवर आया आमचे कपडे धुवून आणत. पुन्हा आमच्या मागे लागायचे, असं करणार असाल तर उद्या गंगेवर आणणारच नाही अशा धमक्या, शेवटी कसेबसे आम्ही घरी यायला निघायचो. दुसर्‍या दिवशी निघतानाच हाक मारली की बाहेर येणार असं कबूल करून गंगेवर जायचो तरी परत तेच!
लवकरच आम्ही मुली थोड्या मोठ्या झालो, म्हणजे काय ते आम्हांला कळलेलं नव्हतंच. मग शिष्ठ्पणे गंगेवर जावून नुसते पायच बुडवायचे, स्नान घरीच करायचं असं सुरू झालं. मोठ्या ताया तर गंगेवर यायच्या पण नाहीत.कधी घरी पाणी कमी असलं तरीही. बाई ग! तिथे कसे कपडे बदलायचे? त्यांचं असं सुरू असायचं. आम्हांला आम्हीपण मोठ्या होतोय हे छानच वाटायचं. आम्ही कधी भांडलो नाही, मुलांसारखं आम्हांला का नाही? असं म्हणून. कदाचित मोठ्या झाल्याची मान्यता अधिक महत्त्वाची वाटली असेल . गंगा ही आम्हांला किती आवडणारी गोष्ट होती! कसं असतं ना? मुली म्हंटल्या की अशी छोटी छोटी सुखंही त्यांना नाकारली जातात.

नांदेडला जाताना असंच काय काय आठवत होते. चार-पाच वर्षांनी जात होते. मधल्या एक दोन लग्नांनाही जाता आलं नव्हतं. आता तीन दिवसात परभणी, नांदेड आणि वडगाव , बहूतेक सगळ्या नातेवाईकांना भेटणे म्हणजे महत्वाकांक्षीच कार्यक्रम होता. सगळ्यांना फक्त पाहणे होणार होते, भेट अशी होणार नव्हतीच.
काका, मावशा, आत्या, मामा, मामी,भाऊ,बहीणी, वहिन्या, भाचे, भाच्या किती जणांना भेटले/ पाहिले. प्रत्येकाच्या माहितीचे नुतनीकरण करायचे, मी तर दमून गेले. जे भेटले नाहीत तेही सगळे काय करताहेत, कुठे आहेत. आई-बाबांशी बोलतना त्यांचेही काही काही सांगायचे राहून जाते, त्यामुळे काही गोष्टी मला नवीनच कळत होत्या. एका लग्नाची सीडी पाहताना’
” ही कोण ग?" " अगं सुलभाताई." ’’काय? चांगलीच सुटलीय हं” ’’आता तिची बिट्टी लग्नाला आलीय, सासू होईल ती पुढच्या वर्षी” दहा वर्ष झाली असतील तिला भेटून, मुक्ता सहा महिन्यांची होती तेंव्हा.
"रोहनदादा काय करतोय?" " त्याची एक नोकरी टिकेल तर शपथ!”
"अर्चनाची मुलगी खूप आजारी होती, मरता मरता वाचली, नंतर सगळे मिळून माहूरला जावून आले."
"एकदा मीताकडे जाऊन या हैद्राबादला, छान घर बांधलय तिने"
”नीताताईचा वास्तूशास्त्राचा चांगला अभ्यास आहे हं. कुठून कुठून बोलावणी येतात तिला." ” काय???" " हो, ती शाळा बांधली, त्याचं सगळं पाहिलयं तिनं" "फी घेते?" "घेत असणार, तिने घराच्या दिशा, कुठे काय सांगितलं ना की भलंच होतं बघ त्यांचं"
मी इथे थबकले. आपण करू त्या असल्या गोष्टींनी लोकांचं भलंच होईल असं वाटण्याइतका आत्मविश्वास कुठून येतो माणसांत?? आणि भलं म्हणजे काय? ते असं अधल्या मधल्या टप्प्यावर ठरवता येतं का? नीताताई अजून भाबडीच राहिली आहे की बेरकी झाली आहे. आपल्या समोरची माणसं कशी अनोळखी होत जातात नं आपल्याला.
वरवरचंच बोलणं झालं सगळ्यांशी. खुशाली आणि जुजबी चौकशा पण त्याच्यामागे असणारं त्यांचं प्रेम आणि माया यांचं काय करू असं होऊन गेलं मला! एकीकडे वाटत राहिलं क्वचित भेटतोय म्हणून हे असेल. पाहिल्यावरची पहिली प्रतिक्रिया अशीच असणार!

