Tuesday, November 13, 2012

दिवाळी

सहामाहीचा शेवटचा इतिहास - भूगोलाचापेपर सोडवून आलो की सुरु व्हायची दिवाळीची सुट्टी!

आईची घर आवरणे, साफसफाईची कामे नवरात्रीच्या आधीच झालेली असायची.
एकदा दसर्‍यानंतर मालकांनी वाड्याला रंग द्यायचा ठरवला. रंग म्हणजे चुना.
दोन तीन दिवसांत रंगारी येऊन अख्खा वाडा रंगवून जायचे.
आमच्या परीक्षा झाल्यावर आईने घर रिकामं करून दिलं.
बादल्यांमधे चुना, नीळ घातलेला, आणि रंगवायचा ब्रश म्हणजे काठीला बांधलेली सुताची केरसुणीच!
तो एव्हढा मोठा ब्रश, त्याची काठी दोन हातांनी धरत बादलीत बुडवीत आणि लगेच भिंतीवर.
काळवंडलेली भिंत भराभर पांढरीशुभ्र होऊन जाई. दीड - दोन तासांत , डबल कोट सह घर रंगवून होई.
रिकामं घर प्रकाशाने भरून जाई.
आई आधी खोली धूवून घेई, मग अंगणात ठेवलेलं एक एक सामान घरात आणून मांडत असे.
मी आणि विशू, थोडीफार मदत करायचो.
सगळ्या फडताळांखालचे पेपर बदलले जात.
काही डबे आई पुन्हा घासत असे.
संध्याकाळपर्य़ंत घर व्यवस्थित लावलेलं असे.
दिवे लागले की त्या प्रकाशात नेहमीचं घर नवं चकचकीत दिसे.
डोळे या जास्तीच्या प्रकाशाला सरावलेले नसत.
आई, बाबा, विशू हे ही सगळे तेच आहेत ना? असं काहीतरी वाटून जाई.
त्यांच्या वागण्यात बदल झाला तर वाटे, घराला रंग दिल्याने तर नाही हे?
मला तर जुनं उबदार घर कुठे गेलं? आणि नव्या करकरीत घराशी कसं जुळवून घेऊ? असं होई.
जेवायला बसल्यावर ताटाचा तोच स्पर्श, भाजीची तीच चव, याने हळूहळू मी रूळत असे.
दोन दिवसांत करकरीतपणा मोडला जाई आणि नवेपणाची सवय होत असे.

दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कधीही गावाला जायचो नाही.
वाड्यातले सगळेच विद्यार्थी आणि जी काय कुटूंबे होती, ते जवळपासचे, औरंगाबाद जिल्ह्यातले होते,
ते आपापल्या गावी जात.

दिवाळीच्या महिन्यात बराच जास्ती किराणा आणायचा असे
आणला की डब्यात भरून ठेवायची मदत करायला आम्हां दोघांना आवडे.
डाळी, दाणे निवडता निवडता आई तिच्या लहानपणीच्या दिवाळीचं काय काय सांगे.
आणि वाड्यात कुणी नसल्याने आम्ही दोघे असे आई किंवा बाबांच्या भोवती भोवतीच असायचो.

दिवाळीच्या खरेदीच्या दिवसाची आम्ही खूप वाट पाहायचो.
बाबांना दसर्‍याला कपडे आणि आईची साडी संक्रांतीला असायची. क्वचित ते दिवाळीला कपडे घेत. मला आणि विशूला मात्र दसरा आणि दिवाळी दोन्ही वेळी बहुतेकदा कपडे मिळत. तेव्हा तयार कपड्यांची फार पद्धत नव्हती. कापड घेऊन शिवायला टाकायचं, मग शिंप्याने द्यायचं असंच असे. मला काहीवेळा रेडीमेड फ्रॉक घेतल्याचा आठवतोय. मछलीखडकावर सुरूवातीलाच सर्वदे ब्रदर्स असं दुकान होतं. त्या दुकानातच आम्ही जायचो, माझ्या मापाचे, आमच्या बजेटमधले जे काय आठ - दहा झगे असतील त्यातला एक निवडायचो. आणखी दुसरीकडे पाहू, वगैरे सुरू झालं ते नंतर! तेव्हा मला आकाशी रंग फार आवडत असे. आकाशी रंगाचा, त्यावर फुलांचं भरतकाम, खिसा, असा काहीतरी फ्रॉक मी निवडत असे. विश्वास आणि बाबांचे कपडे टीपटॉप म्हणून दुकान होतं, तिथून, आईची साडी निरूपमा साडी सेंटर मधून. बाबांचे आणि विश्वासचे कपडे सोमलवार टेलर्स कडे शिवायला टाकायचे............. असा तो मस्त दिवस जात असे. त्यानंतर जेवलो बाहेर तर मेवाड मधे डोसा!
  फ्रॉक घरी आणला की मला घालून पाहायची घाई झालेली असे. आई तो देवासमोर ठेवी, आतल्या बाजूला कुंकू लावी. मग मी तो घालायची. दोन्ही हातांनी लांबवून घेर किती आहे ते पाहायची, गिरकी घेऊन घेर कसा फुलतोय ते दाखवायची. ....... अरे राहिलंच! नवे कपडे घालून आधी देवाला नमस्कार, आईबाबांना नमस्कार आणि मगच हे नखरे! नंतर वाड्यात कोण कोण असेल तर त्यांना फ्रॉक दाखवायला पळायचं. प्रत्येकजण कौतुक करीत असे, वाडाभर फिरून घरी आले तरी नवा फ्रॉक काढावासाच वाटत नसे. मी फार दमल्यासारखी दिसले तर आई दृष्ट काढायची.

