Friday, December 4, 2009

देणगी

खूप दिवस झाले गडावर गेलो नव्हतो.या रविवारी मावळे कुठल्या गडावर जाणार आहेत याचा तपास केला. वैराटगडावर जाणार होते. वाईजवळ आहे. Internet वरून माहिती घेतली. अगदी सोपा, तासाभरात पोराबाळांसह चढता येईल असा. ठरवले, जाऊया.

मिलिन्दची फारशी इच्छा नव्हती, दीपाला यायचे नव्हते, अश्विनीसुद्धा जाणार नव्हती. तरी सगळे तयार झाले. साडेपाचला निघायचे, मधे चहा पिऊन साडेआठपर्यन्त पायथ्याशी, साडेनऊला गडावर, अर्धातास थांबून निघायचे, अकराला पायथ्याशी. मुख्य कार्यक्रम वाईत बंडू गोरेंच्या खानावळीत जेवण. बाराला तिथून निघालो की दोन फारतर अडीचपर्यन्त घरी. मग मस्तपैकी रविवार दुपारची झोप.

असा मस्त कार्यक्रम ठरला.

ठरल्याप्रमाणे निघालो. पायथ्याशी नऊला पोहोचलो. सगळे नेहमीप्रमाणे उत्साहात होते. छोटासा गड दिसत होता. आत्ता चढून येवू. मजा करत, एकमेकांची खेचत निघालो होतो. कौस्तुभला बंडू गोरेची आमटी फारच आवडल्यामुळे यावेळेस दीपाला ती खाऊन बघायची होती. टारगेट दीपा होती.

फोटोग्राफर्स फोटो काढत होते. उद्या-परवा ते पाहून आम्ही अहाहा!! वा! म्हणणार होतो. सचिन म्हणाला,’ इथे अगदी गवतासारखा किडा आहे. येऊन बघ.’       ’ असूदे, फोटोत पाहीन."

थोडंसं चढलो आणि वाट सापडेना.

चढलो ते अवघडच होते. दीपाला वाटले इथूनच परतावे. मुक्‍ताचीही तयारी होती. पण वाट सापडली आणि निघालो. पुढे दोन मुले भेटली , ती म्हणाली वाट दाखवतो. हे इथेच आहे पंधरा मिनिटांवर. ती जगदीशपेक्षा पोचलेली होती, कारण पुढे आम्हांला दीड तास लागला. वाट अवघड होती. बाजूच्या झाडांनी ओरखडे निघत होते. जगदीशला शिव्या घालायला सुरवात झाली होती. थोड्या शिव्यांची हकदार मीही होते.

खाली गावात लग्न होते. त्याचा लाऊडस्पीकरवरून आवाज येत होता. लग्न लागले, त्याचं संगीत पार्श्वभूमीला ...मुक्‍ता म्हणाली,’आपली बिकट वाट सुरू होतेय म्हणून हे म्युझिक लागलयं.’ मिलिन्द म्हणाला,’ नाही अगं, तिकडे कोणीतरी बिकट वाटेला लागलाय त्याच्यासाठी म्युझिक आहे हे!.’ एकूण तरीही मजेत. वाट दाखवणार्‍या मुलाकडे कुर्‍हाड होती. ती कशाला? तर दुपारच्या वेळी वर रानडुक्करे येतात . मग रानदुक्करांचं जेवण वर येत आहे. त्यांची पण internetवर कम्युनिटी आहे, आपण येणार त्यांना कळलंय, ते दबा धरून बसले आहेत वगैरे वगैरे.

पुढे वाटच नव्हती. चक्रीवादळाचा भरपूर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे निसरडं झालं होतं. न येता घरी थांबले ते किती हुशार! आशा मस्त पाय ताणून बसली असेल, एका हातात चहा, एका हातात पेपर!