पूर्वी मी कायम माझ्या मुद्द्यांवर वाद घाल, त्यांच्या दृष्टीने टोकाच्या प्रतिक्रिया दे, यात काय पडलयं आणि त्यात काय पडलयं असं काहीसं बोलत असे. त्यावर ’तू अजून लहान आहेस’ हे मला ऎकून घ्यावं लागे. यावेळेस.....मला दोन मुलं झाली, त्यांचं करतीये, त्यांच्या मागे फिरतीये म्हणजे मी बदललेच असं त्यांना वाटलं. माझा संयम वाढलाय पण मी बदलले नाहीये. काही झालं तरी मी माझी वाट बदलून घेईन असं यांना वाटलच कसं? मिलिन्द सोबत आहे म्हणून इथवर येऊन, तो नसता आणखीच कुणी असता तर आधीच्याच कुठल्या टप्प्यावर मी भांडत, झगडत राहिलेच असते ना?

काकू म्हणाल्या," बघ, कांताच्या पोरानं कसं केलं! आपल्या घरात असं कधी झालं नव्हतं. आपल्यात काय कमी पोरी आहेत का? किती सुंदर सुंदर पोरी सुचवल्या आणि यानं बघ कसं केलं" " तुम्हांला वाईट वाटणं मला समजू शकतं काकू".... तरीही काकूंचं पुढे सुरूच...मी ऎकतीये....सुरूच. " खरं सांगू का काकू? मला नाही याचं काही वाटत. त्याला आवडली ना मुलगी, पुरेसं आहे ना एव्हढं"... तरीही सुरूच. "काकू, हे असं होणारच, तुमची इच्छा असो की नसो. उद्या माझ्याकडे होणार आहे , नंतर तुमची ही नातवंडं आहेत ना ती पण दुसर्‍या जातीतल्या मुलींशी लग्न करणार आहेत. तुम्ही तयारी ठेवा." काकू माझ्याकडे बघत राहिल्या. मग हात जोडले म्हणाल्या,” त्याच्या आत नारायणानं माझे डोळे मिटावेत." ( सॉरी काकू! मला तुम्हांला दुखवायचं नव्हतं. काय करू? तुम्हीपण जरा आधी का नाही थांबलात?) माझ्याशी जरावेळ बोलल्याच नाहीत. ( आईला वाटतं मी नुसतं ऎकून घ्यावं, नाही काही बोलले तर चालणार आहे.) आता यांचा रूसवा कसा काढू? माणसं दुखावली गेली की त्याचा त्रास होतो. स्पष्टीकरण काय देणार? शक्यच नसतं काही. विशेषतः आपण योग्य तेच बोललेलो असतो तेंव्हा. असं स्पष्टीकरण द्यायला आणि ओशाळं हसायला मला अजिबात आवडत नाही. दुखावलं त्याचं वाईट वाटत राहतं. यातून स्वतःला सोडवायचं कसं? माणसं खूप जवळची असली की त्यांना दुखवायचा आपल्याला अधिकार आहे असं वाटतं. ते काहीही गैरसमज करून घेणार नाहीत याची खात्री असते. एकमेकांना दुखावूनही तुम्ही एकमेकांच्या जवळ येत जाता. पण तसं नसतं तेंव्हा?
थोड्या वेळाने काहीतरी विषय निघाला, मी हसत म्हणाले,’ असला नवरा तर मी चालवूनच घेतला नसता’ काकू हसल्या म्हणाल्या, " आम्ही घेतला बरं चालवून" आणि काकांचं काही काही सांगायला लागल्या. ( धन्यवाद, काकू!) तुम्हांला असं नाराज ठेवून मला इथून जाता आलं नसतं, जावं तर लागणारंच होतं. कशी सुटका केलीत माझी! पुन्हा किती वेळ त्यांच्याजवळ बसले, गुडघेदुखी, रात्रीची झोप त्याचं सगळं आस्थेनं ऎकून घेतलं, काही सुचवलं. उत्साहानं काय काय बोलत राहीले. मला त्यांना एव्हढंच म्हणायचं होतं__आभारी आहे.