दिवाळीच्या चार दिवस आधी आई फराळाचे पदार्थ करायला सुरूवात करायची. आधी चिवडा, मग वड्या, लाडू, आजूबाजूच्या घरांमधेही असे पदार्थ सुरू होत. सगळीकडून असे हवेहवेसे वास वाडाभर तरंगत असत. मग अनारसे, करंज्या, शेवटी शेव आणि सगळ्यात आवडत्या चकल्या. चकल्या पाडून द्यायला मला, विशूला फार आवडे, तसंच शंकरपाळे करायलाही! वाड्यात फराळाच्या पदार्थांची देवघेव होत असे. धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारपर्यंत सगळी पुरूषमंडळीही जात. मग वाडा फक्त आमचाच!

 धनत्रयोदशीच्या दिवशी एक महत्त्वाचा कार्यक्रम असायचा! फटाके आणणे!

साधारण पाच वाजता आम्ही तिघे, बाबा- विशू - मी असे फटाके आणायला बाहेर पडत असू. बरोबर दोन तीन मोठ्या पिशव्या. आमखास मैदानावर सगळी फटाक्यांची दुकानं असत. ते तसं आमच्या घरापासून दूर होतं, आम्ही चालतच जायचो, मी तर जवळपास उड्या मारतच चालायचे. बाबांनी नीट चाल म्हंटलं की पुन्हा नीट. विश्वास एका मोठ्या भावाने जितका शहाणपणा दाखवावा, तितका दाखवत असायचा. दूरूनच फटक्यांची दुकाने दिसायला लागत. बाबा छान छान काही बोलत असायचे. आम्ही दोघेही सुतळी बॉम्ब किती घेऊ या, आणि लक्ष्मी बॉम्ब किती? मागच्या वेळेस चिमण्या नव्हत्या नीट गेल्या, यावर्षी नकोच घ्यायला.. वगैरे वगैरे....

तिथे गेलो ती प्रचंड मोठी गोलाकार लावलेली फटक्यांची दुकाने दिसत. आम्ही एक चक्कर मारायचो आणि बाबांचा एक विद्यार्थी होता, त्याच्या दुकानात फटाके घ्यायला जायचो. सगळीकडे गर्दी असे. बाबा एका खुर्चीवर बसायचे, आम्ही दोघे उभे असायचो किंवा गादीवर बसलेले. कुठले फटाके घ्यायचे, किती घ्यायचे? याचे पूर्ण हक्क बाबांनी आम्हाला दिलेले असत. टिकल्यांच्या डब्यांपासून सुरूवात व्हायची. मग लवंगी फटाके, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, डबल व्हल्कॅनो, असे आवाजाचे फटाके, अनार, भूईचक्र, हातचक्र, फुलबाज्या, रॉकेट, शिट्ट्या, चिमण्या, मॅग्नेशियमच्या दोर्‍या, असे देखणे फटाके, शिवाय रंगीत काड्यापेट्या, सापाच्या गोळ्या, नवीन आलेले काय काय फटाके, आम्ही घेत असू. आम्ही आणलेल्या पिशव्यांमधे हे फटाके ठेवून मग हिशोब होत असे, दोन हातभर लांबींच्या जाड उदबत्या, फटाके उडविण्यसाठी म्हणून फ्री मिळत असत. दुकानातून बाहेर पडलो तर अंधारच झालेला असे, तुरळक फटाक्यांचे आवाज आणि पणत्या, आकाशकंदील...

एकूण समजा पस्तीस रूपयांचे फटाके होत. ही म्हणजे काहीच्या काहीच खरेदी झालेली असे, आई नक्की ओरडणार! पोरं तर पोरं ह्यांना कळू नये का? मग आम्ही ठरवत असू की आईला सांगायचं अठरा रूपयांचे फटाके आणले. बाबाही अशी अ‍ॅक्टींग करायचे, आम्हांला वाटायचं हे आईला घाबरताहेत, आमची तिघांची एक टीम होत असे, आम्ही दबकतच घरात जात असू. आईची रांगोळी काढून झालेली असे, तिने आकाशकंदील काढून ठेवलेला असे. दारात पणत्या लावलेल्या असत. दिवाळी घरी आलीये असं वाटॆ.

बाबा आकाशकंदील लावत, मग जेवणे होत. त्यानंतर फटाक्यांची वाटणी होत असे. आई आम्हांला दोन पत्र्याचे डबे देत असे. आपापले फटाके आम्ही आमच्या डब्यात ठेवायचो. काही फटाके समसंख्येत नसत मग ते बाबांच्या वाटणीला जात, कधी आईच्या, त्या दोघांचा मिळून अगदीच छोटा डबा असे. आम्ही दोघे त्यातही कुठल्या दिवशी कुठले फटाके, किती उडवायचे, याचीही विभागणी करून ठेवायचो. सगळं कसं शिस्तीत! हे काम चालू असताना आई विचारी, "केव्हढ्याचे झाले फटाके?" बाबा सांगत, "अठरा रूपयांचे." आई म्हणॆ, "बापरे! किती महाग! एवढे कशाला आणले?" आम्हांला येणारं हसू आम्ही दाबत असू.


हे झालं की साबण लावून ते हात धुवायचे आणि झोपायचं. उद्या उठलो दिवाळी! जिची आम्ही वर्षभर वाट पाहायचो!

