Tuesday, December 13, 2011

जोशी सर

आम्हांला आठवी, नववी, दहावीला गणिताला जोशी सर होते. (आमच्या शाळेत दोन/तीनच सर होते, बाकी सगळ्या बाई.)

आठवीपासून गणित म्हणजे ’बीजगणित + भूमिती ’ सर छानच शिकवित. सगळ्यांना समजेल असे, कळेल असे. त्यांनी नविन धडा शिकवायला घेतला की त्यादिवशी मजा यायची, मुलींकडून उत्तरे काढून घेत ते शिकवायचे. त्यांचं अक्षर छान होतं. फळ्यावर शिस्तीत लिहित. प्रमाणबद्ध आकृत्या काढीत. भरपूर सराव करून घेत. सिद्धता शिकायला मला खूप आवडायचं. त्यांच्या तासाला लक्ष दिलं तर गणिताचा काहीच अभ्यास करावा लागत नसे. ते ज्या वर्गांना शिकवीत त्या वर्गाचा गणिताचा निकाल सुधारत असे. शाळेत त्यांचा दबदबा होता. ज्या तुकड्यांना ते शिकवित नसत त्या मुलींचं , ’तुम्हांला काय बाई, जोशी सर!" असं असे. शिवाय ते खाजगी शिकवण्याही घेत. त्यांचा क्लास तुफान चालत असे. त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मेरीटमधे येत.

त्यांची मी आवडती विद्यार्थिनी होते, असं मुली म्हणत, गणितात मी पहिली येत असे. मार्क मिळविणारी मुलं पूर्वीच्या काळी शिक्षकांना आवडायची. पण त्यांच्या वर्गावर्गातून आणि क्लासमधल्या मिळून बर्‍याच आवडत्या विद्यार्थिनी असतील. त्या निवडक पाच सात मुलींपैकी मी एक असेन. मला त्याचं काही नव्हतं आणि त्यांनाही.

मी त्यांचा क्लास लावला नाही. शिक्षकांनी खाजगी शिकवण्या घ्याव्यात हे मला पटायचं नाही. एक समांतर शिक्षणव्यवस्था आपण उभी करतो, ती करू नये असंच माझं मत होतं. असे शिक्षक क्लासमधे जीव ओतून शिकवतात आणि शाळेत वेळ मारून नेतात, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्वत:चा क्लास लावायची सक्ती करतात, असा एक प्रवाद होता. शिक्षकांनी असं शिकवावं की क्लासची गरजच पडू नये ना! असं मला वाटे. जोशी सर वर्गातही छानच शिकवित, त्यांनी मला कधीही त्यांचा क्लास लावायला सांगितलं नाही किंवा आडून सुचवलंही नाही.

आठवीत साठटक्के मुलींनी क्लास लावलेला असायचा. नववीत ऎंशी टक्के आणि दहावीत तर कुठल्याही विषयाला शिकवणी न लावलेली अख्ख्या दहावीत मी एकटी मुलगी होते. आमच्या दहावीच्या सहा तुकड्या होत्या आणि प्रत्येक वर्गात सरासरी ७० मुली!

हळूहळू आमच्यात एक नातं तयार होत गेलं. अवघड गणितं सोडवायला मजा येणार्‍या निवडक मुलीच असायच्या. कधी ते अवघड गणितं आम्हांला सोडवायला घरी देत. फळ्यावर गणित सोडवून दाखव, हा ही एक प्रकार असायचा. सरांनी नेटक्या लिहिलेल्या गणिताखाली मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या ओळी तिरप्या जात. माझ्या जागेवर येऊन बसल्यावर जेव्हा मी फळ्याकडे पाहात असे तेव्हा माझे आकडे किती नवशिके आहेत हे माझ्या लक्षात येई.

मी एकदा मैत्रिणीशेजारी शेवटच्या बाकावर जाऊन बसले. वर्गात आल्या आल्या त्यांनी माझ्या जागेकडे पाहिलं, मी आले नाही असंच त्यांना वाटलं. गणित घातल्यावर त्यांना दिसलं, मी मागे बसले होते. त्यांना आवडलं नाही. ”गणित झालं आहे त्यांनी हात वर करा’ ते म्हणाले. माझं झालं नव्हतं. सर मागे माझ्याजवळ आले, ” काय झालं?" ”सर, मला आकडे स्पष्ट दिसत नाहीयेत." त्यांनी मला गणित सांगितलं, मी ते सोडवलं. मला म्हणाले, ” उद्या डोळे तपासून घे." .... मला चष्मा लागला.