तसंच चढायला लागलो. पाय पक्का रोवू अशी जागा नव्हती. बाजूला तीन तीन फूट गवत होतं. त्याला धरलं तर ते हातात येत होतं. गुरूत्वाकर्षणाचं काम तर सुरूच होतं. कोणी घसरत होतं, पडत होतं, मी किंचाळत होते. आम्ही चतूष्पाद झालेलो होतोच.प्रत्येकजण सापडेल त्या मार्गाने चढत होता. सुह्रुद्सगट सगळे माझ्या वाटेने येवू नका असे सांगत होते. विद्याधीश म्हणाला ,’विद्यामावशी माझ्या वाटेने ये. बघ चांगली आहे.’ मी म्हंटलं,’अरे माझी तर बघ पायघड्या घातल्यात.’ अश्विनी म्हणाली, ’विद्या पण वैतागली आहे.’ खरचं याला सुखाचा जीव दुःखात घालणं म्हणतात. मी आणि सुहृद तिथेच थांबू म्हंटलं तर तेही शक्य नव्हतं. कसे चढलो माहित नाही पण चढलो. खाऊन घेतलं. परतताना दुरून असेल पण सोपी वाट असेल असं वाटत होतं. छे! आल्या वाटेनेच उतरायचं होतं तीच सोप्पी!!!!

सुहृद सगळावेळ मिलिन्दबरोबर होता, मधून मधून त्याला कडेवर घ्यावं लागत होतं.
उतरायला सुरवात केली ती बसूनच, कपड्यांची पर्वा न करता घसरत होतो. काटे/कुसळ कपड्यात घुसत होते. काढण्यात अर्थ नव्हता. उभ्याचे आडवे करून घ्यायचे, टोचत नाहीत.

पडेल असं वाटलं की मी किंचाळत होते. मला माहित आहे, मला जरा किंचाळायची सवय आहे.पण इथे जरा अतीच होत होतं. मिलिन्द्च्या कडेवर सुहृद होता, त्याच्यापाशी जातो म्हणून जितूकाका माझ्यामागून पुढे गेला , माझ्यासमोर पडला...., तीनेक फूट घसरला...., पुन्हा उठून चालायला लागला...., आवाज नाही. सुहृद-वेदात्मनपासून खाडिलकरकाकांपर्यन्त सगळे घसरत होते ,पडत होते पण कोणीही ओरडलं नाही. मी एकटी किंचाळत होते. विद्याधीशने मोजायला सुरवात केली.एक-दोन.... आठ-नऊ-दहा.....पंधरा... काय चाललंय माझं? मला कळत नव्हतं.

मी किंचाळण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं. थोडासा तोल गेला की मी किंचाळत होते. पण क्षणभर आधीसुद्धा मी किंचाळणार आहे, हे मला माहित नसायचं. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती. . मी अस्वस्थ झाले.
मी घाबरत होते म्हणून अस्वस्थ होते का? नाही. भीती वाटणं साहजिक होतं, त्याला काय लाजायचंय?
मग चारचौघात किंचाळत होते म्हणून अस्वस्थ होते का? नाही. भीती वाटल्यावर ज्याला किंचाळायची सवय आहे तो किंचाळेलच ना? अति होतंय म्हणून का? असावं जरासं.
मुख्य कारण हे होतं की माझं काही नियंत्रणच नव्हतं माझ्या किंचाळण्यावर.
विद्याधीश, मुक्‍ता माझ्यापुढेच होते. विद्याधीश म्हणाला,’विद्यामावशी, रोलरकोस्टरवर कसं होईल तुझं?’
मी तिथे जाणारच नाही.  दोघेही खूप बडबड करत होते. मला लक्ष केंद्रीत करणं जमत नव्हतं. पायाखालचा दगड गडगडत गेला. मी किंचाळले. मुक्‍ता म्हणाली,’ तुझ्याकडून ही देणगी मला मिळाली नाही.’ देणगी??   इथे मी ते बंद करायचा प्रयत्‍न करत होते.

माझा तरी का एवढा अट्टाहास? शिंक किंवा खोकला विचारून येत नाही. आपण गृहीत धरतो. तसं ते स्वीकारलेलं आहे सगळ्यांनी आणि हृदयाची धडधड किंवा नाडीचे ठोकेदेखील मला विचारून पडत नाहीत. त्याचं मला काही वाटत नाही. पण किंचाळणं मला मी ठरवीन तेंव्हा हवं होतं. ते मला जमत नव्हतं. का??