 उद्या दिवाळी आहे याचा विचार करत झोपण्याएवढं सुख प्रत्यक्ष दिवाळीत देखील नाही.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान असायचं. सुर्योदयापूर्वी सगळ्यांचं स्नान झालं पाहिजे. ( नाहीतर नरकात जावं लागेल! )

त्याआधी माक्याच तेल लावून व्हायचं. मग उटणं आणि नवी कोरी म्हैसूर सॅन्डल सोप.. भरपूर गरम पाणी... खरं असं असतं की धनत्रयोदशीच्या दिवशी बायकांची न्हाणी उरकून घ्यायची, पुरूषांची नरकचतुर्दशीच्या दिवशी, सोयच होती ती, पण मी अगदी पहिली दुसरीत असेन, आईला म्हणाले, "असं का? मला नाही चालणार. " मग आई एकटी आदल्यादिवशी न्हाऊन घ्यायची, मी मात्र नरकचतुर्दशीला. विशू मग काही फुलबाज्या, फटाके उडवायचा. त्याच्या आंघोळीच्या वेळी मी. मग आत येऊन त्याला म्हणायचं आत्ताचा आवाज ऎकलास ना? तो माझ्या फटाक्याचा होता." दिवे बंद करून त्याला सांगायचं की फुलबाजीच्या उजेडात कर स्नान! एक संपता संपता घाईघाईने दुसरी लावायची.. आमचं आवरून होईपर्य़ंन्त उजाडलेलं असे. सगळे फराळाचे पदार्थ घेऊन फराळ व्हायचा. बाबांची ती आली दीपवाळी, गड्यांनो आली दीपवाळी, रोज रोज शाळा..... " कविता व्हायची. ती रोज रोज शाळा इतकी मागे पडल्यासारखी वाटायची आणि तिच्या आठवणीने एक बारीकशी कळ यायची.

रोजचे पेपर जरा चाळले की आम्ही तिघेही दिवाळी अंक घेऊन बसायचो. आईला तिची कामं असायची.

बाबांकडे बरीच वर्षे त्यांच्या शाळेच्या ग्रंथालयाचं काम होतं. त्यांना शाळेसाठी पंधराएक दिवाळी अंक घ्यायचे असायचे. आम्ही ते औरंगाबाद बुक डेपो मधून घेत असू. मौज, हंस, दीपावली, मटा, मराठवाडा, आवाज यासोबतच मुलांसाठीचे चांगले चार पाच दिवाळी अंक आम्ही निवडायचो. एका वर्षी फक्त किशोर चा अंक लवकर आला, बाकीचे यायचे होते, मग मी आणि विशू दोघे तो घेऊन शेजारी शेजारी बसलो, एक गोष्ट त्याने मोठ्याने वाचायची एक मी, असं करून न भांडता तो अंक संपवला. मग गंमतजंमत चा आला, तोही तसाच वाचून काढला. एकूण दिवाळीच्या दिवसांत आमच्यातला समजूतदारपणा वाढत असे की काय?

छोट्यांचे अंक संपले की आम्ही मोठ्यांचे वाचत असू. आवाज ची खिडकीचित्रे गमतीशीर असत, बरेचदा चावटपणाकडे झुकलेली, त्यातलं साहित्यही तसंच, काय काय लिहितात? असं वाटत असूनही आम्ही ते वाचत असू. कुठल्या कुठल्या मोठ्यांच्या अंकातला हा लेख वाचा, तो वाचा, असं बाबा सांगत, मग तेही वाचून काढत असू. नंतर ते अंक शाळेत द्यायचे असत. चार-पाच दिवसात आमचे बर्‍यापैकी वाचून होत. व्यंगचित्रे तर सगळीच पाहून होत. जाहीराती कमी असत, त्याही नीट वाचून/पाहून होत. कासव छाप अगरबत्ती च्या चित्रकथा, आणि मला वाटतं नायसिल ची डोक्याला डोके भिडते जेथे वाली.. चार चारदा वाचून होत. ’अभिरूचीची एक छोटी १/४ पान जाहीरात पाहिल्याचं आठवतंय. पाने आत्तासारखी गुळगुळीत नसत. आणि अक्षरजुळणी केलेली लक्षात येई. मुखपृष्ठावर मात्र नट्यांचेच फोटॊ असत. काही अपवाद वगळता.

कितीतरी लेख आणि लेखक पहिल्यांदा दिवाळी अंकात वाचले आहेत. प्रकाश नारायण संतांचा लंपन, मिलिन्द बोकील, सानिया, गौरी देशपांडे, शिवाय पुलं, मिरासदार, माडगुळकर, कसली भारी भरी नावं असायची अनुक्रमणिकेत!

 नरकचतुर्दशीच्या दिवशी आम्ही आत्यांकडच्या सगळ्यांना जेवायला बोलावत असू. त्यांना आईच्या हातच्या पाकपुर्‍या आवडत, म्हणून बरेचदा तोच बेत असे. त्यादिवशी आईला खूपच काम असायचं , चौथी पाचवी नंतर मी थोडीफार मदत करायला लागले, पण जुजबीच.

