कोथळीगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दगडातून काढलेल्या पायर्या आहेत! गुडघ्यापेक्षाही उंच, एकावेळी एक पायरी चढणे मुष्कील.
दगडी पायर्या ओलसर... दगडी भिंती शेवाळलेल्या... वरून येणारा प्रकाशझोत...
पायर्या संपल्या असाव्यात असं वाटताना एक वळण.... पुन्हा पायर्या....... आता डोक्यावर नेहमीचं आकाश!
कठड्यावरून बाहेर पाहिलं तर आहा!
आम्ही कितीतरी उंचावर..... छोटी छोटी शेतं, तळी, डॊंगर, खालून पंख पसरून उडणार्या घारी!
वर काय असणार आहे? कुणास ठाऊक?.............. नाही कसं?
भन्नाट वारा... विस्तारलेलं क्षितीज.... कूठून चालत चालत आलो याचा एक अंदाज घ्यायचा... पोचल्याचा आनंद आणि परतीचे वेध!..
एका दगडी दरवाज्यातून वर पोचलो.
वाढलेलं गवत त्यातून एक छोटी पायवाट.....
गड किल्यांवर जाणे म्हणजे एक ’खजिना शोध’ खेळच असतो!
खजिना कुठल्या टप्प्यावर कुठे दडलाय? मुळात आहेच की नाही? काहीच माहित नसतं.
आपण नि:संग वृत्तीने चालत राहायचं... खजिना शोधायला निघालोच नाही,असं! .....चालता चालता इतके दमतो ना आपण.. काय शोधतोय.. कशाची वाट पाहतोय.. विसरायला होतं...... काही अपेक्षाच उरली नाही अशा बिंदूला पोचलो की..... अवचित खजिन्याचं दार उघडतं.
.....पायवाटेने जरा चालत गेलो तर.... उजव्या बाजूला एक लहानसं तळं..... झाडांनी आच्छादलेलं. अविश्वसनीय! डोळ्यांची तयारीच नव्हती, इतकं सुंदर काही पाहण्याची! ......पाहिल्या न पाहिल्यासारखं करून... बाजूने एक चक्कर मारली. बस! एवढासच आहे बालेकिल्ला! जिथून तळ्यातलं पाणी दिसत नव्हतं अशा जागी बसले होते. वारा पडलेला. खूप उकडत होतं, जवळचं पाणी संपलेलं. तळ्यातलं न घेता येण्यासारखं...
तळ्यावर छाया धरून असलेली ती झाडं दिसत होती. खरंच इथे तळं आहे? की नाही? थोडावेळ नुसतंच पाहात राहिल्यानंतर , झाडातून वाट काढत पाण्याजवळ गेलो. कुठलीतरी अदृश्य कालरेषा ओलांडून आदिम काळात पोचल्यासारखं वाटत होतं. एखादी सुंदर कविता असावी तसा तो डोह होता! शेवाळी काळं पाणी, ते जिवंत असल्याच्या खुणा सांगणार्या इवल्या इवल्या मासोळ्या. कधीकाळी माणसांनी तो बांधून काढला होता. आता मात्र अस्पर्श....बाजूने ती झाडे... रानकेळीची, उंबराची, समोर पाहिलं तर जुनी ओळख विसरून उभा असलेला पिंपळ. अगदी कडेवर! खुशाल आपली मुळं पाण्यात सोडून, ती मिरवत असलेला, पाण्यात त्याचं प्रतिबिंब! ”खाली शाखा वरी मूळ” झाडांनी काय, माणसांनी काय, मर्यादेत असावं. इतक्या कडेवर, इतक्या ताठपणे आपणं कुठल्या पाण्यावर जगतोय ते दाखवणारं झाड! ...... कधीकाळी या डोहाच्या काठानं एखादी कथा उमलली असेलही... सुखांतिका असेल की शोकांतिका... कोण जाणे.... या डोहाइतकी अस्सल असेल हे नक्की!.... कथा प्रवाहात वाहून गेली पण कविता अजून शिल्लक आहे......
पाणी प्यायलो .... आणि निघालो.....
त्या दगडी पायर्या चढून, त्या डोहाला भेटायला कुणी कुणी जाईलही. मी मात्र पुन्हा कधी तिथे जाणार नाही. तो डोह असेल, ती त्याच्यावर माया करणारी झाडं असतील, ती मुळं असतील, त्या मासोळ्या असतील.... पण कदाचित ते पिवळं पडलेलं केळीचं पान तिथे असणार नाही. माझं मन तेच शोधत बसेल, मी तिथे जाणार नाही. ...... आणि ती उत्सुकता, बेपर्वाई, .... ती पुन्हा जाताना माझ्यात असूच शकणार नाही! नव्या अनुभवाचं घर मला तिथे बांधायचं नाही..... मी तिथे पुन्हा जाणार नाही.
Friday, September 23, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
वा!
ReplyDelete- नीरज
काय! पुन्हा जाणार नाही?!!
- जगदीश
:-)
ReplyDeleteमस्त!
liked it... I could see it all..
ReplyDelete