गावाची शीव लागताच दिसते उंचावरी ती गढी
भिंती ढासळल्या, बुरूज पडले ये खालती चावडी
.........................................................शेवटी
ही काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण
बाबा ही कविता इतकी छान म्हणतात. माझ्या डोळ्यासमोर वडगावच उभं राहतं.
सोबत आई-बाबा होते त्यामुळे परत लहान व्हायला जमत होतं.
अगदी घाईघाईत वडगाव झालं. देवात जाऊन आलो,पवळाच्या वावरात गेलो पण वांग्यांच्या विहिरीवर गेलोच नाही. वाड्यातली विहिर कोरडीठाक होती. कधीमधी आम्ही हौसेने पाणी शेंदायचो. मुक्ताला पाणी शेंदणं माहीतच नव्हतं. आमच्यासाठी छोटा पोहरा होता. सवय नसल्याने पाणी डुचमळत वरती यायचं. वाकून पोहरा धरावा लागायचा, तेंव्हा भीती वाटे. मुक्ताला सांगीतलं, इथे ना चमकोरा लावलेला असायचा. तिकडे नां, चुलीवर मोठ्ठा हंडा ठेवलेला असायचा. ही बघ बळद. पूर्वी पोती नव्हती फारशी, कणग्या भरलेल्या असायच्या,इथे बाजा टाकून आम्ही झोपायचो, या बुरूजावर ना रात्री घुबड असायचे. असंच काय काय सांगत होते. वावरात तर तुरीच्या शेंगा तोडायलाही वेळ नव्हता. चुलतभाऊ म्हणाला,’ पुढच्या वेळी दिवस घेऊन ये, तू आलीस तरच आपली भेट व्हायची.’ खरं होतं ते! सगळ्यांना तुम्ही एकदा पुण्याला या असं सांगत होते, पण अवघडच होतं त्यांच्यासाठी. मलाच यायला हवं. म्हणाले,’ आता पुढच्या वर्षी येईन, इतके दिवस लावणार नाही.’
 आम्ही वडगावला जावू या म्हणालो की बाबाच खूप खूष होतात. त्यांना वडगावची ओढ आहे, ती थोडी जरी आमच्यात उतरलेली दिसली की त्यांना बरं वाटतं. तिथे ते अतिच उत्साहात असतात. बाकी सगळं जावू देत पण त्यांच्या या आनंदासाठी तरी इथे सारखं सारखं यायला हवं.
आमची वाटेकरीण तेजनबाई म्हणाली,’ बाई, आता इकडचच सोयरं-धायरं करा म्हंजी येनं होत र्‍हाईल’ किती खरं होतं ते! मला हसूच आलं. ते सगळं माझ्याच हातात आहे असं समजून चालली होती ती!

ठरवलेल्या बहूतेक सगळ्या गोष्टी झाल्या. सगळ्यांचं बरं चाललेलं होतं. नातेवाईकांत असायचे तसे राग-लोभ, रूसवे फुगवे होतेच. मी दूर असल्याने या सगळ्यांपासूनही दूर होते.( ते बरंच आहे.) पुन्हा कधी येणं होईल म्हणून हुरहुर वाटत होती. आमच्याकडची भाषा कानात साठवत होते.( येताना रेल्वेत मुक्ता म्हणाली,’ तो बघ पॅटीसवाला येऊ लागलाय’ ’येऊ लागलाय??’ वा! मी बाबांइतकीच खूष झाले.)