 दुसरी- तिसरीपासून मी रांगोळी काढायला शिकले असेन. आईने मला दोन/चार रांगोळ्या शिकवल्या होत्या. माझी रेघ एकसारखी येत नसे, ठिपके जवळ दूर होत, कधी आई ठिपके काढून देई, मी रांगोळी काढायचे. मग रंग भरायला विशू येई. आम्ही दोघे मिळून ठरवून कशाशेजारी काय छान दिसेल याचा विचार करून रंग भरत असू. आमच्याकडे एक छाप होता, एक फूल आणि दोन पाने, त्यात रांगोळी भरून मी मुख्य रांगोळीभोवती ते छाप उठवत असे. रांगोळी पूर्ण झाली की जवळून - दूरून त्याकडे बघत बसे. इथून कशी दिसत्येय आणि तिथून कशी दिसत्येय....

आई म्हणे, "आता आवरा..."

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवा फ्रॉक घालायचा. .... आणि मधे सुपारीची फुलं असलेली शेंवंतीची वेणी! ती म्हणजे अगदी मस्टच!

 दिवाळी चांगली चार दिवस असते, एक दिवस संपला तरी अजून असतेच..... इतकं बरं वाटतं.

दुसर्‍या दिवशी फटाक्यांचा कचरा गोळा करायचा आणि अंगणात पेटवायचा. मग त्यात काही न फुटलेले फटाके फुटत. काही वेळा कुठला न फुटलेला फटाका असला तर तो आम्ही सोलायचो, त्यातली ती चंदेरी दारू गोळा करायचो, आणि एखाद्या फटीत कागदात ती दारू घालून पेटवायचो, उजळून निघत त्या दारूची राख होत असे.

भाऊबीजेच्या दिवशी आत्यांकडे जेवायला जायचं असे. आम्हां दोन कुटूंबांना खरोखरच मजा येई. मिळून जेवताना काहीतरी हास्यविनोद चाले, मामा काहीतरी जुन्या आठवणी काढत, ताईच्या मागे मागे मी ताटाभोवती रांगोळी काढत असे. ती तिच्याकडचं नेलपॆंट मला लावून देत असे. मला तयार करत असे, विचारी, "केस कापू या का तुझे? मस्त दिसतील." मी , "नाही" म्हणायचे.

चार वाजता तिची रांगोळी झाली मग घरी यायचे.

दिवसभर टिकल्या, लवंगी फटाके , असलं काय काय फॊडणं चालूच असे, पण रात्री सगळे महत्त्वाचे फटाके...... आई पणत्या लावी दारात, खिडकीत, तुळशीजवळ, नळाजवळ, शेजार्‍यांच्या दारात..... आकाशकंदीलाचा प्रकाश रांगोळीवर पडलेला असे, शिवाय त्याच्या रंगीबेरंगी कागदातून बाहेर पडलेला रंगी बेरंगी प्रकाश भिंतीवर आणि कुठे कुठे..... आईलाही संध्याकाळच्या स्वैपाकाची चिंता नसे, ती आवरून अंगणात येऊन बसे, बाबाही असत....... आम्ही दोघे एकानंतर एक आपापले फटाके उडवत असू. सुरसुर्‍या अर्ध्या उडवल्या की त्यांची दांडी वाकडी करायची आणि त्या वर फेकल्या की पिंपळाच्या झाडाला अडकून बसत, झाडही दिवाळीत सामील होई......... शेवटचं भूईचक्र रांगोळीवर लावायचं. रांगोळीचे सगळे रंग एकमेकांत मिसळले जात..... धूर, आवाज, यांनी आज जसं प्रदूषणच आठवतं, नको वाटतात ते आवाज... तसं व्हायचं नाही...... ते सगळे आवाज आनंदाचे असत. फटाक्याच्या दारूचा वासदेखील आनंदात भरच घाले...... वाटे दिवाळी संपूच नये..... आम्ही चौघेही खूप जवळ आलो आहोत असं वाटे.

भाऊबीजेचं ओवाळणं झालं, फटाके झाले की जाणवायचं दिवाळी संपली.

जरा वाईट वाटायचं, पुन्हा कधी येणार? असं होऊन जायचं......

कशी होती ना तेव्हा दिवाळी! वर्षातून एकदाच येणारी! ... वाट पाहायला लावणारी.... हुरहूर लावून जाणारी...

Saturday, November 3, 2012

पुन्हा भेटताना


जयंत नारळीकर तीन वर्षे केंबिज मधे राहून दोन तीन महिन्यांसाठी भारतात आले, बनारसला त्यांच्या घरी आले, तेव्हा त्यांनी लिहिलंय...   मला तिथल्या जीवनाशी इतक्या लवकर एकरूप होता आले की दोन तीन दिवसांतच असे वाटायला लागले की केंब्रिजमधील ती तीन वर्षे म्हणजे एक दीर्घ स्वप्न होते.

******


मला "आपलं घर", " माझं घर" ची व्याख्या अशीच करावीशी वाटते. कुठूनही आलो, केंव्हाही आलो, की आपण जिथे लगेच/ फारसा वेळ न घेता, मोकळे होतो, घरचेच होतो.
काहीतरी पोझ / भूमिका घेऊन वावरायला लागत नाही. हात पाय पसरून जसे असतो तसं बसता येतं.


जितकं ते घर परकं असतं तितकं आपल्याला तिथे जमवून घ्यायला वेळ लागतो. खूपशा घरात तर आपण औपचारीकतेची सीमा ओलांडत नाही.
कुठल्याही घरातलं आपलं स्थान काय आहे, याचा आपल्याला अंदाज असतो, त्यानुसार आपण वागतो.

