Saturday, February 21, 2009

कुटंबात विचार

"कुटुंबात लोकशाही असली पाहिजे" हा एक महत्वाचा मुद्दा आहे.खरोखरच कुटुंबाकुटुंबांमधे लोकशाही आली तर ती एक क्रांतीच होइल.
तरीही कुटुंबात कोणत्या विषयांबद्दल विचार होतो हे महत्वाचे आहे असे मला वाटते.

बहुतांशी कुटुंबात विचार आणि विचारविनिमय या दोन्ही अर्थांनी विचार होत नाहीत.
’विचार होत नाहीत ’ ही कुटुंबव्यवस्थेची मर्यादा आहे का? शोधून पाहिले पाहीजे.
त्याचे कारण ’विचार’ करायचे शिक्षण देऊ शकतील अशा व्यक्ती सामान्य कुटुंबात अभावानेच असतात ’ हे असेल तर तसे का आहे?
" विचार करणे "या गोष्टीचा प्रसार का होत नाही? कारण कुठल्याही सत्तेला विचार करणारे नकोच असतात.मग ती घरातली असो, अध्यात्मातली असो की राजकारणातली असो, कारण विचार करणारे स्वतःचे रस्ते शोधू शकतात .
कुटुंबात विचार होत नाहीत कारण कुटुंबात भावनेला ,विचारांच्या वरचे स्थान आहे.निर्णय घेण्यात भावनेचा वाटा जास्त असतो.
कुटुंबाचे "साध्य "काय आहे? सुख????
("विचार "हे कधीही साध्य होऊ शकत नाही,ते साधन आहे व्यवस्था बदलण्याचे ,माणसे बदलण्याचे.)
सुख--- तेही प्रत्येकाला वाटेल ते नाही तर समाजात ज्याला सुख म्हंटले जाते ते!कुटूंब सुखी असून चालत नाही तर ते तसे दिसावे लागते.
सुखी दिसण्यासाठी विचारांची गरज नसते. समाजाने आदर्श घालून दिलेले असतात त्या वाटांवरुन चालताना स्वतः विचार करावा लागत नाही.
"एकत्रित" विचार हा बहुदा तेंव्हाच होतो जेंव्हा तो विचार करणे याच हेतुने माणसे जमतात. हे अगदी मान्य .
पण वर्षानुवर्षे एकाच घरात राहणारी माणसे एकत्रित विचार करायला का जमत नाहीत?
कुटूंब, कुटुंबातल्या कोणत्या सदस्यांना एकेकट्याने विचार करायला स्वातंत्र्य आणि space देते?
(किती घरातल्या बायकांना हे मिळते?)
बरं हे एकेकटे सदस्य कशाचा विचार करतात?
कुटुंबात आपण आपल्या माणसांचा विचार करायला शिकतो की त्यांची काळजी घ्यायला?त्यांची कदर करायला?त्यांच्या इच्छेसाठी स्वतःला बदलायला?तत्वांना मुरड घालायला?
भावना या विचारांपेक्षा अधिक महत्वाच्या आहेत हेच आपण शिकतो आणि आपल्या माणसांना ,ती दुखावतील याला घाबरायला लागतो.
जर कुटुंब सुखी असायला विचारांची गरजच पडत नसेल तर "कुटुंबात विचार होत नाहीत" याची काळजी करायचे कारण नाही.
मग कुटुंबात विचार व्हावेत असे का वाटते?
१.कुटुंबांनी सुखाच्या वरच्या पातळीवर जावे असे वाटते.
२.जोपर्यंत ही कुटुंबे सरळ रेषेत चालत असतात तोवर विचारांविना काही अडत नाही पण अशा कुटुंबांवर काही आघात झाला (मुलाने आंतरजातीय ७-८ वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न करायचे ठरवले ) की ती कोलमडून पडतात.
अशा प्रसंगी दिशा दाखवणे आणि निर्णयाचा स्वीकार करणे या दोन्हींसाठीची ताकद विचारांमधे असते.
म्हणून कुटुंबात विचार व्हायला हवेत.

No comments:

Post a Comment