आम्ही मिळून गणित सोडवायचो तेव्हा मजा यायची. गणित घातलं की त्यांना ते विशिष्ट वेळेत माझ्याकडून सोडवून हवं असायचं. मग ते मला ’विद्या, चार मिनिटं राहिलीत, तीन मिनिटं राहिलीत’ अशी आठवण करून द्यायचे.

दहावीत असताना असंच त्यांनी एक गणित घातलं, माझं झाल्यावर मी ते फळ्यावर सोडवून दाखवलं. ते असे फळ्याकडे पाहात राहिले आणि म्हणाले, ’ ह्या प्रकारचं गणित सोडवायच्या तीन पद्धती मला माहीत आहेत, तू ही चौथी रीत शोधून काढली आहेस. या पद्धतीने सगळ्यात कमी वेळ लागतो, इतर मुलींनाही मी हीच पद्धत सांगेन." असेच मिनिटभर माझ्याकडे कौतुकाने पाहात राहिले, तास संपला होता, गेले.

’तर्क’ मी त्यांच्याकडून शिकले असेन. आपण जी स्थिती मांडतो आहोत, ती कुठल्या मर्यांदामधे सत्य आहे, हे सांगितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. एकदा तर्क तुमच्यात कुठल्याही मार्गाने, समजा गणिताच्या, शिरला की सगळीकडेच तो त्याचे अस्तित्व दाखवून देतो. भाषेतही उतरतो. मग आपल्यासाठी तर्क जाणणारे/अवलंबणारे आणि इतर, असे माणसांचे दोन गट पडतात.

आपल्या आवडत्या विषयाच्या, आवडणार्‍या सरांनी, शिकवण्या घ्याव्यात! छे! मी त्यांना भाव देत नसे. ते माझ्याशी मायेनेच वागत.

एकदा मी आणि आई, कपडे घ्यायला गेलो होतो. तिथली एक मिडी मला खूप आवडली. सॉफ्ट जीन्सची, हिरव्या रंगाची, त्यावर पांढरा टॉप होता, मेघा स्लिव्हजचा, बंद गळ्याचा. मी इतक्या छोट्या बाह्या वापरत नसे, शिवाय त्या मिडीची उंचीही कमी होती, जेमतेम गुडघ्यांपर्यंत, आई म्हणाली, ” घालशील का? तरच घेऊ, नाहीतर दुसरी बघ.” मी म्हणाले, " हो घालेन. मला हीच हवी आहे." घरी आल्यावर घालून बघितली तर उंचीला कमी होतीच पण अंगातही घट्ट बसत होती. मला ती इतकी आवडली होती की परत करायचीच नव्हती. मी ती शाळेत घालून गेले. मैत्रिणींचं वा वा, नऊ बुक्के देणं, झालं. जोशी सरांचा तास होता. गणित झालेली वही दाखवायला मी त्यांच्याजवळ नेऊन दिली, त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिलं. मला कळलं, मी घातलेले कपडे त्यांना आवडले नव्हते. ते बोलले काहीच नाहीत. माझी चिडचिड झाली, हे काय? यांना काय करायचंय? आणि बाकीच्या मुली काहीच्या काही घालतात, ते बरं यांना चालतं, हे सगळं मनातल्या मनात!
त्या मिडीत मला वावरायला अवघड होत होतं, नेहमीसारखं धावणं तर सोडाच भरभर चालणंही शक्य नव्हतं. आईला ती मिडी आवडली नव्हती, सरांना आवडली नव्हती मग माझंही मन उतरलं. घालते म्हणाले होते म्हणून मी चार वेळा घातली असेल, नंतर तशीच नवी पडून राहिली. पुढे आईने तिची उशीची खोळ शिवली.