औरंगाबादचं घर असं आहे, जिथे मी गेले की घरचीच होते. माझी मुलंही आईबाबांवर सोपवून मला लहान होता येतं. 

मामांच्या , आत्यांच्या, मावशीच्या घरी पूर्वी रूळायला दोन- तीन तास पुरायचे, आता नव्या सुना आल्या आहेत, दोन दिवस राहिले तरी सगळावेळ पाहुणे आहोत, हेच जाणवत राहतं. 
त्यातल्या त्यात वडगाव आणि मुधोळ या दोन गावी, गेलं की आपुलकी जाणवायला लागते, माणसांचीच नव्हे, त्या वास्तूची!
बंगईवर बसून जुन्या दिवसांत जाता येतं, मातीचा वास अजून तसाच आहे.

 मी हॉस्टेलला होते तेव्हाही हा विचार करायचे की कुठल्या कुठल्या घरांमधे गेल्यावर रुळायला मी किती वेळ घेते?

गेल्यापासून रूळॆपर्यंतचं माझं वागणं कसं असतं? माझं बोलणं कसं असतं? समोरच्याचं कसं असतं? नेमकी कधी त्या घराला माझी ओळख पटते? मला घराची ओळख पटते?

मोकळेपण येण्याचा क्षण कुठला असतो?
काहीवेळा मी जाणीवपूर्वक तो क्षण पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

म्हणजे नांदेडला मोठीआईकडॆ गेलेले, सुरवातीचं बोलणं चाललेलं, मोठीआई म्हणाली, " थोडे अडकूल खाऊन घे." तो अडकूल ( पोहे) शब्द आला आणि मी मोकळीच झाले.

किंवा आत्याकडे गेलेले, देवाला नमस्कार करून, मोठ्यांना नमस्कार करून, ओसरीवर बसलेले, आत्यांशी बोलत, आत्यांनी दूध गरम करायला ठेवलेलं, चुलीवर तापणार्‍या त्या गरम दुधाचा वास आला, आणि जमलंच जुन्या दिवसांत शिरायला. मी उत्साहाने याच्या, त्याच्या चौकशा करू लागले. मोठ्या वाड्यातून काकू आल्या, त्यांच्याशी छान हसून बोलले.

कधीतरी हा अभ्यास थांबला. वरचं नारळीकरांचं ते वाक्य वाचलं आणि जुनं पुन्हा आठवलं.

*******

घरांचं आहे ना? तसंच माणसांचंही असतं.
आपली माणसं कुठली?
कुठूनही आलो, केव्हाही आलो तरी ज्यांच्यापाशी लगेच मोकळं होता येतं, एकमेकांच्या असण्याचं ओझं होत नाही. सहजता असते. काहीतरी एक पोझ घेऊन बसायला लागत नाही.
जसे आहोत तसे आहोत......

प्रत्येक माणसाशी आपले वेगवेगळ्या प्रकारे धागे जुळलेले असतात.
खूप दिवसांनी माणसं भेटली की आधी चाचपणी सुरू होते.
आधी नुसत्या चौकशा.... मग त्याची उत्तरं कशी येतात... त्यावर पुढचे प्रश्न
नंतर अंदाज घेणं...
जुनं काही उरलंय का? कितपत उरलंय? 
मग त्यावर नवी उभारणी केली जाते.
कधी कधी भूतकाळातले झरे जिवंत असतात पण त्या काळापुरतंच बोलता येतं, सध्याच्या जगण्याचे संदर्भ येऊ शकत नाहीत. पण तेव्हढ्यावरही आपण खूष असतो, कारण त्या दिवसात परत जायला ती ती च माणसं लागतात. 
माणूस सतत बदलत असतो. आपणही आणि समोरचाही...
म्हणून अडखळायला होतं, आपण ती जुनी मैत्री शोधत असतो, जुनी आपुलकी....
आपल्या परीने अंतर कापायचा प्रयत्न करत असतो. समोरची व्यक्तीही जर चार पावले चालत पुढे आली, तर अंतर संपतं.
हा अंतर संपण्याचा क्षण मला शोधावा वाटतो.
एकमेकांची जुनी ओळख नव्याने पटण्याचा क्षण!
कधी आणि कशाने ओळख पटते?

कधी कधी आपण नुसते बोलत बसतो.... काही कुठेच हवंसं सापडत नाही, मग वाटायला लागतं, ती जुनी मैत्रिण कुठे गेली? ही कोण नवीच माझ्यासमोर बसली आहे. तिच्यातला रसच संपून जातो.
हे कळण्याचा नेमका क्षण कुठला असतो?

काही माणसे ना अशी धबधब्यासारखी असतात, कोसळतातच आपल्यावर, गृहित धरतात... जुने संबंध तसेच आहेत याची. मग मीही जुन्या भाषेत बोलायला लागते, जुनी ओळख पटॊ न पटॊ, 
काही माणसे दुरावल्याचं वाईट वाटतं, काहीचं काहीच वाटत नाही, असली तरी ठीक नसली तरी ठीक. प्रवासातल्या सोबतीसारखी!

******

काही माणसे ना, हरवू नये अशी इच्छा असते........ ती आपली असतात, त्या काळाच्या तुकड्यापुरती तरी नक्कीच........  तीही जगण्याच्या रेट्यात थांबून जातात, कुठे कुठे......
स्मरणात ती तशीच असतात.......
पण प्रत्यक्षातल्या त्यांना भेटायची हिंमत होत नाही,
वाटतं जुनी ओळख पटली नाही तर काय करायचं?