आपल्या मेंदूवर आपली अधिसत्ता आहे असं मला वाटायचं. मेंदू म्हणजे समजा भारत, त्यातल्या सगळ्या राज्यांवर, केंद्रशासित प्रदेशांवर माझं राज्य़.  ( माझं म्हणजे कुणाचं?) सगळीकडे सारं काही नियंत्रणाखाली. आणि अचानक बस्तरमधे किंवा तेलंगणात किंवा उत्तरपूर्वेत असे आदिवासी निघावेत की ज्यांना ह्या देशात काही व्यवस्था लावलेली आहे, कुणाचं तरी प्रशासन आहे हेच माहीत नसावं? ते आपले स्वतःचंच राज्य समजताहेत. माझं तिथे काहीच चालत नाहीये.
आता प्रश्न फक्त किंचाळण्याचा नव्हता, अजून कुठे कुठे कोण कोण आदिवासी दडून आहेत, माहीत नाही.ते काही बंड करून उठणार नाहीत. तेवढी सत्ता त्यांच्याकडे नाही. पण ते अस्तित्वात आहेत, माझ्यात आहेत. हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.स्वीकारण्यावाचूनही.
स्वीकारायचंच असेल तर त्यातलं सौंदर्य तरी पाहूया. मी इतक्या वेळा किंचाळले पण एकदाही पडले नाही.किंचाळण्याने मला वाचवलं का?
किंचाळणारी मी आणि तिच्याकडे चकित होऊन पाहणारी मी अशा दोन मी होतो काहीवेळ!! अदभुत!!

आता जरा बरी वाट होती. अर्थातच किंचाळणं थांबलं.

शेवटच्या टप्प्यावर खाडिलकरकाका थांबले होते. म्हणाले,"बसा. सगळे आले की निघू. कसा निघाला गड? वाटत होतं सोपा आहे. आता वैतागला असाल पण उद्या कुणाशी आजच्या अनुभवाबद्दल बोलताना किती छान वाटेल! आपल्या कायम आठवणीत राहील हा गड!" मी मान डोलावली. पुढे त्यांच्या स्टाईलने आणि त्यांच्या त्या इंग्रजीत म्हणाले ,"जगातली कुठलीही सुंदर जागा सहजी आपले सौंदर्य दाखवत नाही. ती आपला कस पाहते. ते देणं दिलं की मगच तिथलं खरं सौंदर्य कळतं." मी पुन्हा मान डोलावली.

सगळे आले. आम्ही निघालो.दोन वाजले होते.रस्त्याला लागण्यापूर्वी एकदा मागे वळून पाहिले. गड छोटासाच दिसत होता. दाढीसारखा एक गवताचा/झाडांचा पट्टा होता. त्यात आम्ही अडकलो होतो, घसरत होते. त्याचे या बेट्याला काहीच नाही!

तो तसाच !
योगी? की कलंदर?
की दोन्ही??

2 comments:

  1. मजा आली वाचताना.
    वैराटगडानं चांगलीच फिरकी घेतली खरी.
    किंचाळीचं महाभारत आवडलं.

    ReplyDelete
  2. The article is most wonderful and entertaining. Never imagined we are members of a team comprising such personality. Acharya Atre would have said that such article, about a fort, has not been written in last ten thousand years.
    If all people reminisce like this tourism industry will be in danger like the icebergs due to global warming.
    Deepaji should write a book. Govt will promptly ban it in fear that no one reading or hearing about the book will ever go anywhere near any fort.
    But money will start pouring. Some one will purchase rights to produce a movie and also offer that she plays leading role. (In World War II, Audie Murphy became the most distinguished and decorated soldier in America. After the war he became Holly Wood actor and played himself in an award winning memorable movie “To Hell and Back” winning world wide acclaim).
    Needless to say Bandu Gore will promptly appoint her as Brand Ambassador for their Amti and the product will become well known all over the world.
    May be after hundred/ two hundred years, people will talk about a great explorer roaming, screaming and guiding the trekkers on the slippery slopes of Vairat Garh.
    Sense of humour apart, Deepaji, very well written and keep writing.
    Khadilkar Kaka

    ReplyDelete