दहावीत एकदा असं झालं, की एक सोपा धडा सरांनी मी शिकवणार नाही, तुमचा तुम्ही करा, करू शकाल असं सांगितलं. मधल्या सुट्टीत एका चिंतातूर मुलीने धडा काढला आणि "काय गं, विद्या, कसा जमणार?" म्हणाली. धडा खरोखरच सोपा होता. पण सरांनी शिकवायचा नाही, म्हणजे काय? सगळ्या मुलींना जमेल का? आणि त्यांच्या क्लासमधे ते असंच सांगतील का? वा! असं नाही चालणार! सरांनी शिकवलाच पाहिजे. आम्ही मुलींनी हे सरांना सांगायचं ठरवलं. सगळ्याच मुलींचा पाठिंबा होता. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अर्थात मीच! मला या गोष्टींची हौस होतीच.
सर आले, त्यांनी पुढचा धडा शिकवायला घेतला. मी उठून उभी राहिले आणि गाळलेला धडा शिकविण्याची विनंती केली. ............ सरांचं आणि माझं एक जोरदार भांडण झालं. विशेषत: हा धडा स्वत:चा स्वत: करायला कुणाला जमणार नाही? असा प्रश्न विचारल्यावर जे चार सहा हात वर झाले त्यात माझाही एक होता हे पाहिल्यावर हे ठरवून चाललंय याची त्यांना कल्पना आली. त्यांनी थेट मलाच लेक्चर द्यायला सुरूवात केली, दहावीचं वर्ष आहे, नसत्या गोष्टींत वाया घालवू नकोस, तुला कुठलीही शंका आली तर केंव्हाही माझ्याकडे ये, तुला दीडशेपैकी दीडशे मिळवायचे आहेत, बाकीच्या मुलींचं काय ते त्या बघून घेतील.......... मी असं वागावं याचं त्यांना खूप वाईट वाटलं, मलाही मी जास्तच आगाऊपणा केल्याचं जाणवलं.
आमच्या हट्टापायी त्यांनी तो धडा थोडक्यात घेतला.

ते आमच्या गल्लीतच थोडं पुढे राहात. क्वचित एक दोन शंका विचारायला मी त्यांच्याकडे गेले असेन.

नववी दहावीत कधीतरी, एका तासाला, त्यांनी शिकवायचं सोडून, स्वत:ची गोष्ट सांगायला सुरूवात केली. ते बीडचे, घरची गरीबी, पण हे हुशार, बारावीला चांगले मार्क्स पडले, इंजिनीअरींगला नंबर लागलेला, पैशांची सोय होत नव्हती म्हणून बीडलाच नोकरी करत BSc केलं, पुढे MSc, वगैरे वगैरे.

दहावीच्या सेन्डऑफला आम्ही सगळ्या रडलो. सरांचेही डोळे पाणावले.

माझं मेरीट एका टक्क्याने गेलं. मला खूप वाईट वाटलं. माझी बक्षिसे घ्यायलाही मी शाळेत गेले नाही. पुढे अकरावी, बारावी मग इंजिनीअरींगची धमाल! मी सरांना पूर्ण विसरले. कधी कधी सर दिसत. त्यांच्या घरी बरीच माणसे होती. दोघांना घरात बोलता येत नसेल, सर आणि त्यांच्या मिसेस कधी कधी फिरायला गेलेले किंवा टेकडीवर गप्पा मारताना दिसत. एक दोनदा खालच्या वर्गातल्या मुलींनी सांगितलं, ”वर्गात सरांनी तुझं उदाहरण दिलं, तुझा विषय काढला."
SE किंवा TE ला असताना मी चार दिवस गावाला गेले होते. आल्यावर कळलं, सर गेले! हार्टअटॅक! मी सुन्न झाले! वय काहीच नव्हतं, फारतर पंचेचाळीस.
आतून रिकामं रिकामं वाटायला लागलं.
सर मला आवडायचे, ते चांगलं शिकवायचे, मला त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांना कळायचं, हे त्यांना कळलं असेल?
वेळच्या वेळी माणसांशी बोललं पाहिजे!

4 comments:

  1. >>वेळच्या वेळी माणसांशी बोललं पाहिजे!
    खरंय! पण "वेळच्या वेळी" म्हणजे कधी हे वेळच्या वेळी कळत नाही ही मोठीच अडचण आहे.

    - सचिन

    ReplyDelete
  2. >> शिक्षकांनी खाजगी शिकवण्या घ्याव्यात हे मला पटायचं नाही. एक समांतर शिक्षणव्यवस्था आपण उभी करतो, ती करू नये असंच माझं मत होतं.

    हे आठवीत?!!!

    धन्य आहात __/\__

    ReplyDelete