*******

औरंगाबादला मी मुक्ताला काय काय दाखवून आणलेलं आहे ....
पण आम्ही राहायचो तो वाडा तिला दाखवायची/ त्यानिमित्ताने स्वत: वाड्यात जायची माझी अजून हिंमत झालेली नाही.
ओळख पटली नाही ना, तर मला सहनच होणार नाही.
मला तो धोका पत्करायचा नाही.

********

Monday, April 23, 2012

रूखरूख

मिलिन्दने लायब्ररीतून प्रभाकर पेंढारकरांची तपोवन आणली आहे. तो म्हणाला,"चांगली आहे." मला बरीच कामे आहेत. वाचायला वेळ नाही. प्रभाकर पेंढारकर म्हंट्लं की त्यांची रारंगढांग आठवते.... मी तपोवन वाचायची ठरवते.
मुखपृष्ठ पाहते. तपोवनाचं चित्र. मलपृष्ठावर झाडे... त्यावर जे लिहिलंय त्यावरून ही कुणा एका पंडितांच्या, पन्नास वर्षांपूर्वीच्या, कोल्हापूरच्या स्मृतीं जागवणारी कादंबरी आहे हे लक्षात येते.


पुढे विजया राजाध्यक्ष यांची प्रस्तावना. पुस्तक वाचण्यापूर्वी मी सहसा प्रस्तावना वाचत नाही. ती पाने मागे टाकते आणि वाचायला सुरूवात करते.
पंडित विमानाने कोल्हापूरला यायला निघतात.... कशासाठी? तर मलपृष्ठावरचं वाचून माहितच आहे, परदेशातले अधिक पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित करण्यासाठी काय काय करता येईल याची पाहणी करायला.. सरकारतर्फे.... पंडितांचं बालपण इथे गेलं असेल. जुना वाडा अजून असेल, एखादं लिंबाचं झाड किंवा तपोवन हेच त्यांचं घर असेल.... वाचत असताना, त्यापेक्षा वेगात माझे विचार पुढे धावताहेत. मला वेळ नाही, आणि ही कादंबरी वाचायचीच आहे..... रेखाचित्रे सुरेख आहेत... ती पाहायलाही मी फारशी रेंगाळत नाही.... कथेच्या ओघात कळतं. कोल्हापूर काही त्यांचं गाव नाही. पंडित मुंबईचेच, आई गेली.. दहावीचं वर्ष.., या मुलाकडे कोण पहाणार?.. म्हणून रेल्वेत असणारे त्यांचे वडील, चांगल्या शाळेत ठेवायचं म्हणून पंडितांना कोल्हापूरला घेऊन येतात.
हळू हळू दीक्षित गुरूजी, तपोवन, पंडितांची शाळा, त्यांचे मित्र, शिवाय शाहू महाराज, यांची ओळख होते आहे.. दीक्षित गुरूजींची मुल्ये, त्यांचं तपोवनातील मुलांना वाढवणं हाच कादंबरीचा विषय दिसतो आहे, तपोवन हे एक वसतिगृह आहे... बहुदा पंडित म्हणजे वामन काहीतरी चुकीचं वागणार .... दीक्षित गुरूजी त्याला समजून घेणार.... आयुष्यभराची मोलाची शिकवण त्याला इथे मिळाली असणार..... हं, कथेत माझ्या अंदाजाप्रमाणे घडतंय का, याची मी वाट पाहतेय... भराभर वाचते आहे, शब्दांशी, अर्थाशी, चित्रांशी न थांबता मी पुढे चालले आहे..... आता मला गोष्ट कळायला हवी आहे.. बाकी मी पुन्हा कधीतरी बघीन... शाळेतल्या बाकावर बसलेला वामन असं चित्र येतं, हा शेजारचा सुधाकर असेल, मागचे कोण कोण? ऎरवी मी अंदाज करत, चेहर्‍यावरचे भाव निरखीत थांबले असते.. आता पान उलटते, वेळ मिळाला तर सवडीने सगळी चित्रे पाहू... संवाद संथ आणि पन्नास वर्षांपूर्वीचे वाटावेत असेच आहेत....
वामनचं भूतांना न घाबरता स्मशानात जाऊन येणं... पैज जिंकणं... मी वाचते आहे. पुस्तकात जी चित्रे आहेत त्या अनुषंगाने मी आणखीही काही चित्रे मनातल्या मनात काढते आहे. पुस्तकातल्या चित्रांसारखीच पेन्सिलीची रेखाचित्रे.....
एके दिवशी शाळेत जाताना अचानक जोरदार पाऊस कोसळायला लागला, आजूबाजूला आसरा घ्यावा असं काहीच नाही. माझ्या चित्रातल्या पावसाच्या रेघा.. जाड आणि जवळ जवळ.... एकच बंगला.. मी पावसात भिजत असलेला बंगला काढते... म्हंटलं तर ही चलचित्रे आहेत.... बंगल्याचं दार उघडतं.... समोर एक गोर्‍यापान बाई उभ्या! अंगात फ्रॉक, डोक्यावर भुरे केस, इंग्रजी सिनेमातल्या फॊटोसारख्या.. त्यांनी आम्हांला खूण केली , त्या म्हणाल्या, "दीन दोब्रे, कम इन... कम"...... मी एक चाळीस पंचेचाळीस वर्षांची, व्हिक्टोरियन काळातली बाई काढली, फ्रॉकला खूप घेर, गळ्याला लेस, झिरझिरीत बाह्या, केशभूषा? उंच अंबाडा, फ्रॉकखालून दिसणारे निमूळते पाय आणि पायात घरात घालायच्या चपला, त्या काही उंच टाचेच्या नसणार... बाई मुलांना केस पुसायला टॉवेल घेऊन येतात... चहा विचारतात.. तोवर मी खिडक्यांना लांबलचक पडदे काढते.. पान पलटलं... बाई मुलांसाठी चहा बिस्किटे घेऊन आल्या. या पानावर चित्र आहे!! या बाई म्हणजे तर मुलगी आहे!! वामनपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठी असलेली. एकोणीस वीस वर्षांची, ज्युलिया! ...
...... आता काय करावं?? बंगल्यात ज्युलिया एकटीच राहते. मी काढलेलं बाईचं चित्र खोडायचा प्रयत्न केला. जमेना. त्या बंगल्यात दोन बायकांना कुठे ठेवू? छे! अशी घाईने चित्रे काढायला नको होती!...
मी विचार केला, ती ज्युलियासोबत राहणारी तिची मावशी आहे. मावशीला कादंबरीत कुठे जागाच नाही! ज्युलिया एकटीच असायला हवी आहे. पुढे वाचताना मनात ही रूखरूख. मनातल्या मनात चित्रे काढणं बंद झालं.
वामनला ज्युलियाबद्दल असणारी ओढ, तिची काळजी नंतर नीटच कळतं ते प्रेम! दहावीत नंबर काढायचा म्हणून नेटाने त्याने केलेला अभ्यास आणि पेपर सोडून ज्युलियाचा घेतलेला शोध!......