या गडबडीत मिलिन्द नसल्याने बरच झालं. आमच्याकडे जावाई म्हणजे त्याच्याच मागे पुढे सगळेजण! मग आमचं आमचं काही बोलणं होत नाही. मिलिन्दलाही आमच्या देशस्थी अगत्याची सवय नसल्याने त्याचीही जरा पंचाईतच होते.

शेवटच्या दिवशी संध्याकाळी मुक्ता-सुहृदला गुरूद्वारा दाखवायला नेलं. ’गुरूता गद्दी’ नंतर नांदेड खूप बदललयं. गुरूद्वारा पण खूप छान केलाय. पर्यटनस्थळच झालंय ते!( सुहृदला तिथली कारंजी आवडली. म्हणाला,’ हे पाण्याचे फटाकेच आहेत’) काका ज्या वाड्यात राहात होते, तो ही या नुतनीकरणात गेला. आम्ही सहज केंव्हाही गुरूद्वारात जात असू. एक रूमाल डोक्याला बांधला की झाले! ’सत श्री अकाल’ ’सच बोले सो निहाल’ हे तर आम्ही इतकेदा ऎकायचो. शिखांची काही भीती वाटायची नाही. ते कधी कधी त्यांचे लांब केस धुवून वाळवत बसलेले असायचे. निरागसच दिसायचे. समाजात दरी पडली , माणसं दृष्टीआड गेली की त्यांची भीती वाटायला लागते, असं होत असेल का?

तिथे बसलो आणि कल्पना केली की हं इथे असेल वाडा. एकदम काकांच्या समोर राहणारी पूनम आठवली. पंजाबी ड्रेस घालायची. एक दोन वर्षांचा मुलगा होता तिला. तरीही आम्ही मुले सुद्धा तिला पूनमच म्हणायचो. एका खोलीत ती आणि तिचा मुलगा राहायचे. नवरा मिलिटरीत होता तिचा. भाकरीच्या पिठाचा गोळाच गरम तव्यावर थापून भाकरी करायची ती! रोज गुरूद्वारात जावून द्रोणभर प्रसादाचा तुपकट शिरा घेऊन यायची. आम्हां सगळ्यांना तो वाटायची. कधी कधी स्वैपाकच करायची नाही. लंगरमधे जावून जेवून यायचे दोघं. आता वाटतं नव‍र्‍याने सोडून दिलं होतं का तिला? म्हणून अशी तीर्थक्षेत्री राहात असेल का ती? कोण जाणे.

घरी आल्यावर मामीला म्हणाले,’ मामी, गुरूद्वारा किती सुंदर दिसतोय! तिकडचा भाग खूप बदललाय. नांदेड वाटतच नाही.’
मामी म्हणाल्या,’ तरी तुम्ही पुढे गेला नाहीत. गंगेला चांगला घाट बांधलाय.लाईट लावलेत. संध्याकाळीसुद्धा छान वाटतं’

गंगा??.... गंगेला मी विसरलेच की!.... माझ्या मनातल्या यादीतही गंगा नव्हती का?....

’ आपला नंदीघाट हो मामी?’
’तो तसाच आहे, आता पूर्वीपेक्षाही वाईट अवस्था आहे.’
मामा, मावशा, काका सगळेच पूर्वी नंदीघाटाजवळ होळीवर राहात. गंगेला जाणे सहज शक्य होते. आता सगळ्यांनीच दूर दूर आपली घरे बांधली आहेत. त्यांचाही गंगेशी रोजचा संबंध राहिलेला नाही. जाता येता क्वचित पुलावरून पाणी (असलं तर) दिसतं तेव्हढंच.

उद्या सकाळी निघायचं आहे. गंगेवर जाता येणार नाही, हे स्वीकारलंच मी. त्या सहज स्वीकाराचंही वाईट वाटत राहिलं.

आता समाधानानं परतता येणारच नव्हतं.
लवकरच पुन्हा इथे येण्याचं ठरवायला हवं.

गंगा आहे माझ्या खूप जवळची. जरी आम्ही सारखं सारखं भेटत नसलो तरी.
ती समजून घेईल.