कादंबरीची अर्पणपत्रिका
ज्यूलिया...
शोध शोध शोधलं तुला
त्याही वेळेस आणि
आत्ताही शोधतोय...
कुठे आहेस तू?
हे ’तपोवन’
द्यायचंय तुला...
कादंबरी वाचून झाल्यावर पाहिली...

ज्युलियाची मावशी मी मधेच उगीच घुसडलेली, तिला पूर्णपणे बाहेर काढता आलं नाही. ती आठवतेच आहे.
मी ठरवते यापुढे इतक्या घाईने काहीही वाचून टाकायचं नाही. नीटच काळजी घ्यायची.

Tuesday, April 3, 2012

पठाण सर

बाबांच्या शाळेत एक पठाण सर होते. तिकडे रोशनगेटजवळ कुठेतरी राहायचे. त्यांच्या घरचा "भंगार" घेणे /विकणे असा काही व्यवसाय होता. वडिल, भाऊ ते बघत. हेच एकटे कसे काय शिकले कोण जाणे. नुकतेच शाळेत लागले होते. कधी कधी रोशनगेटहून सायकलवर आमच्याकडे गप्पा मारायला येत. आमच्या वाड्यात बाबांच्या शाळेतले आणखी दोन सर राहायचे. त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या.

आमच्याकडे मी म्हणजे बडबड करायला नं. एक. अर्थात चौकोनी घरातली धाकटी मुलगी जशी सगळ्यांची लाडकी असते तशी लाडकी. विश्वासच्या मते ’तुम्ही तिला फार चढवून ठेवता, जरा अभ्यास करायला सांगत जा" आमचे हे बंधुराज म्हणजे ’आदर्श पुत्र’ च . अभ्यासात हुशार! वर्गात यांचा पहिला नंबर येणार! अति व्यवस्थित! यांच्या बुटांचं खोकं सहा महिने तरी चांगलं राहणार, शाळेतून आले की बूट व्यवस्थित खोक्यात! मला ते जमायचं नाही, आईची बोलणी खावी लागायची. शाळेतून आला की वह्या पुस्तके काढून कप्प्यात ठेवणार! शेजारी भिंतीवर वेळापत्रक लावलेले. रात्री अभ्यासानंतर वेळापत्रकाप्रमाणे दप्तर भरून ठेवणार! काही वेळा मला वाटे, मला बोलणी बसावीत म्हणून हा मुद्दामच जास्ती करतो.
मी काय अभ्यास वगैरेच्या भानगडीत पडायचे नाही. पहिलीत असताना मी माझं मराठीचं पुस्तक तीन वेळा हरवलं. दुसर्‍या दिवशी मराठीचा पेपर.
आई म्हणाली , " मराठीचं पुस्तक घेऊन वाचत बस."
’बरं"
दप्तर उघडलं तर काय? मराठीचं पुस्तक बेटं गायब! मला पत्ताच नाही! एकूण प्रसंग बाका. मी दप्तरात मान घालून..... आई समोर उभी!.... आईने पाहिलं, " पुन्हा हरवलं!" मग उपदेशाचा एक मोठ्ठा डोस! मराठीच्या पुस्तकाने चौथ्यांदा हरवायला नको होतं. आमच्या बंधुराजांना परमानंद झाला. त्यांनी ही बातमी वाडाभर पोचविली. बाबा शाळेतून आल्या आल्या त्यांना ही महत्त्वाची बातमी दिली. एकूण घडलेलं रामायण बाबांच्या लक्षात आलं असणार. ते काही बोलले नाहीत. ” चल आपण नवीन आणूया " म्हणाले. आमची स्वारी बाबांबरोबर दुकानात. तीन चार दुकाने फिरलो कुणाकडेही पहिलीचं मराठीचं पुस्तक नव्हतं.
पाचव्या दुकानात, दुकानदार म्हणाला," ये टाईमपे बुका मिलते नही, जून मे लेनेका" एप्रिल महिना होता.
बाबा म्हणाले, "आपका बराबर है. लेकीन ये हमारी बच्ची है ना, बहोत पढती है, जूनमे किताब लेनेका और वहीं एप्रिलतक पढनेका? उसे चलता नहीं. हम जूनमे एक किताब लेते है, फिर सितंबर मे लेते है, फिर दिसंबर मे लेते है.................." मी एवढंसं तोंड करून उभी! बाबांची व्यथा त्या दुकानदाराला कळली, त्याने त्याच्या दुकानात काम करणार्‍या पोर्‍याला माळ्यावर चढवले आणि एक शेवटचे पहिलीचे मराठीचे पुस्तक काढून आम्हांला दिले. ” जगन कमल बघ,.... हैबती आणि गैबती, पुन्हा माझ्या ताब्यात आले." हुश्श!
तर काय सांगत होते, हं, माझं हे असं!
मी तिसरीत असताना बाबांनी मला ’शारदा मंदिर" आणि विश्वासला " सरस्वती भुवन" या औरंगाबादमधील प्रतिष्ठीत शाळांत घातले. एकाच संस्थेच्या त्या मुलींची आणि मुलांची अशा शाळा आहेत. विश्वास तेव्हा पाचवीत होता. पाचवीचा वार्षिक परीक्षेचा निकाल लागला तेव्हा तो शाळेच्या पाचवीच्या सातही तुकड्यांमधून पहिला आला. मला काहीतरी बावन्न/ चोपन्न टक्के होते. विज्ञानाच्या पेपरमधे कारणे सांगा, हा प्रश्न मी चूक की बरोबर असा सोडवला होता. कारणं मला माहितच नव्हती, म्हणून ती विधाने बरोबर आहेत असे मी ठोकून दिलेले. गणितातही दिलेले गणित येत नव्हते मग त्या प्रकारच्या मला येत असणार्‍या गणितातील आकडे मी परीक्षेत लिहिले आणि बरोबर सोडवून दाखवले.

आहे त्या परीस्थितीत डोकं लढवून बाहेर पडायचं ही कला मला फार पूर्वीच अवगत झालेली होती.
अभ्यासाचं जावू देत, मला ज्या इतर असंख्य कला अवगत होत्या त्यावर मी खूष होते. खरं म्हणजे गणित मला आवडायचं. वाडाभर मी पाटी घेऊन मला गणितं घाला म्हणत फिरायचे. विश्वासची, मोठ्या वर्गांची मराठीची, इतिहासाची पुस्तके वाचायचे. मी अभ्यासात हुशार नाही असाच माझा समज होता, मला मार्कही तसलेच पडायचे.

एकदा पठाण सर दुसर्‍या कुठल्यातरी सरांबरोबर बोलत बसलेले. पठाण सर तयारी करून शिकवायला जायचे. ते नविन होते, त्यांना अडचणी असायच्या. ते असंच काहीतरी भूगोलावर बोलत होते. मी तिसरीत असेन. जगातले वेगवेगळे खंड असं काहीतरी, नकाशा घेऊन कुठला अमेरिका खंड, कुठला आफ्रिका, कुठला युरोप त्यांच्या सीमा वगैरे. ते म्हणाले , " हा युरेशिया कुठला?" त्यांना प्रश्न पडलेला. मी तिथेच होते, मी म्हणाले, "युरोप आणि आशियाला मिळून युरेशिया म्हणतात" आणि पुढे त्यांच्या खंडांबद्दलच्या आणखीही प्रश्नांना उत्तरे दिली आणि खेळायला गेले.

बाबा शाळेतलं सांगत होते... बाबांच्या शाळेत स्टाफरूमधे विश्वास कसा हुशार आहे, स्कॉलरशिप मिळवली, असा काहीतरी विषय चालू होता, तेव्हा पठाण सर म्हणाले, " एसआरसरकी बच्चीभी शार्प है, तुमने कभी उससे बात की है? बहोत होशियार लडकी है. देखते रहो" ......... मी चमकले.

माझे घरी दारी लाड व्हायचे पण कोणी मला हुशार म्हंटलेलं नव्हतं, हं विश्वासचं कौतुक खूप ऎकलेलं. आपण काही त्याच्यासारखे नाही हे मी मनात कुठेतरी मान्य केलेलं.

माझ्या अभ्यासातल्या हुशारीचं कुणीतरी कौतुक करावं असा तो पहिला प्रसंग होता.

अरे! मला जमेल की त्यात काय! मीही हुशार आहे. मीही मार्क मिळवू शकते. अशी माझ्या मनात बांधणी व्हायची ती सुरूवात होती.

माझा आत्मविश्वास जागं करण्याचं काम त्यांनी केलं. पुढे मी फार अभ्यासाच्या मागे लागले असं नाही, मार्क मिळवायला लागले.

********

छोट्या छोट्या मुलांना "तुला येतं", "तू करू शकशील", "वा! कशी हुशार आहेस तू!", "मस्त! खूप छान केलं आहेस".... अशा छोट्या छोट्या वाक्यांची गरज असते. तुम्ही ही वाक्ये वापरता ना?

********
पठाण सरांना मी कधी भेटले नाही. आमच्या लग्नात कदाचित, मिनिटभर. ... खूप खूप वर्षांपूर्वी तुम्ही एक चांगलं काम केलेलं आहे, हे त्यांना सांगायचं राहून गेलेलं आहे.

********